ओमकार वर्तले ovartale@gmail.com दक्षिण भारत हा पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याला कारण म्हणजे तिथले नितांतसुंदर समुद्रकिनारे, अप्रतिम मंदिरे आणि जिभेवर रेंगाळणारी खाद्यसंस्कृती या तिघांचा मिलाफ. त्यामुळे कौटुंबिक सहलींसाठी या भागातली कितीतरी ठिकाणे पर्यटकांना साद घालतात. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम हे त्यापैकीच एक.. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. फिरण्यासाठीचा हा सर्वोत्तम ऋतू. दक्षिण भारतात समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू अतिशय तीव्र असतात. त्यामुळे या दिवसांत येथे फिरणे त्रासदायक ठरते. यामुळेच हिवाळ्यात येथे येणे केव्हाही चांगलेच. तामिळनाडूतील महाबलीपूरम हे ठिकाणही नेहमीच पर्यटकांना साद घालत असते. चेन्नईपासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर असलेले हे शहर भव्य मंदिरे, स्थापत्य व सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. याच परिसराची ही सफर.. लेणी, शिल्पे व मंदिरे महाबलीपुरमला दोन हजार वर्षांपासूनची ऐतिहासिक पाश्र्वभूमी असल्याचे इतिहासकार मानतात. या शहराचे प्राचीन नाव मामलपुरम होय. सातव्या शतकात पल्लव राजांची राजधानी म्हणून हे शहर ओळखलं जाई. त्यामुळे या कालावधीत अनेक लेणी तिथे निर्माण करण्यात आली. या परिसरात जशा मानवनिर्मित गोष्टी दिसतात तशीच काही नैसर्गिक आश्चर्येही पाहायला मिळतात. यापैकीच एक म्हणजे एक प्रचंड आकाराचा दगड उतारावर येऊन थांबलेला एक ठिकाणी दिसतो. हे खूपच अचंबित करणारे आहे. या ठिकाणाला ‘‘कृष्णाज बटर बॉल’’ म्हटले जाते. याच्याजवळच भीमेची गुहा, वराह गुहा, दगडात कोरलेले गणेश मंदिर ही ठिकाणे आहेत. कृष्णमंडप नावाची गुहा तर खूपच सुंदर आहे. या गुंफेत गोवर्धनधारी श्रीकृष्ण व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत. या लेणीगटात सर्वात आकर्षक शिल्प कुठले असेल तर ते आहे अर्जुन तपस्येचे. २७ मीटर लांब व ९ मीटर रुंदीच्या विशाल खडकावरचे हे शिल्प म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुनाच म्हटले पाहिजे. अर्जुन, पशू-पक्षी, मानव यांची एकत्रित शिल्पे असलेली ही कलाकृती पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. पाच रथ वरील लेण्याच्या जवळच पाच रथ नावाचा शिल्पगट आहे. तोही पाहण्याजोगा आहे. नावाप्रमाणेच या ठिकाणी पाच पांडवांच्या नावाने पाच दगडी रथ आहेत म्हणून त्यांना पाच रथ असे म्हटले गेले आहे. यापैकी चार रथ एकाच भव्य दगडात कोरून काढलेले दिसतात. दुरून हे रथ म्हणजे मंदिरेच वाटतात. धर्मराजाचा रथ हा सर्वात उंच आहे. भव्य आकाराचे हत्तीचे आणि एका काल्पनिक प्राण्याचे शिल्पही मनाला भुरळ पाडते. महाबलीपुरमची ही सफर एका दिवसात आरामात पूर्ण होते. चेन्नईपासून जवळच असल्यामुळे आणि पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथे राहण्याची-खाण्याची, वाहनांची खूप चांगली सोय होऊ शकते. दक्षिण भारत पर्यटनात हे ठिकाण न चुकता पाहायलाच हवे. किनारा मंदिर महाबलीपूरमचे आणखी एक आकर्षण म्हणजे किनारा मंदिर. एका सुंदर किनाऱ्यावर उभारलेले हे मंदिर पाहताक्षणीच वेड लावते. अतिशय निसर्गरम्य पाश्र्वभूमीवर उभे असलेले हे अतिशय सुंदर मंदिर ‘शोर टेम्पल’ म्हणूनही ओळखले जाते. साधारण आठव्या शतकात नरसिंह वर्मन राजाच्या काळात कोरलेले हे मंदिर द्राविडी स्थापत्य शैलीचा सुंदर आविष्कार आहे. हा एकूण तीन मंदिरांचा समूह असून मधले मंदिर विष्णूचे तर इतर दोन मंदिरे शिवाची आहेत. या मंदिराच्या मागे अथांग समुद्र खूपच छान दिसतो. शंख, शिंपल्यांचे संग्रहालय महाबलीपूरम येथे मानवनिर्मित आश्चर्य तर डोळ्यांचे पारणे फेडतातच शिवाय तिथे जवळच असलेले समुद्रातील शंख, शिंपले, मोती यांचे खूप सुंदर संग्रहालय न चुकता पाहावे, असे आहे. भारतातील सर्वात मोठय़ा अशा या संग्रहालयात ४० हजारांहून अधिक शंख-शिंपले पाहायला मिळतात. त्यांची माहिती जाणून घेता येते. समुद्राच्या पोटातले हे विश्व पाहणे, त्यात दडलेल्या आश्चर्याची माहिती घेणे हा आगळावेगळा अनुभव ठरतो.