डॉ. अविनाश सुपे आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी वाहन ( मोटर/दुचाकी ) असते. त्यामुळे जवळ जरी जायचे असेल तरी गाडी किंवा स्कूटर वापरली जाते. त्यामुळे चालण्याचा व्यायाम कमी होतो. जर तुमचे वजन वाढते आहे किंवा तुम्ही हृदयरोगाने ग्रस्त आहात किंवा तुम्हाला ताणतणाव जास्त आहे तर तुम्ही नियमित चालायला सुरुवात करणे हा योग्य उपाय आहे. दररोज ३० मिनिटे चालायला जाणे हा शरीर आरोग्यसंपन्न ठेवण्याचा साधा, सोपा, बिनखर्चीक व बिनधोक उपाय आहे. एकटय़ाने चालणे कंटाळवाणे वाटत असल्यास मित्र-मत्रिणीसोबत चालण्यास सुरू करावे. तसेच कंटाळा टाळण्यासाठी नवनवीन किंवा वेगवेगळ्या मार्गावर चाला. सुरुवातीला कमी वेळ व अंतर चालून हळू हळू सकाळ-संध्याकाळ ३० मिनिटे चालायला सुरुवात करणे फायदेशीर असते. वेळ कमी असल्यास घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये रात्री जेवल्यानंतर किंवा सकाळी अर्धा तास तरी चालावे. अॅपच्या साहाय्याने रोज किती चालतो हे मोबाइलवर किंवा पेडोमीटरवर तपासण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. शक्यतो दिवसाला सहा ते आठ हजार पावले चालणे गरजेचे आहे. चालण्याचे फायदे * हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू राहते, रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब नियंत्रणात राहतो. * वाढत्या वयात आपले स्नायू कमजोर होतात. चालण्याने या स्नायूमध्ये अधिक ताकद येते. हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो. * रोजच्या चालण्याने पचनशक्तीदेखील सुधारते. जेवल्यानंतर शतपावली करण्याचे हेच कारण आहे. * चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीराला अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तुमची कार्यक्षमता वाढते. * चालणे या व्यायाम प्रकाराने शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाते. मनातील ताणतणाव, नराश्य कमी होते आणि ताजेजवाने वाटते. * चालण्याने मेंदू व मज्जासंस्था तणावरहित होतात. विचारांना चालना मिळते. स्मृतिभ्रंश व वृद्धत्व अशा आजारांची बाधा शक्यतो होत नाही. * चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते जेणेकरून आजारांशी सामना करणे सोपे जाते. चालताना खबरदारी काय? * चालताना डोके वर, नजर समोर असावी. सतत खाली जमिनीकडे पाहून चालू नये. * पाठ, मन, खांदे, सल ठेवावेत. पोक काढून चालू नये. ताठ चालावे. * चालताना दोन्ही हात मागे-पुढे करणे ही एक चांगली सवय आहे. * पाऊल पुढे टाकताना प्रथम टाच टेकवली जावी व नंतर बोटे टेकवावीत. * सिमेंटच्या रस्त्यांपेक्षा मातीचे व गवताचे मार्ग चालण्यास चांगले असतात. * चालताना चांगले मऊ पण मजबूत ताल असलेले स्पोर्ट्स बूट वापरावे. त्यामुळे पायांच्या स्नायूंना इजा पोहोचत नाही. * पिण्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवावी. * कपडे सुती, सलसर व गडद रंगाचे घालावेत. * सुरुवातीला वॉर्मअप किंवा प्रथम थोडे हळू चालून स्नायू मोकळे झाले की भरभर चालावे ज्यामुळे जास्त उष्मांक वापरले जातील. * कोणत्याही आजारानंतर चालताना आपल्या अस्थिव्यंगतज्ज्ञाचा आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन काही पावले चालून सुरुवात करावी. * तरुणांनी चालण्याबरोबर सायकल चालवणे, पोहणे, धावणे इत्यादी स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करावेत. चालण्यास योगासने केल्याने स्नायूंना अधिक लवचीक करता येईल.