शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपून सुट्टीचा काळ जवळ आला आहे. सुट्टी म्हणजे मनसोक्त भटकंती करण्याची मोकळीक. सहकुटुंब सहलींचे बेत आखण्याचे दिवस. पण अशा तळपत्या उन्हात फिरायला निघालो, तर आजारी पडण्याची भीती वाटत असेल ना? असं असेल तर चिंता सोडा आणि बॅग भरा. थोडीशी काळजी घेतली, तर हा उन्हातान्हातला प्रवास सुकर होईल आणि सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता येईल.

  • मार्चपासून अगदी थेट जूनपर्यंत म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत दिवसभर उन्हाचे चटके बसतात. उन्हाचा सर्वात आधी फटका बसतो तो त्वचेला. त्यामुळे फिरायला जाताना उत्तम दर्जाचं सनस्क्रीन, छत्री, स्कार्फ आणि टोपी घ्यायला विसरू नका.
  • प्रवासादरम्यान फेशियल टिशूचा वापर करा. अधूनमधून चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारा. यामुळे चेहऱ्याची त्वचा चिकट होत नाही व ताजंतवानं वाटतं.
  • प्रवासादरम्यान आहाराची काळजी घ्या. तेलकट-तिखट पदार्थ टाळून समतोल आणि चांगल्या दर्जाचा आहार घ्या. वेफर्स, फरसाण टाळा.
  • प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्या. त्यामुळे थकवा येणार नाही. ज्यात पाण्याचं प्रमाण अधिक आहे अशा फळांचं आवर्जून सेवन करा. काकडी, टरबूज, कलिंगड आणि संत्र्यांचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. जिथं उपलब्ध असेल तिथं शहाळ्याचं पाणी आणि फळांचे रस प्या.
  • तुम्ही ज्या पर्यटनस्थळी फिरायला जाणार आहात तिथं शक्यतो निसर्गरम्य ठिकाणचं, परिसरात झाडं किंवा वनराई असलेलं हॉटेल निवडा. त्यामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी राहील. ज्या हॉटेल्समध्ये दुपारी इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीचं आयोजन केलं जातं अशा हॉटेलला प्राधान्य द्या. त्यामुळे तुम्हाला उन्हाच्या वेळी हॉटेलमध्ये वेळ घालवता येऊ शकेल.

writersmruti@gmail.com