वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

डॉक्टर, मला पित्ताचा खूप त्रास होतो. काहीतरी कायमचा उपाय सांगा हो, असे सांगत अनेक रुग्ण वैद्याकडे येतात. छातीत होणारी जळजळ, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी मळमळ आणि तीव्र डोकेदुखीने ग्रस्त असलेले हे रुग्ण आम्लपित्त या रोगाने अत्यंत त्रासून जातात. उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरे वाटते. काही जणांना तर घशात बोटे घालून उलटी करावी लागते.

आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा हा रोग अनेक व्यक्तींना त्रस्त करत आहे.

आम्लपित्ताची कारणे

अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणे, अतिशय आंबट खाणे, अतिप्रमाणात चहापान, मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचे वाढते प्रमाण, मांसाहार, अतिजागरण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणे, मानसिक चिंता अशी कारणे सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते. यामुळे काहींना तीव्र वेदनादायी डोकेदुखी, घशाशी होणारी जळजळ, तोंडाला आंबट, कडवड पाणी येणे, उलटीची भावना होणे ही लक्षणे जाणवण्यास सुरुवात होते. काही वेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणे ही तक्रार आहे.

यावर उपाय म्हणून आम्लपित्त आपल्याला होऊच नये असे सर्वाना वाटेल. यासाठी आपली दिनचर्या नियमित ठेवावी, आपला स्वभाव रागीट तसेच खूप चिंता करणारा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे, व्यसनांपासून दूर राहावे. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो. अशांनी वर सांगितलेल्या कारणांपैकी आपल्या बाबतीत कोणती कारणे घडताहेत याचा पडताळा घेऊन ती कारणे पुढे घडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी, रोगाची कारणे शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणे, हा प्रत्येक रोगाच्या उपचारांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. सोडय़ामुळे वाढलेल्या पित्ताचे तात्पुरते उदासीकरण होऊन तात्पुरते बरे वाटते. पण ही सवय चांगली नाही. आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा, शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्याच्या सल्लाने केल्यास आम्लपितामध्ये लाभ होतो. आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणाऱ्यांनी मोरावळा खाण्यामध्ये ठेवावा, आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.

आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो. सूंठ आणि साखर यांचे मिश्रण, कामधुधा, लघुसुतशेखर, सूतशेखर अशी काही आयुर्वेदीय औषधे योग्य सल्लाने घेता येतात.