वानखेडे स्टेडियमवर तमाम मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने दोनशेव्या ऐतिहासिक कसोटीनिशी २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याचप्रमाणे त्याच्या १९९व्या कसोटी सामन्याच्या यजमानपदाचा सन्मान कोलकाताच्या ईडन गार्डन्सला बहाल करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर दोनशेवी कसोटी झाल्यास आईला हा सामना पाहता येईल, अशी विनंती सचिनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली होती. त्यामुळेच वानखेडेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील दौरा आखणी आणि वेळापत्रक नियोजन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेली सचिनच्या कारकिर्दीतील ही अखेरची मालिका असणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयने आपली रोटेशन पॉलिसी (सामन्यांच्या यजमानपदाचे धोरण) बाजूला ठेवली. या धोरणानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन कसोटी सामने अनुक्रमे बंगळुरू आणि अहमदाबादला होणार होते. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वानखेडेवर पहिली कसोटी आणि ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान ईडन गार्डन्सवर दुसरी कसोटी रंगणार आहे.
याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘‘दोन्ही कसोटी सामने आमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे सामन्याचे ठिकाण भव्य असणे आवश्यक होते. स्टेडियम मोठे असावे, हा मुद्दा लक्षात घेऊन पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपद कोलकाताला देण्यात आले.’’
कॅरेबियन संघ भारत दौऱ्यावर २१, २४ आणि २७ नोव्हेंबर या दिवशी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने अनुक्रमे कोची आणि विशाखापट्टणम् येथे होणार आहेत. परंतु तिसरा सामना मात्र कानपूर किंवा बडोद्याला होणार आहे.
‘‘तीन एकदिवसीय सामन्यांपैकी दोन सामन्यांची मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. मात्र तांत्रिक कारणास्तव तिसऱ्या सामन्याचे स्थळ ठरवण्यात आलेले नाही. कानपूरच्या मैदानाची पाहणी झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे शुक्ला म्हणाले.
सचिनसारख्या महान खेळाडूला येथोचित अलविदा करण्यासाठी बीसीसीआयने खास योजना आखली आहे. त्यामुळेच नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेची योजना आखून घरच्या क्रिकेटरसिकांसमोर निवृत्तीसाठी सचिनला संधी दिली आहे. निवृत्तीबाबतच्या अफवांना पूर्णविराम देत गेल्या आठवडय़ात सचिनने आपल्या दोनशेव्या कसोटी सामन्यासह कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा आपला निर्णय जाहीर केला.

सचिनने दोनशेवा कसोटी सामना मुंबईत व्हावा, अशी विनंती केली होती. जेणेकरून त्याच्या आईला हा सामना पाहता येईल. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि बीसीसीआय यांनी याबाबत चर्चा करून सचिनची विनंती मान्य केली. त्याच्या भावनांचा आदर करून १४ ते १८ नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे यजमानपद मुंबईतील वानखेडे स्टेडियमला देण्यात आले आहे.
राजीव शुक्ला, बीसीसीआयचे उपाध्यक्ष

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम
२८ ऑक्टोबर    वेस्ट इंडिज संघाचे भारतात आगमन
३१ ऑक्टो. ते २ नोव्हें. विंडीज वि. उत्तर प्रदेश, कटक
६ ते १० नोव्हें.    पहिली कसोटी, कोलकाता
१४ ते १८ नोव्हें.    दुसरी कसोटी, मुंबई<br />२१ नोव्हें.        पहिली एकदिवसीय लढत, कोची
२४ नोव्हें.        दुसरी एकदिवसीय लढत, विशाखापट्टणम्
२७ नोव्हें.        तिसरी एकदिवसीय लढत, बडोदा/कानपूर

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा निर्णय शनिवारी
मुंबई :  भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे कोडे अजूनही सुटलेले नसून याबाबतचा निर्णय येत्या शनिवारी (१९ ऑक्टोबर) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यक्रम आणि वेळापत्रक समितीची बैठक बोलावण्यात आली होती, पण या बैठकीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
‘‘१९ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची आखणी करण्यात येईल. हा दौरा होईल, अशी आम्हाला आशा आहे.
 या दौऱ्यात २ कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेच्या मंडळापुढे ठेवला असून त्यांच्याकडून यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले.

वेस्ट इंडिजच्या मालिकेपूर्वी सचिन रणजी खेळणार
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून सचिन तेंडुलकर मुंबईतर्फे रणजी करंडकात खेळणार आहे. रणजी करंडकाच्या प्राथमिक फेरीत मुंबईची हरयाणाशी लाहली येथे २७ ऑक्टोबरपासून लढत सुरू होणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिका सचिनची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेपूर्वी सराव करण्याच्या उद्देशाने सचिन हा सामना खेळणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी सांगितले.

शेवटच्या कसोटीत सचिनने शतक झळकवावे- गावस्कर
सचिनने प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीचा शेवट शानदार शतकाने करावा, अशी इच्छा ज्येष्ठ फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. वानखेडेवरच सचिनने प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले होते. याच मैदानावर तो अखेरची कसोटी खेळणार आहे. एक वर्तुळ पूर्ण होत आहे. शेवटच्या कसोटीत त्याने शानदार शतक झळकवावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. द्विशतक किंवा त्रिशतक झळकावल्यास ते चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणारे असेल, असे गावस्कर यांनी सांगितले.