डॉ. नीलम रेडकर मे महिना मध्यावर आला आहे. तापमानात वाढ होत आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावर परिणाम करते. उन्हाळ्यात सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे भयंकर उष्मा जाणवतो. वाढते वय वातावरणातील बदलानुसार, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळ्यात उष्णतेचे विकार होऊ शकतात. हायपरथर्मिया किंवा उष्माघाताचे विकार, ज्या नागरिकांना खालील प्रकारचे आजार आहेत त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतात :- * लठ्ठपणा किंवा कृशपणा ल्ल झोपेची औषधे, डाययुरेटिक्स यांसारख्या औषधे घेणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. * हृदयरोग, फुप्फुसांचा किंवा मूत्रपिंडांचा आजार असणाऱ्यांनासुद्धा हा धोका असतो. * या दिवसांत घाम आणि उष्णतेमुळे मान, पोट, पाठीवर बारीक पुरळ होतात आणि खाज येते. घामोळ्यांकडे लक्ष दिले नाही तर शरीराचे तापमान संतुलित राखणे कठीण होते आणि उष्माघाताची संभावना वाढते. आजारांमध्ये प्रामुख्याने सनबर्न, उष्णतेचा थकवा आणि उष्माघात (Heat Stroke) यांचा समावेश आहे. * उष्माघात (Heat Stroke) - प्रखर उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी वावरल्यामुळे उष्माघात होतो. यात शरीराचे तापमान १०४ 0f पेक्षा जास्त वाढते. त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यू येतो. यास इंग्रजीत ‘सनस्ट्रोक’ असेही म्हणतात. उष्माघाताची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत - * त्वचा अतिशय कोरडी आणि लालबुंद होणे. * उष्माघाताबरोबर जलशुष्कता (dehydration) असल्यास मळमळ, उलटय़ा, डोकेदुखी, रक्तदाब कमी होणे आढळून येते. * नाडी जलद होते, श्वसनाचा वेग वाढतो. * चक्कर येणे, चिडचिड होणे, भ्रमिष्टासारखे वागणे. * बेशुद्ध होणे हे लक्षण ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिला संकेतसुद्धा असू शकतो. काय काळजी घ्याल? * भरपूर पाणी प्या, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अननस, मोसंबी किंवा टरबूजचा रस, कैरीचे पन्हे, कोकम किंवा लिंबू सरबत यांसारखी शरीरास थंडावा देणारी द्रव्ये सेवन करावीत. तहान लागली नसली तरी ठरावीक अंतराने पाणी प्यावे. कॅफिन आणि अल्कोहोल युक्त द्रव्यांचे सेवन टाळावे. * तेलकट पदार्थ टाळा. आहारात काकडी, द्राक्षे, सफरचंद, स्ट्रॉबेरी, खरबूज, कलिंगड, आंबासारख्या फळांचा समावेश करा. * सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान बाहेर जाण्याचे टाळा. * उन्हात फिक्या रंगाचे सैल कपडे घाला. सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. गॉगल्सचा वापर करा. टोपी, छत्रीचा वापर करा. * अतिश्रम करणे टाळा. घामाद्वारे शरीराचे तापमान कमी करण्याची शरीराची क्षमता कमी असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. * बर्फगोळा, आईस कॅण्डी खाण्याचा मोह टाळा. विषाणू संसर्गाने खोकला, सर्दी, ताप, पोटदुखी, जुलाब होण्याची शक्यता वाढते. * घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर घामोळ्यांपासून बचाव करणारी पावडर लावा. त्वचा शुष्क राहील याची काळजी घ्या. प्रथमोपचार * उन्हापासून दूर, सावलीच्या ठिकाणी न्यावे. * कपडे सैल करावेत. * व्यक्तीला थंड पाणी पाजावे. व्यक्तीचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारून किंवा थंड पाण्याने पुसून थंड करावे. * जर ताप १०२ फॅ पेक्षा जास्त असेल आणि बेशुद्धी भ्रम किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसून आली तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.