हिरव्यागार वनराईने सजलेले आणि मुबलक जैववैविध्य अंगाखांद्यावर खेळवणारे उंचच उंच पर्वत आणि त्यात दडलेले नागमोडी रस्ते, उंचावरून दऱ्यांमध्ये कोसळणारे घनगंभीर धबधबे, सतत साथ देणारी ब्रह्मपुत्रा, अवाढव्य झाडांच्या मुळांपासून नैसर्गिकरीत्या तयार झालेले पूल, भारत चीन सीमारेषा, स्फटिकासारखे नितळ सरोवर, काझिरंगातील एकशिंगी गेंडे, हत्ती.. ईशान्य भारत म्हटलं की अनेक पैलू नजरेसमोर उभे राहतात. असलेला सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखला जाणारा सात राज्यांचा हा समूह निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असूनही आजदेखील गर्दीपासून दूर आहे. अन्य लोकप्रिय पर्यटनस्थळांसारखी गर्दी अद्याप इथे झालेली नाही. त्यामुळे इथल्या भटकंतीत निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याचा पुरेपूर आनंद मिळतो. येथील तीन राज्यांना भेट देण्याची संधी युथ होस्टेलने उपलब्ध करून दिली आहे. युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंबरनाथ विभागातर्फे ईशान्य भारताची सहल आयोजित करण्यात आली आहे. सहलीत आसाम, अरुणाचल आणि मेघालयात भटकंतीची संधी मिळणार आहे. सहलीची सुरुवात आसाममधील गुवाहाटी येथून होईल. आसाममधील काझिरंगा अभयारण्य, तेजपूर, भालुकपाँग; अरुणाचल प्रदेशातील बोमडीला, तवांग ही ठिकाणे पाहाता येतील. त्याशिवाय मेघालयातील शिलाँग आणि सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीलाही भेट देता येईल. १६, १९, २२ आणि २५ एप्रिल २०२० या प्रत्येक दिवशी एक तुकडी गुवाहाटी येथून रवाना होईल. प्रत्येक तुकडीच्या सहलीचा कालावधी १२ दिवस असेल. सहलीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी रुम नंबर २६, फातिमा हाउस, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मोगल लेन, बेडेकर सदन जवळ, माहीम, मुंबई - ४०००१६ येथे किंवा ७२०८०५०४२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.