तंत्राशी तडजोड न करता सरळ बॅटने खेळत असल्यामुळेच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे, असे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाला.
‘‘विराट विशेष नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याच्या खेळावर तो प्रचंड मेहनत घेतो. त्याची शिस्त आणि खेळाप्रति असलेली निष्ठा यातून युवा खेळाडूंनी बोध घ्यावा. कोणत्याही आत्मघातकी फटक्यांच्या आहारी न जाता तिन्ही प्रकारांमध्ये तंत्रशुद्ध फटक्यांद्वारे तो आपली खेळी सजवतो,’’ असे त्याने म्हटले. यंदाच्या आयपीएलमधील खेळाच्या दर्जाबाबत सचिन म्हणाला, ‘‘आयपीएलमध्ये खेळाचा दर्जा उंचावत आहे. शेवटच्या साखळी लढतीपर्यंत बाद फेरीत जाणारे संघ निश्चित होत नाहीत. यावरूनच चुरस किती असेल याचा अंदाज येतो. चाहत्यांना दर्जेदार खेळाची अनुभूती मिळते, ही सकारात्मक गोष्ट आहे.’’