मितेश जोशी

इंद्रनील चितळे, चितळे बंधू मिठाईवाले

एखादे काम कितीही आवडीचे असले, आपण त्यात पारंगत असलो तरी कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यातून ताण निर्माण होतो.

काही वेळेला ताण हा आपण स्वत:च निर्माण केलेला असतो. ज्यामुळे आपण आपल्या चैनी आणि विलासी आयुष्यापासून लांब जातो. ज्यामुळे आपल्याला क्षणिक वैराग्यही येते. या प्रकारच्या ताणावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. आमचे चितळे बंधूंचे कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे मला सतत धावपळ करावी लागते. यामुळे मला शारीरिक ताण येतो. एका कारखान्यापासून दुसऱ्या कारखान्यापर्यंतचा प्रवासाचा वेळही मी सत्कारणी लावायचा वेळोवेळी प्रयत्न करतो. माझा दर महिन्याला विदेश दौरा असतो. दर महिन्यातून एक आठवडा मी पूर्णपणे भारताबाहेर असतो. या बदलत्या वेळेचाही ताण येतो. शारीरिक ताणाशी दोन हात करण्यासाठी मी नियमित व्यायामाचा आधार घेतो. व्यायामामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावर तंदुरुस्त राहता येते. कौटुंबिक व्यवसाय सांभाळताना नवीन पिढीमध्ये विश्वासाची भावना टिकवून ठेवण्याचे आव्हान माझ्यावर आहे. मानसिक स्तरावरील ताण घालवण्यासाठी मी गाणी ऐकतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मी शास्त्रीय संगीत ऐकत स्वत:ला ध्यानमग्न करतो. सध्या भ्रमणध्वनीमध्ये ११ हजार गाणी आहेत. शास्त्रीय संगीतापासून ते रॉक गाण्यांचा मी चाहता आहे.

मी स्वत: एक रायडरही आहे. १२ वर्षे मी रायडिंग करीत आहे. साऊथ इंडिया आणि लेह-लडाख मी दुचाकीवरून हिंडलो आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मी वेळोवेळी रायडिंग करतो. निसर्गाच्या विविध अंगाचे निरीक्षण करतो. माझ्यासाठी ताणमुक्तीचे हे उत्तम माध्यम आहे. मी तबला वाजवतो. गेल्या दोन वर्षांपासून मी ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रम शिकत आहे. ड्रम वाजवताना एकाच वेळी दोन्ही हात दोन्ही पाय वापरावे लागतात. एकाच वेळी वेगवेगळी वाद्य वाजवावी लागतात. याच वेळी श्वासोच्छ्वासावर आणि संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. ड्रम वाजवत असताना सर्व गोष्टींवर सम प्रमाणात नियंत्रण लागते. हे नियंत्रण खऱ्या आयुष्यातही तितकेच महत्त्वाचे असते. समाजमाध्यमांवर लोक एकमेकांशी जरूर जोडली गेलेली आहेत. बहुतांश वेळा आजची तरुण पिढी त्यांचा ताण, दु:ख हे समाजमाध्यमांवर उघडपणे सांगतात. जे सांगणे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय धोकादायक आहे. समाजमाध्यमांवर उघडपणे भावना व्यक्त करण्यापेक्षा आपला ताण, समस्या कुटुंबीयांबरोबर व्यक्त करायला हव्यात. यामुळे ताणाची तीव्रता निश्चितच कमी होऊ शकते.