तंत्राचा मंत्र : उदयन पाठक सध्या प्रदूषणाबाबत भारत मानक ६ हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. त्यानिमित्ताने वाहनात अनेक बदल होत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी निकासोत्तर प्रणाल्यांची (Post Exhaust Systems) महत्त्वाची भूमिका आहे. त्या प्रणाल्या कार्यक्षमपणे कार्यरत राहाव्यात यासाठी योग्य दर्जाचे इंधन असणे फार गरजेचे आहे, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारत प्रदूषण मानकासोबत इंधनाचा दर्जासुद्धा सुधारतो आहे. १ एप्रिल २०२० पासून जगातील सर्वात शुद्ध इंधन भारतातसुद्धा उपलब्ध होईल. ‘भारत मानक २’साठी सर्वात महत्त्वाचा बदल केला गेला तो म्हणजे पेट्रोलमधील शिशाचे प्रमाण कमी होऊन शिशेविरहित पेट्रोल भारतात सर्वत्र उपलब्ध झाले. आजच्या घडीला १ किलोग्रॅम पेट्रोलमध्ये फक्त ५ मिलिग्रॅम शिशे असते. त्याचबरोबर पेट्रोलमधल्या गंधकाचे प्रमाण १० मिलिग्रॅम प्रति किलो आहे. दुर्दैवाने या शुद्ध पेट्रोलमध्ये ५:१ ते ५:३ या प्रमाणात केरोसिन मिसळून वापरण्याची प्रवृत्ती आहे. ‘या भेसळयुक्त पेट्रोलमुळे प्रदूषण तर वाढते, एवढेच नव्हे तर इंजिनाची वारंवार दुरुस्ती करावी लागते. इतकेच नव्हे प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांना बसविलेल्या कॅटकॉनसारख्या प्रणालीतील मौल्यवान धातूशी या अशुद्ध पेट्रोलच्या ज्वलनानंतर निघलेल्या उत्सर्जनातून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन कायमस्वरूपी निरुपयोगी होतात. इतकेच नव्हे तर अशा वाहनातून निघणारे वायू अजून जास्त घातक असतात. अनेकदा आपण धूर ओकत जाणारी वाहने बघतो भेसळयुक्त इंधनाचा वापर हे त्यामागील कारण असते. अर्थात बरेचदा हे भेसळ पेट्रोल पुरविणाऱ्या साखळीतील एक किंवा अनेक घटक असू शकतात. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या गुणवत्तेतपण असे अनेक बदल होताहेत. कधीकाळी १ टक्का- १० लक्ष भागात १०,००० या प्रमाणात (ppm) असणारे गंधक आता १० लक्ष भागात १० (ppm) इतके कमी झाले आहे. अर्थात हे सर्व बदल सहजासहजी झालेला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी यासाठी सुमारे ३५,००० करोड रुपये खर्च करून भारतातील तेल शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. याबाबत केंद्र शासनाने आत्तापर्यंत पर्यावरणांप्रति पहिल्यांदाच एवढी वचनबद्धता दाखविली आहे. भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल तसेच डिझेलची शुद्धतेची खात्री करून घेण्याची सोय नि:शुल्क उपलब्ध आहे. लेखक : टाटा मोटर्सच्या पुणेस्थित अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.