शहरशेती : राजेंद्र भट घरातील झाडांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे आवश्यक असते. माती सशक्त नसल्यास रोग होतात. अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडले असेल, तर रोग जडण्याची शक्यता अधिक असते. झाडे लावण्यापूर्वी त्यांची पाणी आणि प्रकाशाची गरज जाणून घेतली पाहिजे. ज्या झाडांना काटे असतात, अश निवडुंग वर्गातली किंवा गुलाबासरख्या झाडांना उन्हाची आवश्यकता जास्त असते आणि पाणी तुलनेने अधिक लागते. गुलाबाचे झाड सावलीत लावले तर त्याला रोग लागणारंच. त्याला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उन्हाची आवश्यकता असते. पाणी उन्हाचे प्रमाण कमी अधिक झाल्यास काही झाडे हमखास मरतात. मातीतील अॅरोबिक जिवाणू जास्तीच्या पाण्यामुळे काम करू शकत नाहीत. त्यामुळे झाडाला मातीतून पुरेसे अन्न मिळू शकत नाही आणि झाड मरते. कोवळ्या पानांच्या मागे रस शोषणारी कीड येते. वरच्या भागात पाने कुरतडणाऱ्या अळ्या दिसतात. काही अळ्या फुलपाखरांच्या देखील असतात. अळ्या ट्विझरने खेचून काढता येतात किंवा ती पाने कापून टाकून अळ्यांवर नियंत्रण मिळवता येते. रस शोषणाऱ्या किडींचे मात्र असे नसते. त्या डासांप्रमाणे सोंड पानात घुसवून त्यातून रस शोषून घेतात. त्यातून विषाणूंचा प्रसार होतो.