कॉलेज आठवणींचा कोलाज : सायली संजीव, अभिनेत्री माझे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्येच झाले. दहावीनंतर मी आर.वाय.के. कॉलेजला सायन्सला प्रवेश घेतला. अकरावी-बारावी सायन्स करत असताना मला जाणवू लागले, की विज्ञान शाखा मला झेपत नाही. अखेर बारावीनंतर मी ग्रॅज्युएशनसाठी एच.पी.टी. कॉलेजला आर्ट्ससाठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये मजामस्ती भरपूर केली. अकरावी-बारावी सायन्स असल्यामुळे लेक्चर बंक करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु आर्ट्सला प्रवेश घेतल्यानंतर मी कॉलेजला खूप कमी गेले. त्याचदरम्यान माझ्या काही आरोग्यविषयक तक्रारी असल्यामुळे मला डॉक्टरने बेडरेस्ट सांगितली होती, त्यामुळे मला घरी राहणे गरजेचेच होते आणि त्यानंतरही मी कॉलेजला खूप कमी जायचे. गंमत म्हणजे मी कुठल्याच लेक्चर्सना बसले नाही. अकरावी-बारावीला प्रयत्न करूनही मला रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र जमत नव्हते. मला आधीपासूनच पॉलिटिकल सायन्समध्ये विशेष रस होता. त्यामुळे मी ग्रॅज्युएशनसाठी हे क्षेत्र निवडले आणि पॉलिटिकल सायन्स मला जमण्यापेक्षा मला ते कळत होते. मी कॉलेजला खूप गेले नसले तरी जेव्हा जायचे तेव्हा भरपूर धमाल करायचे. कॉलेजला असताना साहजिकच इतर मुलांप्रमाणे आम्हीही लेक्चर्स बंक केले आहेत. त्यामुळे कॉलेजचे किस्से तर भयंकर आहेत. कट्टय़ावरचा किस्सा म्हणजे आर.वाय.के. सायन्स कॉलेज, एच.पी.टी. आर्ट्स कॉलेज, बी.वाय.के. कॉमर्स कॉलेज अशी तीन कॉलेजेस एकाच कॅम्पसमध्ये होती आणि खूप विद्यार्थी कॉमर्सला प्रवेश घेत असल्यामुळे तिथे खूप विद्यार्थी असायचे. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी कॉमर्स कॉलेजला असल्यामुळे आम्ही कॉमर्स कॉलेजच्याच कट्टय़ावर भेटायचो आणि गप्पा मारायचो. मजा, धमाल करायचो. आम्ही असेच एकदा कट्टय़ावर गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक दोन मुलींची मारामारी सुरू झाली. मी माझ्या आयुष्यात मुलींची मारामारी कधीच बघितली नव्हती. मला काही केल्या कळेना की नक्की काय सुरू आहे. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिली आणि शेवटची मुलींची मारामारी असेल, असे मला वाटते. कारण त्या एकमेकींना भयंकर पद्धतीने मारत होत्या. झिंज्या उपटणे काय असते, हे मला तेव्हा कळले. बी.ए.च्या शेवटच्या वर्षांला मी एक नाटक केले होते, ‘लंगडा मोर’ नावाचे. आणि हे नाटक माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. हे नाटक मी कॉलेजमध्ये असताना नाही परंतु कॉलेजच्या काळातच केले. अर्थात ही कॉलेजचीच स्पर्धा होती. त्यानंतर मी पु.ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. बी.ए.ची परीक्षा झाल्यानंतर मी भाग घेतला होता. या एकांकिकेत मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट नाटक असे पुरस्कार मिळाले होते आणि तिथूनच अभिनय क्षेत्राचा पुढचा प्रवास सुरू झाला. कॉलेजमधील मित्रमैत्रिणींपैकी माझा जवळचा मित्र म्हणजे विनायक. मी कॉलेजमध्ये कमी जात असल्याने माझे फार असे मित्र नव्हतेच; परंतु कॉलेजच्या बाहेर माझा मित्रपरिवार मोठा आहे. अथांग आणि विनायक आम्ही एकत्र असायचो. आम्ही वेगवेगळ्या शाखेचे होतो. मी आर्ट्सला गेल्यानंतर विनायक सायन्सलाच होता आणि अथांगबद्दल मला काहीच माहीत नव्हते. इतकी आमची विचित्र मैत्री होती की, आम्हाला एकमेकांच्या शाखा माहीत नव्हत्या. आजही माहीत नाही. कॉलेजला मी खूप वेळा बसने जायचे. फार क्वचित रिक्षाने जायचे. एकदा मी कॉलेजला जात असताना बसमध्ये मारामारी झाली आणि मी उतरत असतानाच बसमधल्या काही मुलांनी एका मुलाला ढकलले. तो नेमका माझ्याच बाजूला पडला. त्याचा चष्मा तुटला, त्याला थोडेसे डोक्याला लागले. थोडय़ा सेकंदाचा फरक पडला नाही तर त्या मुलाच्या धक्क्याने मी पडले असते. नशिबाने मी वाचले. त्यानंतर मला बसने जायची खूप भीती वाटायला लागली. मी बसने प्रवास करणेच सोडून दिले. कॉलेजमधल्या एका प्रसंगाने मी धाकड बनले. अकरावी-बारावीत असताना मी शेअर रिक्षाने घरी जात होते. एक प्रवासी मध्येच उतरला आणि रिक्षावाला मला म्हणाला मी सोडतो तुला. परंतु मला जिथे उतरायचे होते तिथे त्याने रिक्षा थांबवलीच नाही. आणि तो मला उतरूच देत नव्हता. त्याने माझा हात पकडून ठेवला होता. अखेर मी कसाबसा माझा हात सोडवला आणि पैसे त्याच्या रिक्षात अक्षरश: फेकून चालत्या रिक्षातून जेमतेम उतरले. या प्रसंगापासून अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे कळले. अशा गोष्टी घडल्या असल्या तरी कॉलेजचे दिवस बेस्ट होते. शब्दांकन : मितेश जोशी