सुधा सोमणी, मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग. हल्ली सर्वत्र काचेचे डायनिंग टेबल वापरले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे काच ही स्वच्छ करायला सोपी आहे. तसेच स्वच्छ केल्यावर काच आकर्षक दिसते. मात्र या आकर्षक टेबलवर गरम वस्तू ठेवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एका गृहिणीने विचारले माझ्या डायनिंग टेबलची काच जाड असूनही का तडकली? खरे तर काच जाड असल्यानेच तडकली. त्याचे असे झाले की त्या गृहिणीने गरम कढई टेबलवर बराच वेळ ठेवली. गरम कढईच्या संपर्कामुळे काचेचा पृष्ठभाग प्रसरण पावला. काच ही उष्णतेची दुर्वाहक असल्याने खालच्या पृष्ठभागापर्यंत तिचे वहन झाले नाही. त्यामुळे वरच्या प्रसरण पावलेल्या काचेच्या पृष्ठभागाचा दाब आल्याने काच तडकली. काच जर पातळ असती तर ती तडकली नसती. कारण उष्णतेमुळे तिचे सम प्रमाणात प्रसारण होते. त्यामुळेच जाड काचेवर गरम वस्तू ठेवताना नेहमी वस्तूच्या खाली कापडी/वेताचे आवरण (चटई) ठेवणे आवश्यक आहे. पातळ काचेत गरम वस्तू ठेवल्यावर ती न तडकण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे थर्मास. थर्मासमध्ये गरम पेय गरम आणि थंड पेय बराच वेळ थंड राहते. त्याचे कारण थर्मासच्या रचनेत दडलेले आहे. थर्मासच्या आत पातळ काचेची दोन भांडी असतात. या दोन्ही भांडय़ांच्यामध्ये निर्वात पोकळी असते. बाहेरून प्लास्टिक किंवा स्टीलचे आवरण असते. जेव्हा आपण थर्मासमध्ये गरम पेय ओततो, तेव्हा ती आतील काच समप्रमाणात प्रसरण पावते. परिणामी ती तडकत नाही. काच आणि निर्वात पोकळी दोन्ही दुर्वाहक असल्याने गरम वस्तू गरम आणि थंड वस्तू थंडच राहते. आपल्या दैनंदिन जीवनात उष्णतेचे दुर्वाहक अथवा सुवाहक वस्तूंचा खूप उपयोग होतो. स्वयंपाकाची भांडी धातूची बनलेली असतात. सर्वच धातू उष्णतेचे सुवाहक आहेत. त्यातही चांदी आणि तांबे हे उत्कृष्ट प्रतीचे सुवाहक आहेत. त्यामुळेच बऱ्याच स्टीलच्या भांडय़ांचा खालचा भाग तांब्याचा असतो. तांब्यामुळे उष्णतेचे वहन सर्व बाजूंना समान होते आणि पदार्थ मध्यभागी करपत नाही. मात्र भांडय़ांमध्ये शिजणाऱ्या पदार्थाना परतण्यासाठी मात्र लाकडी चमचे अथवा प्लास्टिकची मूठ असलेले धातूचे चमचे वापरले जातात. कारण लाकूड आणि प्लास्टिक दोन्ही उष्णतेचे दुर्वाहक आहेत. त्यामुळे गरम पदार्थात ठेवले तरी ते गरम होत नाहीत. याउलट धातूचे चमचे थोडा वेळ जरी गरम पदार्थात राहिले तरी आपल्या हाताला चटका बसतो. उष्णतेचे वहन रोखून आपण थंडीतही उबदारपणाचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री से. असते. आपल्या भोवतालचे तापमान जेव्हा २५ डिग्री से.च्या खाली जाते, तेव्हा आपल्याला थंडी वाजते. कारण आपल्या शरीरातील उष्णता कमी तापमानाची उष्णता खेचून घेते. अशा वेळी जाडजूड स्वेटर घालण्यापेक्षा एकावर एक असे सुती कपडे परिधान केले तरी आपल्याला उबदार वाटते. दोन कपडय़ांमधील हवेच्या थरामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचे वहन सहजासहजी होत नाही. त्यामुळे थंड प्रदेशात स्वेटर्सबरोबरच दुहेरी कपडे परिधान करणे लाभदायी ठरते. जुन्या रजईची उब कमी झाल्यास आपण त्याचा कापूस पिंजून घेतो. पिंजून घेण्याच्या प्रक्रियेत दबलेला कापूस मोकळा होतो. त्यात हवा मिसळली जाते. त्यामुळेच रजई पुन्हा उबदार झालेली जाणवते. व्यायाम करून आल्यावर आपले शरीर उष्ण झालेले असते. त्यावर जर लगेच थंड हवेचा मारा बसला तर तापमानातील तफावतीमुळे अपाय होतो. हे टाळण्यासाठी व्यायाम झाल्यावर नेहमी काही काळासाठी अतिरिक्त शर्ट अथवा जाकिट परिधान करावे.