यंदाचा विश्वकप भारतात खेळवला जात आहे. भारताचे जवळपास सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. अलीकडेच पार पडलेल्या एशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. सध्या एकदिवसीय विश्वचषकाआधी सराव सामने खेळवले जात आहेत. दरम्यान, विराट कोहली अचानक आपला संघ सोडून तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. विराट कोहली अचानक मुंबईला रवाना झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
तो नेमक्या कोणत्या कारणामुळे मुंबईत परतला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र अति महत्त्वाच्या वैयक्तिक कारणांमुळे त्याला गुवाहाटीहून मुंबईला परतावं लागल्याचं बोललं जात आहे. विराट कोहली वगळता उर्वरित भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे.




त्यामुळे विराट कोहली नेदरलँड्सविरुद्धच्या सराव सामन्याला मुकणार की नाही? याबाबतची कोणतीही पुष्टी बीसीसीआयने केली नाही. मात्र सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यासाठी वेळेत परत येईल आणि २ ऑक्टोबर रोजी संघात सामील होईल.
हेही वाचा- एकदिवसीय विश्वचषकाचे दावेदार
“भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या एका सूत्राने पुष्टी केली की, विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव मुंबईला गेला होता. विराट लवकरच संघात पुन्हा सामील होईल,” असं ‘क्रिकबझ’ने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितलं. वैयक्तिक कारण नेमकं काय आहे? हे अद्याप कळलं नाही, पण तो वेळेत संघात परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.