रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

घरी लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याचे औषधपाणी, डोस यांचे वेळापत्रक तयार ठेवले जाते तसेच ते घरी आणलेल्या प्राण्यांबाबतही हवे.

प्राणी पालकत्व स्वीकारताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे लसीकरण. श्वान असो किंवा मांजर त्यांना वेळोवळी लसी देणे ही प्राण्यांच्या आणि पालकांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. भविष्यात अनेक गंभीर आजारांची चाहूल लागू नये म्हणून प्राण्यांना लस दिली जाते. श्वानांप्रमाणेच मांजरांचेही लसीकरण करणे आवश्यक असते. घरी लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याचे औषधपाणी, डोस यांचे वेळापत्रक तयार ठेवले जाते, तसेच ते घरी आणलेल्या प्राण्यांबाबतही हवे.

पिल्लू घरी आणल्यानंतर त्याला लवकरात लवकर जवळच्या पशुवैद्यकाकडे घेऊन जावे. काही आजार आहेत का, आईकडून पिल्लाकडे काही आजार आलेत का याची तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर लस देण्याचे आणि जंतनाशक औषधांचे वेळापत्रक निश्चित करावे. पिल्लू आठ आठवडे त्याच्या आईबरोबरच असणे अपेक्षित असते. त्यामुळे त्याच्या पहिल्या दोन लसी या ब्रीडरच देतात. लसीकरण झालेले किंवा जर थोडा मोठा श्वान आणला असल्यास त्याला दिलेल्या लसींची तपशील, डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे. लसीकरणाचे पुढील वेळापत्रक सांभाळताना डॉक्टरांना आधीचे उपचार, औषधे यांची कल्पना देण्यासाठी आधीची तपशिलात माहिती घ्यावी. श्वानांना साधारण दहा ते बारा आजारांसाठी लस दिली जाते. मात्र यामध्ये एकत्रित लसी असल्यामुळे तीन किंवा चार इंजेक्शन्समध्ये बहुतेक आजार होऊ नयेत यादृष्टीने खबरदारी घेता येते. लसीबरोबरच वेळोवेळी जंतुनाशक औषधे देणेही आवश्यक असते.

श्वानांचे लसीकरण

रेबिज हा आजार सर्वश्रुत आहे. त्यामुळे रेबिजची लस ही माहिती असते. मात्र, त्याबरोबरच इतरही अनेक आजारांपासून श्वानांना संरक्षित करणे गरजेचे असते. पिल्लू ३५ दिवसांचे झाले की त्याल पहिले इंजेक्शन दिले जाते. त्यामध्ये दोन आजारांचे संरक्षण मिळते. त्यानंतर तीन आठवडय़ांनी दुसरी लस दिली जाते. त्याला ‘एट प्लस वन’ असेच म्हटले जाते. त्यातून ८ ते १० आजारांचे संरक्षण मिळते आणि त्यानंतर तीन आठवडय़ांनी तिसरी लस दिली जाते. त्यात आधी दिलेल्या लसीतील काही आजारांसाठीचा दुसरा डोस आणि रेबिजपासून संरक्षण मिळते, अशी माहिती डॉ. गौरव परदेशी यांनी दिली. या लसींचे दुष्परिणाम फारसे नाहीत. प्राणी नेहमीपेक्षा थोडा शांत बसणे, कमी खाणे असे परिणाम काही वेळा दिसतात. मात्र, एका दिवसापेक्षा अधिक काळ असे परिणाम दिसले वा उलटय़ा, डायरिया, खूप सूज येणे, खाणे-पिणे बंद करणे असे काही परिणाम दिसले तर मात्र तातडीने पशुवैद्यकांकडे घेऊन जावे. लस देण्यापूर्वी पिल्लांना शक्यतो खूप वेळ बाहेर फिरायला सोडणे टाळावे.

जंतुनाशक औषधे

प्राण्यांना जंतुनाशक औषधे देण्याचे वेळापत्रकही काटेकोरपणे सांभाळायला हवे. श्वान किंवा मांजराला एक महिना ते तीन महिन्यांच्या कालावधीत दर पंधरा दिवसांनी त्याला जंतुनाशक औषध देणे आवश्यक असते. तीन महिने ते सहा महिन्यांतर दर महिन्याला आणि सहा महिन्यांनंतर नेहमी दर तीन महिन्याला जंतुनाशक औषध द्यावे. हे औषध देताना अनेकदा प्राण्याच्या वजनाचाही विचार केला जातो. त्यामुळे औषध कोणते आणि ते किती द्यावे, हे पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसारच ठरवावे.

मांजरांसाठीही लस

रेबिज हा फक्त कुत्र्यांनाच होतो किंवा मांजर बाहेर फिरून आपण औषधे शोधते असे अपसमज मांजरांचे आणि पालकांचे आरोग्य धोक्यात आणू शकतात. श्वानांप्रमाणेच मांजरांनाही वेळच्यावेळी लस देणे आवश्यक असते. मांजर खूप काळ बाहेर फिरणारे असेल तर काही कालावधीनंतर पुन्हा एकदा लसीकरण करण्याचीही गरज भासू शकते. मांजराचे पिल्लू दोन महिन्यांचे होईपर्यंत त्याला लस दिली जात नाही. पहिली लस ही तीन आजारांवर असते. ट्राय कॅट अशीच ती ओळखली जाते. ती दोन महिन्याच्या पिल्लाला दिली जाते. त्यानंतर पुन्हा एक महिन्यानंतर ट्राय कॅट आणि रेबिज अशी लस दिली जाते.