भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तिथे भारतीय संघाने टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळली. भारताने इंग्लंडविरूद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात दिप्ती शर्माने चार्ली डीन्सला मंकडिंग पद्धतीने बाद केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद कमी होतोय तोच भारतीय संघाची यष्टीरक्षक तानिया भाटिया हिच्या हॉटेल खोलीमध्ये काही अज्ञात लोक घुसले आणि त्यांनी तानिया भाटियाचे किमती सामान चोरले. तानियाने याबाबतची पोस्ट ट्विटरवर शेअर केली.

भारतीय महिला संघाची यष्टीरक्षक -फलंदाज तानिया भाटिया हिने सोशल माध्यमावर खळबळ उडवून दिली आहे. तानियाने ट्विट केले की, ”भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याची मीही सदस्य होते आणि आम्ही लंडन येथील मॅरियट हॉटेलमध्ये थांबलो होतो. पण, मला तेथील व्यवस्थापनाचा धक्कादायक व खूप वाईट अनुभव आला. तेथील सामन्यादरम्यान वास्तव्यास असताना कोणीतरी माझ्या वैयक्तिक खोलीत घुसले आणि रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह माझी बॅग चोरली. हे असुरक्षित आहे…” तिने पुढे लिहिले की, ‘आशा करते की या प्रकरणाची त्वरीत चौकशी होईल आणि आरोपी सापडेल. इंग्लड क्रिकेट बोर्डाच्या पार्टनर हॉटेलमध्ये सुरक्षेचा अभाव आश्चर्यकारक आहे. त्याचीही दखल घेतील जाईल अशी आशा आहे.’ इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या आवडत्या हॉटेलमध्ये अशी घटना होणे ही आश्चर्याची बाब आहे. आशा आहे की ते याची दखल घेतील.’

चंडीगढ येथे २८ नोव्हेंबर १९९७ मध्ये जन्मलेल्या तानियानं कमी वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २०१८मध्ये तिनं वयाच्या २२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तानियाचे वडील संजय भाटिया यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्तरावर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. शालेय स्तरावर तिला भारताचा फलंदाज युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी तिला प्रशिक्षण दिले.

हेही वाचा   :  विश्लेषण: आस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयाचा फायदा भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत होईल? 

पंजाबच्या १९ वर्षांखालील संघाचे तानियानं वयाच्या ११व्या वर्षीच प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस ती सर्वात युवा खेळाडू होती. क्रिकेटसोबतच तिला प्राणीही खूप आवडतात. आंतरराज्य स्थानिक स्पर्धेत १३व्या वर्षी तिनं पंजाबच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण खेळाडू होती. २०१५च्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत तिनं उत्तर विभागाच्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते. तिनं २२७ धावा करताना १० बळी टिपले होते.