ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

जबलपूर (मध्य प्रदेश) : पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील बाडमेर या जिल्ह्यात खो-खो क्रीडा प्रकारातील पहिल्यावहिल्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती राजस्थान खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष असगर अली यांनी दिली. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जबलपूूर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या वरिष्ठ पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील खो-खो संघटक आणि क्रीडाप्रेमी सध्या एकत्र आले आहेत. करोनामुळे काही काळ खो-खोच्या प्रगतीला खीळ बसली. परंतु राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा खो-खोची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे महासंघाने खो-खोचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करण्यासाठी पावले उचलली आहेत.

‘‘राजस्थानमध्ये खो-खोला उत्तम प्रतिसाद लाभत असून यापूर्वीही आम्ही राष्ट्रीय तसेच भारत-नेपाळ, भारत-इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय खो-खो सामन्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र शासनाशी यासंबंधी चर्चा झाली असून करोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात अडथळा आला, तरी पुढील वर्षीच एखाद्या महिन्यात विश्वचषक नक्की रंगेल,’’ असे अली म्हणाले.

‘‘भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर हा जिल्हा कच्चे तेल आणि पेट्रोलच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. तेथील ‘केर्न’ या तेल उत्पादन कंपनीने या स्पर्धेसाठी स्वत:हून २ कोटींची मदत करण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू यानिमित्ताने राजस्थानमध्ये येणार असल्याने बाडमेरमधील स्टेडियमसह अन्य व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात महासंघाचे पदाधिकारी येणार आहेत,’’ असेही अली यांनी सांगितले. याव्यतिरिक्त पाऊस अथवा अन्य कोणत्याही कारणांमुळे विश्वचषकावर प्रभाव पडू नये, म्हणून सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये मॅटवरच प्रामुख्याने खेळवण्यात येतील, अशी माहितीही अली यांनी दिली.

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत जबलपूर : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील पावसाने गाजवलेल्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गतउपविजेत्या महाराष्ट्राने पुरुषांच्या ब-गटातील सामन्यात तेलंगणाला १५-६ असे नऊ गुणांच्या फरकाने नमवले.  ऋषिकेश मुर्चावडे (२.१०, १.३०), मिलिंद कुरपे (५ गडी), अक्षय भांगरे (२.२० मि.) यांनी महाराष्ट्रासाठी चमकदार कामिगरी केली. महिलांमध्ये महाराष्ट्राने मध्य भारतचा १२-५ असा एक डाव आणि सात गुणांनी धुव्वा उडवला. रुपाली बडे (४ मि.), रेश्मा राठोड (३.४० मि.) यांनी अप्रतिम कामगिरी बजावली. याव्यतिरिक्त कोल्हापूर, विदर्भ या संघांनीसुद्धा बाद फेरी गाठली. दरम्यान, दिवसभर झालेल्या पावसामुळे मातीच्या तिन्ही मैदानांवरील सामने रद्द करण्यात आले. त्यामुळे सामन्यांचे वेळापत्रक कोलमडले. सध्या फक्त मॅटवरच सध्या सामने खेळवण्यात येत असून मंगळवारी सायंकाळी नऊऐवजी प्रत्येकी सात मिनिटांचे डाव खेळवण्यात आले. पावसामुळे ओलसर झालेल्या मॅटमुळे पडून काहींना दुखापतसुद्धा झाली.