कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे आवाहन अलीकडे सर्वच महापालिका करू लागल्या आहेत. कचऱ्याचे विघटन कसे करावे, याची योग्य माहिती घेतल्यास घरच्याघरी किंवा गृहसंकुलाच्या आवारात खतनिर्मिती करणे सहज शक्य आहे. आज घरातील कचऱ्याचे विघटन करून खतनिर्मिती कशी करता येईल हे पाहूया.

  • फळे, भाज्यांचा कचरा कुजण्यास जास्त वेळ लागतो, मात्र दरुगधीची शक्यता जवळपास नसतेच, मात्र शिजलेले अन्न कुजण्यास कमी वेळ लागतो आणि दरुगधीची शक्यता अधिक असते.
  • सेंद्रिय घटक कुजताना त्यांना योग्य प्रमाणात ओलावा व भरपूर प्रमाणात सर्व बाजूंनी हवा मिळणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी प्लॅस्टिकचे बारीक छिद्रे असलेले बास्केट वापरावे. त्यात सगळा ओला कचरा टाकावा. आपल्या घरात जर जास्त अन्न वाया जात असेल तर थोडी सुकी पाने, वाया गेलेले अन्न, त्यावर परत थोडी सुकी पाने असे थर लावावेत.
  • सुकी पाने आतिरिक्त ओलावा शोषून घेतात व त्यांच्या वापरामुळे मध्ये पोकळी राहते. त्यामुळे हवा खेळती राहते.
  • भाज्यांचे/फळांचे अवशेष जमल्यास मिक्सरमध्ये किंवा सुरीने बारीक करून टाकावेत. जेवढे बारीक होईल तेवढे लवकर कुजतील. माशांचे काटे/हाडे वगैरे कुजत नाहीत, त्यामुळे ती कुंडय़ा भरताना मातीत मिसळावीत
  • कुजण्यासाठी खरे म्हणजे कोणतीही बाह्य़ मदत आवश्यक नसते. तरीही कुजण्याची गती वाढवायची असेल तर वड/ पिंपळ/ उंबराखालील माती घरात आणून ठेवावी (तिथे नवीन माती टाकावी). या मातीत असंख्य जिवाणू असतात. दर ४-८ दिवसांनी थोडी माती टाकावी. पुढील बास्केट भरताना आपण तयार केलेले खत मातीऐवजी वापरावे.
  • जर जास्त ओलावा असेल तर दरुगध येतो व चिलटे/ केमरं होतात. बास्केटला झाकण लावावे आणि अधुनमधून हळद पाण्यात मिसळून त्यावर शिंपडावे. घरातील कचऱ्याचे खत करण्यासाठी वेगवेगळे बास्केट व कल्चर बाजारात उपलब्ध आहेत.

पुढील भागात गृहसंकुलातील कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी काय करता येईल, याची माहिती घेऊ.