चैत्र महिन्याची सुरुवात देशभरात मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. वसंताच्या आगमनानिमित्ताने अनेक पारंपरिक उत्सव साजरे होऊ लागतात. थंडीचा काळ संपलेला असतो आणि येणाऱ्या ग्रीष्माच्या आधीचा हा काळ अनेक प्रकारे साजरा होतो. राजस्थानात याच काळात, म्हणजे मार्चच्या अखेरचे तीन दिवस तीन वेगवेगळे उत्सव होत आहेत. उदयपूरला मेवाड महोत्सव, तर जयपूर येथे गणगौर आणि राजस्थान महोत्सव. वसंताच्या स्वागताचा उत्सव म्हणजे मेवाड. या काळात मेवाडमधील सर्व स्त्री पुरुष अतिशय उत्साहात रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करतात. शंकर आणि पार्वती यांची मिरवणूक उदयपूर येथे निघते. नृत्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात आणि ही भव्य मिरवणूक अखेरीस शहरातील पिचोळा तलावापाशी समाप्त होते. हा उत्सव २७ ते २८ मार्च दरम्यान आहे. शंकर-पार्वती यांच्या उपासनेशी निगडित दुसरा उत्सव म्हणजे गणगौर. उपासनेच्या १८ व्या दिवशी मिरवणूक निघते. राजस्थान राज्याचा स्थापना दिवस ३० मार्चच्या आधी तीन दिवस राजस्थान फेस्टिव्हल साजरा केला जातो. या तीन दिवसांत जयपूरमध्ये नृत्य, संगीत, पारंपरिक कार्यक्रम अशी रेलचेलच असते.