डॉ. अरुणा टिळक वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण नानाविध प्रयत्न करतात. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न घेता उपाययोजना राबवत असल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत जाते. वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, काय आणि किती खावे, आहाराची नेमकी वेळ कोणती याबाबतची माहिती या लेखात देण्यात आली आहे. मधूचे वजन खूप वाढले होते. तिने वजन कमी करायचा वसा घेतला. गेले तीन महिने तिने मधाच्या कित्येक बाटल्या रिचवल्या होत्या. पहिल्या महिन्यात गरम पाण्यात तीन चमचे मध उपाशीपोटी सुरू केले. दुसऱ्या महिन्यात गरम पाणी + चार चमचे मध + अर्धे लिंबू. तिसऱ्या महिन्यात चार चमचे मध + पूर्ण लिंबू सुरू केले. पण वजन काटा डावीकडे हलतच नव्हता. ती चिंताक्रांत झाली होती. गेले कित्येक महिने ती स्वत:च्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करत होती. तिने आधी काही दिवस स्मूदी पिणे सुरू केले होते. सकाळी उठून पालेभाज्या + सफरचंद + दही + मध (चवीला पुदिना, सैंधव, मिरेपूड इत्यादी) असा आहार सुरू केला. पण ते पिऊन ती इतकी कंटाळली. मग परत दुसरा प्रयोग. सकाळी उठून दर दोन तासांनी खाणे. पण ते किती प्रमाणात खावे, आपल्याला ते किती आवडते, काय आवडत नाही याचा विचार न केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच गेले. अशा वेळी तर ती अधिकच चिंताग्रस्त, निराश झाली. तो डाएट प्लॅन सुटला. मग आता काय? परत नवीन काही तरी मग तिने केवळ दोन वेळा जेवायचे ठरवले. हुश्श्! थोडय़ा महिन्यांनी कपडे थोडे सैल झाल्यासारखे वाटले, वजन थोडे कमी झाले. जेवण दोनवरून पुन्हा तीनदा सुरू केले. पण वजन परत मूळ पदावर. नंतर तर थोडे-थोडे वाढायला पण लागले. आता तिला कळेना काय करू? लिंबू पाणी पिऊन अॅसिडिटी मागे लागली होती. वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी, चुकीच्या खाण्याने आणि चिंतेने चेहऱ्यावरचे तेज गेले होते. डोक्यावरचे केस धारातीर्थी पडू लागले होते. ही कहाणी घरोघरच्या स्थूल व्यक्तीची आहे. यावर उपाय काय? श्रीमद्भगवद्गीतेत १५व्या अध्यायातील चौदावा श्लोक आहे. अहं वैश्वनरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित:। प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।१४।। सर्व प्राण्यांच्या शरीरात असलेला जाठराग्नी मीच असून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करतो, असे या श्लोकात सांगितले आहे. आपल्या प्रत्येक मनुष्यांच्या शरीरामध्ये जाठाराग्नी असतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या भुकेनुसार अन्नग्रहण करावे. जेव्हा भूक लागेल, तेव्हा खावे. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी जरूर प्यावे. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन झाले की ते अंगी लागते आणि योग्य व्यायाम केला तर शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही. त्यामुळे चयापचयजन्य मधुमेहासारखे आजार होत नाही. या एका सूत्रात सर्व सार आले आहे. ज्या व्यक्तींची वजने जास्त नाहीत, ज्या व्यक्तींमध्ये काहीही खाल्ले तरी पचवण्याची वयानुसार ताकद आहे, त्यांनी योग्य सात्त्विक आहार घेतला तर वजनवाढीचा धोका कमी संभवतो. एकदा वजन वाढण्यास सुरु वात झाली की ते कष्टपूर्वक कमी करावे लागते. त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. डायबेटिस, पीसीओडी, ते वंध्यत्व इतक्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ही समस्या तर सधन कुटुंबातल्या बालकांमध्ये तीव्र होताना दिसत आहे. वडापाव, बर्गर असे अन्न खाऊन ही बालके स्थूल होतात. त्यांचा मेंदू काम करत नाही. काय नि किती खावे? वजन कमी करण्यासाठी मध घेताना, पाणी हे एक अष्टमांश उकळवावे. म्हणजे चार कप पाणी अर्धा कप राहील एवढे उकळवावे. ते कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध घालावा (मध कधीही अति गरम पाण्यात घालू नये. मध घालून कुठल्याही गोष्टी शिजवू नयेत. सतत घेतल्याने त्याचे शरीरावर विजत् परिणाम होतात.) आणि असे पाणी सकाळी- सूर्योदयापूर्वी घ्यावे (एक ते अर्धा तास आधी). त्यात लिंबूरस घालू नये. असे तीन ते सहा महिने केल्यास तुमच्या वयानुसार प्रकृतीनुसार वजन कमी होते. सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर व्यायाम झाल्यावर भुकेनुसार पचण्यास हलका नाश्ता करावा. त्यात तुम्ही मऊ भात, सांजा, तांदळाचे घावने खाऊ शकता. भात खाऊन वजन वाढते, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण तुम्ही भात करताना नेहमी एक वर्ष जुनेच तांदूळ वापरावेत. शक्यतो हातसडीचे वापरावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भात प्रेशर कुकरमध्ये न शिजवता बाहेर पातेल्यात शिजवावा. भात सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात वापरावा. जेवणामध्ये दोन चमचे साजुक तुपाचा अवश्य वापर करावा. कोलेस्टेरॉल वाढण्याची कुठलीही भीती मनात बाळगण्याची गरज नाही. उन्हाळा सोडल्यास बाकीचे महिने गरम पाणी पिण्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. जेवण सावकाश करावे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा संध्याकाळचे जेवण. हे सूर्यास्ताच्या आधीच झाले पाहिजे. पूर्वी लोक संध्याकाळी भर्जित म्हणजे भाजलेले अन्न खात असत. थालीपीठ, मोकळ भाजणी, तांदूळ भाजून केलेला भात, सोजी, मुगाची खिचडी. कारण असे अन्न पचण्यासाठी हलके झालेले असते. नोकरी करणारे लोक जे रात्री उशिरा घरी येतात अशांनी काय करायचे तर आम्ही त्यांना दोन पोळ्या सकाळीच रोल करून नेण्यास सांगतो. त्यामध्ये तूप + सर्व कोरडय़ा चटण्या, सुकी भाजी घालून खाल्ली तरी चालते. आणि रात्री घरी आल्यावर गरम दुधात सुंठ, केशर, वेलची हळद घालून प्यावे. संध्याकाळी घरी आल्यावर जेवण तयार असेल तर आल्यावर नाश्ता करणे आणि रात्री उशिरा जेवणे नक्की टाळावे. आल्यावर जेवण करणेच योग्य ठरते. सर्वात महत्त्वाचे ऋ तुनुसार येणारी फळे, भाज्या त्या-त्या ऋ तूतच खा. फ्रीजमध्ये ठेवून आंबा बाराही महिने खाऊ नका. फ्रोझन फूड खाऊ नका. अन्न ताजे खा. गरम खा, आपल्या भुकेपेक्षा दोन घास कमी खा.