वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com निद्रानाश ही सध्याच्या युगामध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळून येणारी तक्रार आहे. डॉक्टर, मला रात्री शांत झोप लागेल असे काहीतरी द्या. असे सांगणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. काहीजण तर कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय थेट औषधाच्या दुकानातून झोपेच्या गोळ्या घेतात. आणि मग त्याचाही काही परिणाम दिसेनासा झाला की नंतर वैद्यकीय सल्लागाराकडे जाण्याची अनेकांची प्रवृत्ती आढळते. निद्रानाश हा तसा दिसायला गंभीर आजार वाटत नसला तरी त्याचे भविष्यातील संभाव्य परिणाम मात्र नक्कीच धोकादायक आहेत. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता वेळीच निद्रानाशाची कारणे नीट समजून घ्यायला हवीत. त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि आयुर्वेदीय पद्धतीने त्यावर कशा प्रकारे उपाययोजना करता येईल हे जाणून घेऊया.. सुश्रुत या आयुर्वेदीय विद्वानाने आपल्या सुश्रुतसंहितेत निद्रानाशाच्या कारणाचे वर्णन केले आहे. त्यानुसार वातदोष, पित्तदोष, मानसिक अस्वस्थता, शरीरातील धातूंचा क्षय आणि अभिघात या कारणांचा स्पष्टपणे उल्लेख येथे सापडतो. ही कारणे निद्रानाशास कारणीभूत ठरतात. वातदोष हा घटक संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा असा आहे. तोच बिघडल्यास निद्रानाश होतो. विविध प्रकारच्या वातव्याधींमध्ये (उदा. संधिवात, कंबरदुखी, इ.) वेदना असल्यास त्यामुळेही निद्रानाश संभवतो. पित्तदोषाच्या विकृतीमुळेही निद्रानाश होतो. निद्रानाशाचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रामुख्याने आढळून येणारे कारण म्हणजे मानसिक अस्वस्थता होय. शरीरातील रस, रक्त इत्यादी सात धातूंचे पोषण व्यवस्थित न झाल्यास त्यांचा क्षय होतो आणि निद्रानाश होतो. कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक आघात हेदेखील निद्रनाशाचे एक कारण ठरते. अशा प्रकारच्या कारणांमुळे निद्रा ही दुर्मिळ होत जाते. निद्रेचा आस्वाद घेण्यासारखी स्थितीच राहत नाही आणि त्यामुळे इतर त्रासांनाही सामोरे जावे लागते. आदल्या रात्री आपल्याला झोप न आल्यास दुसरा दिवस कशा परिस्थितीत जातो हे अनेकांनी अनुभवले असेल. झोप नीट न झाल्यास डोके जड होणे, अंग दुखणे, जांभया येणे, शरीर जड होणे, ग्लानी येणे, अपचन होणे, चक्कर येणे, मलावरोध अशा अनेक तक्रारी निर्माण होतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, विविध रोगांमुळे होणारा निद्रानाश हा प्रासंगिक स्वरूपाचा असू शकतो. (उदा. ताप आल्यावर एक-दोन रात्री झोप न येणे, दम्याचा विकार बळावलेला असताना रात्री झोप न लागणे. मानसिक अस्वस्थतेमुळे निर्माण होणारा निद्रानाश हा मात्र बऱ्याच काळापर्यंत राहू शकतो आणि हीच खरी चिंतेची बाब आहे. त्यावर विविध उपाय कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय करून पाहण्याकडे हल्ली कल वाढत आहे. आयुर्वेदीय उपचारांची दिशा : आयुर्वेदाने व्याधीचे उपचार सांगताना त्या व्याधीच्या कारणांना दूर करणे हे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार कोणालाही निद्रानाश झाल्यास तो नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला हे नीट तपासून पाहावे लागते. झोपेची गोळी घेण्याची सवय लागली तर ती घातक ठरण्याची शक्यता असते. आयुर्वेदाने म्हशीचे दूध हे निद्रानाशावरील उत्तम उपाय आहे, असे सांगितले आहे. मानसिक अस्वस्थता तसेच अतिशय थकव्यामुळे होणाऱ्या निद्रनाशावर हे अतीव उपयुक्त आहे. रात्री झोपेच्या वेळेच्या आधी अर्धा तास सुमारे एक कपभर गरम दूध घेणे उपयुक्त ठरते. याच प्रकारच्या निद्रनाशावर डोक्याला रात्री तेल लावणे तसेच तळपायावर तेल चोळून लावणे हेही उपायोगी ठरतात. विविध व्याधींमुळे निद्रानाश झालेला असल्यास त्या त्या व्याधीची स्वतंत्रपणे चिकित्सा करावी लागते.