राजेंद्र श्रीकृष्ण भट गच्चीवर फळे, भाज्यांची लागवड करताना कोणत्या प्रकारच्या कुंडय़ांचा वापर करता येईल, याची माहिती आपण मागील भागात घेतली. आज या कुंडय़ांमध्ये माती, खते, कीटकनाशके कोणती वापरावीत आणि रसायनरहित उत्पादन कसे मिळवावे हे पाहू. ज्यात आपण झाडे लावणार आहोत, त्या कुंडीच्या तळाशी सहज कुजणारे आणि वजनाला हलके असणारे सेंद्रिय घटक भरावेत. उदा. नारळाचे सोडणे, शेंडय़ा, शहाळ्याचे तुकडे, केळीची खोडे, काडय़ा, इ. त्यावर सुका पालापाचोळा, गवत यांचा चुरा करून थर द्यावा. आपल्या आजूबाजूला रसवंतीगृह असल्यास त्यांच्याकडून उसाचे चिपाड आणून ते वापरावे. हे चिपाड झाडे वाढवायला उपयुक्त ठरते. त्यात ग्लुकोज असते. त्यामुळे मातीत विषाणू वेगाने वाढतात. त्यावर आपल्या घरातील कचऱ्यापासून तयार केलेले खत पसरवावे. नसल्यास माती अधिक कोकोपीट/ गांडूळखत/ शेणखत एकास एक प्रमाणात घेऊन त्याचा थर द्यावा. हे सगळे एक फुटांपेक्षा जास्त उंच असण्याची आवश्यकता नाही. बहुतेक सर्व झाडांची मुळे ९ इंच खोलीपर्यंतच असतात. माध्यम भरताना त्यात कडुनिंबाची पेंड/ करंज पेंड मिसळता आली तर फारच छान. एक चौरस फुटासाठी शंभर ग्रॅम पेंड वापरावी. त्यामुळे मातीतील हानीकारक जीवाणू, बुरशी नियंत्रित राहते. ही पेंड वर्षभर हळूहळू कुजत राहून त्यापासून ४ टक्के नत्र झाडांना उपलब्ध होते.