राजेंद्र श्रीकृष्ण भट गॅलरीत कंदभाज्यांतील वेल लावून आपण अनेक प्रकारचे कंद मिळवू शकतो. आपल्याकडे बटाटे येण्याआधी हे कंदच आपण खात होतो. ते आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. मधुमेहींसाठी हे कंद बटाटय़ाला पर्याय म्हणून अनेकदा वापरतात. कंदांमध्ये प्रामुख्याने करांदे, चाई, कोनफळ, कणघर असे थोडे जास्त वाढणारे वेल आहेत. या कंदांतील सर्वात पौष्टिक कणघर हा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी व्यापारी उत्पादन म्हणून लावतात. त्यांना पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. वजन अंदाजे १००-१५०ग्रॅम असते. हे उकडून अथवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद देण्याची प्रथा आहे. कणघरं बाजारात दिवाळीनंतर येतात, ते आणून हवेशीर ठिकाणी काळोख्या जागी ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी महिनाभर लांब कोंब येतात. ग्रीलवर, भिंतीवर खिळे ठोकून त्यावर एखादी जाळी नुसती टांगून ठेवली तरी त्यावर हा वेल पसरतो. ही छान हिरवीगार भिंत तयार होते. ५०लि. च्या ड्रम वा मोठय़ा बादलीत हे कंद आपण लावू शकतो. कंद जसे तयार होतात तसे हे वेल सुकत जातात. दिवाळी ते संक्रांत याच काळात हे वेल कितीही पाणी घातले तरी सुकतात. जसजसे वेल सुकू लागतात तसतसे पाणी घालणे बंद करावे. वेल पूर्ण सुकल्यावर वेल कापून काढावेत व गोळा करून ठेवावेत. कंद खोदून काढून त्यातील एखाद-दोन पुढील बी म्हणून ठेवावेत. उरलेले स्वच्छ धुऊन हवेशीर जागी ठेवावेत. या कंदांना बटाटय़ासारखे मोड येत राहात नाहीत; त्यांना सुप्तावस्था असते.. किमान ४-५ महिने तरी ही सुप्तावस्था टिकते.