वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com स्नेहपान म्हणजे औषधी स्नेह/स्निग्ध पदार्थ पिणे. स्नेहपान काही रोगांमध्ये तसेच पंचकर्म करण्याअगोदर शरीराची तयारी म्हणून केले जाते. काही रोगांमध्ये रोजच थोडय़ा मात्रेत स्नेहपान दिले जाते. त्याला ‘शमन स्नेहपान’ असे म्हटले जाते. पंचकर्म करण्यापूर्वी शरीरभर पसरलेल्या दोषांना कोष्ठात आणण्यासाठी स्नेहन म्हणजेच अभ्यंग केले जाते, ज्याला बाह्यस्नेहन म्हणतात. अभ्यंगाबरोबर पोटामध्ये पिण्यासाठी तूप दिले जाते. त्याला अभ्यंतर स्नेहपान म्हणतात. स्नेहन का करतात? सर्व प्रकारच्या पंचकर्म उपचारांपूर्वी शरीराची पूर्वतयारी म्हणून स्नेहन करतात. स्नेहनामुळे दोषांना मऊपणा येऊन ते कोष्ठात येण्यास मदत होते आणि कुठल्याही जवळच्या मार्गाने (मुखाने किंवा गुदद्वाराने) त्याला सुलभतेने बाहेर काढून टाकता येते. स्नेहन द्रव्य : तूप, तेल, वसा व मज्जा हे चार प्रकार स्नेहपानासाठी वापरले जातात. या चारपैकी तूप हे सर्वात उत्तम मानले आहे. तुपामध्ये असा गुण आहे की त्यामध्ये जे औषध मिसळले जाते, त्याचे गुण घेऊन तूप काम करते आणि त्यामुळे तीनही दोषांवर ते देता येते. दोष व रोग प्रकारानुसार यातील एक स्नेह अथवा यांचे मिश्रण वापरले जाते. स्नेहपान कोणी करावे? : वमन-विरेचन करण्यापूर्वी, रूक्ष शरीर, वातव्याधी ग्रस्त, पोटाचे काही आजार, रोज व अधिक व्यायाम करणारे, अति मद्यपान, वृद्ध, कृश, अति चिंतन करणारे या सर्वाना वैद्यकीय सल्ल्याने स्नेहपान करता येते. स्नेहपान कोणी करू नये? : कफ व मेदरोगग्रस्त, मंद अग्नी, आम विकार असलेले, अजीर्ण, वमन अथवा विरेचन दिलेले, अतिसार, विष लक्षणे दाखवणारे. स्नेहपान विधी : * ज्या दिवशी स्नेहपान करायचे आहे, त्याच्या आदल्या रात्री ताजा हलका आणि अल्प स्नेहयुक्त आहार घ्यावा (भाताची पेज, पातळ भात, पातळ डाळ, तांदूळ खिचडी) * दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून १ ते २ तासांत तूप पातळ करून प्यावे. * तूप प्यायल्यापासून पुन्हा भूक लागेपर्यंत काहीही खाऊ नये. मध्ये मध्ये कोमट पाणी प्यावे. यामुळे तोंडाचा चिकटा जातो. * रुग्णाच्या रोग व अवस्थेनुसार पहिल्या दिवशी ३० ते ५० मिलिलिटर तूप दिले जाते. त्यानंतर रोज ३० मिलिलिटर वाढवून प्यायले जाते. * या पद्धतीने तीन ते सात दिवस वाढत्या प्रमाणात तूप प्यायला दिले जाते. * या पद्धतीने तूप प्यायल्यापासून १२ तासांनंतर भूक लागली की स्नेहपान पूर्ण झाले, असे समजले जाते. * स्नेहपान झाल्यावर घाम आणण्यासाठी स्वेदन केले जाते. * अशा रीतीने उत्तम स्नेहन झाल्यावर वमन किंवा विरेचन करण्यासाठी रुग्ण तयार होतो. (या गोष्टी आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याने कराव्यात.)