अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने केलेल्या भागीदारीच्या जोरावर, टी-२० विश्वचषकात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून मात केली आहे. अंतिम फेरीत इंग्लिश महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाच्या संघाशी पडणार आहे. भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती. सलामीच्या फलंदाज टॅमी बेमाँड आणि डॅनिअल वेट या लवकर माघारी परतल्या. मात्र यानंतर अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून स्किवरने ५२ तर अॅमी जोन्सने ५३ धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. त्याआधी इंग्लिश कर्णधार हेदर नाईटने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय महिलांना ११२ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हरमनप्रीत कौरचा निर्णय भारतीय सलामीवीर जोडीने काही प्रमाणात सार्थ ठरवला. स्मृती मंधाना आणि तानिया भाटीया जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना माघारी परतल्यानंतर, ठराविक अंतराने तानिया भाटीयाही बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. मात्र रॉड्रीग्ज माघारी परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. भारताच्या मधल्या फळीतल्या सर्व फलंदाज एकामागोमाग एक विकेट फेकत राहिल्या. दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र लागोपाठ विकेट जाण्याचं सत्र सुरु राहिल्यामुळे तीदेखील मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतली. भारताकडून स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, तानिया भाटीया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या ४ फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडकडून कर्णधार हेदर नाईटने ३ तर सोफी एस्कलटोन आणि ख्रिस्ती गॉर्डन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. उपांत्य फेरीत मिताली राजला संघातून वगळणं भारताला चांगलचं महागात पडल्याचं सिद्ध झालं आहे. अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे.