पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या प्रणालीसंदर्भात (यूडीआरएस) १०० टक्के खात्री पटली तरच हे तंत्रज्ञान स्वीकारू, असे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले. ‘‘या प्रणालीद्वारे देण्यात येणाऱ्या निर्णयांच्या अचूकतेबाबत खात्री पटल्यानंतरच आम्ही ही पद्धत उपयोगात आणू. सध्या या प्रणालीने संभ्रमावस्था निर्माण केली आहे. ही प्रणाली निर्णयांप्रती १०० टक्के अचूक ठरल्यानंतर त्याचा आम्ही विचार करू,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
‘‘गेल्या पंधरा वर्षांत डकवर्थ-लुइस पद्धतीबाबतचे प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) सोडवू शकलेली नाही. अशा वेळी यूडीआरएस प्रणाली चुकाविरहित अचूक निर्णय देईल, याची हमी कशी देता येईल? डकवर्थ-लुइस पद्धत नेमकी काय आहे हे खेळाडू, संघटकांच्या आकलनापलीकडचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य चाहत्यांना त्याचा अर्थ उमगेल, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे एखाद्या संघाची धावसंख्या वाढू कशी शकते? ही सगळी प्रक्रियाच क्लिष्ट आणि गोंधळात टाकणारी आहे. सध्याच्या यूडीआरएस प्रणालीची स्थिती अशीच काहीशी आहे,’’ असे दालमिया यांनी स्पष्ट केले.
आयसीसीच्या बैठकीत यूडीआरएसला विरोध करणाऱ्यांमध्ये भारत एकमेव देश असेल, अशी माझी अपेक्षा होती. मात्र अन्य सहभागी देशांकडून कोणीही भारताच्या भूमिकेला विरोध केला नाही. यूडीआरएस अमलात आणलेल्या २००८मधील कसोटीत भारताचा सहभाग होता. मात्र भारताने या पद्धतीला विरोध केला. बीसीसीआयने खेळाडूंच्या भूमिकेला दुजोरा दिला. यामुळे त्या कसोटीत यूडीआरएस प्रणाली उपयोगात आणण्यात आली नाही. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत यूडीआरएस प्रणाली लागू करण्यात यावी, अशी शिफारस बीसीसीआयने आयसीसीच्या क्रिकेट समितीली केली नाही.