भ्रामरी प्राणायाम आपल्या मनाला शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. भ्रामरी प्राणायामाचे नाव भुंग्यावरून पडले आहे. कारण या प्रकारात श्वास बाहेर सोडताना भुंग्याच्या गुणगुणण्यासारखा आवाज येतो, त्यामुळे यास भ्रामरी प्राणायाम म्हटले जाते. चिंता, काळजी, नैराश्य आणि क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी हा महत्त्वाचा प्राणायाम आहे. नियमित केल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत होते. कसे करावे? * घरातील एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे. चेहऱ्यावर मंद हास्य असावे. * तुमच्या दोन्ही हातांच्या तर्जनी तुमच्या कानांवर ठेवा. कान व गाल यांच्या मध्ये एक कुर्चा असतो. या कुच्र्यावर तर्जनी ठेवा. * एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना कुर्चावर किंचित दाब द्या. भुंग्याचा तार स्वरात आवाज काढत असताना तुम्ही कुर्चाला दबलेले ठेवू शकता किंवा तुमच्या बोटाने दाब देणे आणि बंद करणे या क्रिया करत राहा. * तुम्ही खालच्या स्वरातही आवाज काढू शकता. मात्र चांगला परिणाम येण्यासाठी वरच्या स्वरात आवाज काढणे आवश्यक आहे. * पुन्हा श्वास घ्या आणि असे सहा ते सात वेळा करा.