नवी दिल्ली : महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा नवोदित क्रिकेटपटूंच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील अंतर दूर करण्यास महत्त्वाची ठरेल, असे मत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. महिलांच्या ‘आयपीएल’ला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत, स्मृती मानधना यांच्यासह देशातील बहुतेक प्रमुख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. परदेशी खेळाडूंचाही यात सहभाग असेल. ‘आयपीएल’ हे महिला क्रिकेटपटूंसाठी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असेल. पण, दृष्टिकोन आणि विचार यामध्ये एका रात्रीत बदल होत नाहीत. त्याला थोडा वेळ जावा लागतो. तसेच खेळाडूंनाही ‘आयपीएल’शी जुळवून घेण्यास थोडा वेळ जावा लागेल, असेही हरमनप्रीत म्हणाली. ‘आयपीएल’मध्ये खेळाडूंना एकाच वेळी परदेशी खेळाडूंबरोबर आणि विरुद्धही खेळायला मिळते. त्यांना दडपणाचा सामना करण्याची सवय होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना त्यांना अशा कुठल्याच दडपणाचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दरी दूर करण्याचे काम ‘आयपीएल’ करेल, असा विश्वास असल्याचेही हरमनप्रीतने सांगितले.