कोल्हापूर : टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यात सामना व्हायला हरकत नाही. खेळाकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे. त्याला वादात अडकवणे योग्य ठरणार नाही, असे मत माजी कसोटीपटू, पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरमाणी म्हणाले, वास्तविक पाहता भारत-पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंचे संबंध स्नेहाचे राहिले आहेत. या दोन्ही संघातीलच नव्हे तर कोणत्याही संघाने मैदानावर उतरल्यावर निखळ व्यावसायिक भूमिका निभावली पाहिजे. इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍसेस कसोटी मालिकेत कडवी झुंज दिसून येते. त्याप्रमाणेच भारत-पाकिस्तान यांच्यात सामन्यावेळी संघर्ष जरूर आहे. खेळ हा शांतता प्रस्थापित करण्याचा भाग आहे. खेळाडूंमध्ये ही हीच भावना आहे. हा विषय सोडून अन्य विचार केला जाऊ नये, असे ते म्हणाले.भारताकडे जेतेपदविश्वचषकातील चार सर्वोत्तम संघामध्ये भारताचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यापेक्षा सरस कामगिरी करून यापूर्वी विश्वचषक जिंकणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत नक्की विजेतेपद नक्की पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे किरमानी यांना यष्टिरक्षकाने कोणती व्यवधाने राखली पाहिजेत, या प्रश्नावर त्यांनी डोळे, कान तीक्ष्ण असले पाहिजे. त्यांच्या सदैव सावध हालचाली असाव्यात. श्रवणदोष असेल तर संस्कार हिअरिंग सोल्युशन सुविधा वापरली पाहिजे, असे कंपनीच्या या सदिच्छा दूताने उत्पादनाचा दर्जा अधोरेखित केला. यावेळी अविनाश पवार, कुमार वासानी उपस्थित होते.