World Test Championship Points Table : इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारताचा १५वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा मानस पूर्ण होऊ शकला नाही. एजबस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेली एक चूक फार महागात पडली आहे. भारताने एजबस्टन कसोटीमध्ये केलेल्या या चुकीमुळे पाकिस्तानला फायदा झाला आहे.

पाचव्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. कसोटी सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे भारताला २ गुणांचे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघ आता गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गुण कपात करण्यासोबतच भारताला सामन्याच्या शुल्कापैकी ४० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.

भारताला दंड होताच पाकिस्तानला याचा फायदा झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे जर आता भारतीय संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, तर त्याला उर्वरित सर्व कसोटी मालिका जिंकाव्या लागतील. सध्या भारतीय संघाचे ५२.०८ टक्के गुण आहेत. पाकिस्तानचे ५२.३८ टक्के गुण आहेत.