IND vs WI 5th ODI : विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने विंडीजला ९ गडी राखून पराभूत केले आणि विंडीजविरुद्ध सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला १०४ धावांत रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली. रवींद्र जाडेजाला सामनावीर तर विराट कोहलीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. CHAMPIONS #TeamIndia clinch the series 3-1 #INDvWI pic.twitter.com/1ZKZaUpRpF — BCCI (@BCCI) November 1, 2018 नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. २ धावांत विंडीजने २ गडी माघारी परतले होते. त्यानंतर सम्युअल्सने काही काळ विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण तो २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर रोवमन पॉवेलने ३९ चेंडूत १६ धावा करून माघारी परतला. कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २५ धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण तोदेखील लवकर बाद झाला. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २ आकडी धावसंख्या गाठता आली नाही. जाडेजाने ४, बुमराह व अहमदने २-२ तर कुलदीप आणि भुवनेश्वर कुमारने १-१ गडी बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन हा ६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावत ६२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने २९ चेंडूत ३३ धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजकडून थॉमसने एकमेव बळी टिपला.