२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ रविवारी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या मँचेस्टरच्या मैदानात कसून सराव करतो आहे. संपूर्ण क्रिकेटप्रेमींचं लक्ष असलेल्या या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विराटने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे.

“आम्ही चांगला खेळ केला तर कोणत्याही संघाला आम्ही हरवू शकतो. समोर कोणता प्रतिस्पर्धी संघ आहे यावरुन काही परक पडत नाही. समोर कोणताही संघ असला तरीही प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करणं अपेक्षित आहे.” विराटने आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

“प्रत्येक सामना तितक्याच गंभीरतेने खेळणं ही आमची जबाबदारी आहे. कोणताही एक सामना आमच्यासाठी अधिक महत्वाचा आहे असं कधीच झालेलं नाही. गेल्या वर्षभरात आम्ही ज्या पद्धतीचा खेळ केला आहे, त्यासाठी आम्ही सर्वोत्तम स्थानावर आहोत.” त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषक होऊ द्या, धोनीची पोलखोल करतो ! युवराज सिंहचे वडील भडकले