मैत्र वाहनांचे : उदयन पाठक

वाहन मग ते दुचाकी असो की चारचाकी किंवा अगदी अवजड वाहन, त्याच्या तोंडवळ्याची (Facia) ओळख करून देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे डौलदार अग्रदीप (Head Lamp). तोंडवळ्याची ओळख करून देण्याबरोबरच अग्रदीपाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अंधारात वाहनचालकाला पुढचा रस्ता स्पष्ट दिसावा. हे करत असतानाच पुढच्या वाहनचालकाचे डोळे अग्रदीपाच्या प्रखरतेतून  दिपू नये, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

अग्रदीपाचे महत्त्वाचे घटक म्हणजे दिवा, परावर्तक (Reflector ) आणि पारदर्शक दर्शनी काच. वाहनांच्या दिव्यात हॅलोजन, झेनॉन एचआयडी आणि एलईडी असे तीन प्रकार असतात. सर्वात जुना प्रकार हॅलोजन, याचा प्रकाश साधारण पिवळा ते सोनेरी वर्गात मोडणारा होता. वापरून जुन्या झालेल्या दिव्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता हॅलोजन दिव्यात कमी होत जाते तसेच या दिव्यामुळे अग्रदीपाची काच गरम व्हायची. जसे जसे वाहनाचे वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले तसे तसे काचेऐवजी प्लास्टिकचा वापर होऊ  लागला. हॅलोजन दिव्यामुळे हे प्लास्टिक खराब होऊन प्रकाश कमी होऊ  नये म्हणून मग झेनॉन एचआयडी आणि नंतर एलईडी दिवे आले.

दुचाकी वाहनाच्या प्रकाशाची तीव्रता भारतीय रस्त्यांवर ६४५ ते ८६० ल्युमेन एवढी अपेक्षित असते. शहरात वाहन चालवताना दिवा हा कायम निमन झोतात (Low Beam)  असावा. समोरून वाहन येत नसेल किंवा रस्ता मोकळा असेल तर ऊध्र्व  झोतात ((Upper Beam)) असावा. असे न केल्यास समोरच्या वाहनचालकाचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असते. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार सर्व दुचाकी वाहनांना दिवसाही अग्रदीप लावणे १ एप्रिल २०१७ पासून सक्तीचे आहे. त्यामुळे संध्याकाळी तसेच धुक्यातून किंवा धुरातून जाणाऱ्या दुचाकी वाहनांचे अपघात कमी होतात.   एलईडी दिवे हे पर्यावरणपूरक असून त्यात विजेची बचत होते तसेच त्याच्या प्रकाशाची तीव्रता जास्त असल्याने कमी क्षमतेचा एलईडी दिवा वापरता येऊ  शकतो.

लेखक : टाटा मोटर्सच्या पुणेस्थित अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.