मनीषा पुरभे, मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग. स्वयंपाकघरात आपण विविध प्रकारची भांडी वापरतो. आवडनिवड आणि प्रचलित पद्धत (फॅशन) यानुसार भांडय़ांची निवड केली जाते. सर्वसाधारणपणे तांबे, पितळ, स्टील, अॅल्युमिनियम असे विविध धातू आपण रोज वापरतो. मातीची भांडीसुद्धा पूर्वापार वापरली जात आहेत. पितळ (तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू) तसेच तांब्याची भांडी वापरल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोहाचे संश्लेषण चांगले होते. तांब्यामुळे अन्नपचनास मदत होते. त्वचेचे आरोग्यही सुधारते. तसेच त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर जाण्यास मदत होते. या भांडय़ात आंबट पदार्थ बनविल्यास त्यातील आम्लाची या धातूशी रासायनिक अभिक्रिया होते. परिणामी तयार झालेल्या पदार्थामुळे मळमळणे, उलटय़ा होणे आदी त्रास होतो. त्यासाठी या भांडय़ांना कथिलाने कल्हई केल्यास ही समस्या दूर होते. ज्या दुकानात ही भांडी मिळतात, तिथेच कल्हईचीही सोय असते. एकदा कल्हई केली की दोन-तीन वर्षे सहज टिकते. गेल्या काही वर्षांत स्टीलच्या भांडय़ांचा वापर वाढला आहे. स्टील हे लोह, कार्बन, क्रोमियम, निकेल यांचे मिश्रण आहे. मात्र या भांडय़ात पदार्थ शिजविताना तळात लागतो. भात करपतो. त्यामुळे त्याऐवजी स्वस्त असलेल्या अॅल्युमिनियमच्या भांडय़ांचा वापर वाढला आहे. खरे तर अन्न शिजविण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर काहीसा घातक आहे. कारण आल्मधर्मी पदार्थ अॅल्युमिनियमच्या भांडय़ात शिजविला तर त्या धातूचे अतिसूक्ष्म कण अन्नात मिसळतात. त्यामुळे मुलांची वाढ मंदावणे, मानसिक गोंधळ आदी लक्षणे दिसून येतात. त्यावर उपाय म्हणून आता अॅल्युमिनियमवर ऑक्साईडचा थर असलेली भांडी उपलब्ध आहेत. त्यामुळे अॅल्युमिनियमचा अन्नाशी प्रत्यक्ष संबंध टाळला जातो. शिजविण्यासाठी मातीची भांडी वापरली तर अन्नातील पोषण मूल्य शंभर टक्के टिकून राहते. पितळी भांडय़ात ९७ टक्के तर अॅल्युमिनियमच्या भांडय़ात अवघे सात टक्के पोषण मूल्य उरतात. नॉनस्टिक कुकवेअरचा एक फायदा म्हणजे कमी तेलात अन्न शिजविणे शक्य होते. २०१३ नंतर या भांडय़ांमध्ये ‘पीएफओए’ हे घातक द्रव्य वापरणे बंद झाले आहे. मात्र या भांडय़ांना चरे जाऊ नयेत एवढी काळजी आपण घ्यावी. त्यासाठी नायलॉन अथवा नारळाच्या काथ्याने भांडी स्वच्छ करावीत. दही माती किंवा स्टीलच्या भांडय़ात लावावे. सर्वसाधारणपणे माती अथवा लोखंडाची भांडी ही अधिक योग्य ठरतात. मातीची विविध भांडी सध्या उपलब्ध आहेत. लोखंडाच्या भांडय़ामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही. पर्यायी धाप लागणे, अशक्तपणा वाटत नाही. लोखंडी पातेले तीन ते चार मिनिटे तापवून त्यात तांब्यावर पाणी टाकून ते माठात टाकले तर घरातील सर्वाना त्याचा फायदा होऊ शकतो. चांदीत सूक्ष्मजीव नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणास मदत होते. एखादे चांदीचे नाणे नेहमी माठात टाकून ठेवावे. बीड हे लोह, कार्बन तसेच काही प्रमाणात सिलिकॉन आणि मँगेनीज यांचा मिश्र धातू आहे. त्यापासून बनविलेला तवा ठिसूळ असतो. त्यामुळे तो काळजीपूर्वक वापरावा. या धातूच्या वापरानेही आपल्या अन्नातील लोहाचे प्रमाण वाढते.