आशिया चषक २०२३ संदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यानंतर आता अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात सांगितले की, टीम इंडिया आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानचा दौरा करणार की नाही हे बोर्ड ठरवू शकत नाही. अशा निर्णयासाठी बीसीसीआय सरकारवर अवलंबून आहे, असे रॉजर बिन्नी यांचे मत आहे.

रॉजर बिन्नी यांनी मांडले मत

रॉजर बिन्नी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथे ते म्हणाले की, “बीसीसीआय यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला देश सोडण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे. आम्ही देश सोडून जात आहोत किंवा संघ देशात येत आहेत, यासाठी आम्हाला भारत सरकारची मंजुरी आवश्यक असते.”

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच फेव्हरेट नाही, समालोचक हर्षा भोगले यांचे मोठे विधान

रॉजर बिन्नी यांच्या म्हणण्यानुसार, “भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारशी अद्याप संपर्क झालेला नाही, मात्र अंतिम निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. तो म्हणाला की, हा निर्णय बीसीसीआयने घ्यायचा नाही. जर भारतीय संघ आशिया चषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार असेल तर हा निर्णय भारत सरकारला घ्यावा लागेल.”

हेही वाचा :  T20 World Cup 2022: दोनवेळची टी२० चॅम्पियन वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर, आयर्लंडचा नऊ गडी राखून विजय 

पाकिस्तानात जाण्यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी आवश्यक

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आशिया चषक २०२३ पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. त्याचबरोबर आशिया चषक २०२३ पाकिस्तान ऐवजी तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावे, असे ते म्हणाले होते. त्याच वेळी, गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला तर गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल.