सुहास जोशी जयपूरला कोणत्याही चौकातून जाताना एक दृश्य हमखास दिसते, ते म्हणजे भल्यामोठय़ा कढईत तळल्या जाणाऱ्या कचोऱ्या. मुंबईत जसे गल्लीबोळात वडापाव तसे तिकडे कचोरी. पण नुसती कचोरी खाणारे कमीच. कचोरीचे बारीक तुकडे करायचे आणि एकतर प्याज कचोरी किंवा मग कढी कचोरी हे कॉम्बिनेशन ठरलेले. गरमागरम कढीत आकंठ बुडालेली कचोरी, वर गोड चटणी आणि कांदा. कढी पुन्हा मिळायची सोय आहेच. सकाळी सकाळी नाश्त्याला अनेक कोपऱ्यांवर कचोरीचे घाणेच्या घाणे काढले जातात. दाल पक्वान्न पण असेच आवडते खाद्य. मुगाची घट्ट डाळ, चटणी, मिरची आणि कांदा. असं तेलकट खाल्लय़ावर जरा त्यावर उपाय म्हणून बाजूलाच एखादा निंबू शिंकजी, कैरी शिंकजी आणि राजस्थानी छाछ राबडीचा गाडा सापडतोच. छाछ राबडी हा ज्वारी किंवा मक्याच्या कण्यांपासून तयार केलेला पदार्थ. आपल्याकडे ताककण्या खातात तसाच काहीसा. ज्वारीच्या कण्या शिजवून त्यात ताक, चाट मसाला, तिखट आणि मीठ घालून घुसळले जाते. मध्यम आकाराचा ग्लास १० रुपयांना.. घट्टसर अशी ही राबडी एक दोन ग्लास प्यायली की दुपापर्यंत पाहायलाच नको.