अ‍ॅमस्टेलव्हीन : पिछाडीवरुन पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धचा ब-गटातील सलामीचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. इंग्लंडकडून इसाबेला पीटरने नवव्या मिनिटाला, तर भारताकडून वंदना कटारियाने २८व्या मिनिटाला गोल केला.

भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही. यानंतर पीटरने भारताच्या बचाव फळीला चकवत चेंडू गोल जाळय़ात मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मग २८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी कटारियाने संधीचा फायदा घेत गोल करताना भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

भारताने अखेरच्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न वाढवले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आता भारताचा पुढील सामना मंगळवारी चीनशी होणार आहे.