अनिल भागवत ईश्वर, पूजा, भक्ती ही वैयक्तिक गोष्ट आहे. लग्न करण्यापूर्वी त्याविषयी घरातल्यांचे, घरात येणाऱ्या नववधूचे विचार काय आहेत. घरात देवपूजेला, उपवासांना, सणसमारंभ, उत्सवांना किती महत्त्व आहे, किंवा नाही. ते करायचे की नाहीत? किती प्रमाणात या सगळ्यांचा विचार व्हायला हवा. समंजस कुटुंबाचा तो पाया आहे. विचारांतील स्पष्टतेसाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी ते महत्त्वाचे आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं मर्म एकच. चांगल्या-वाईट अनेक गोष्टी प्रत्येकाच्या वाटय़ाला आयुष्यभर येणार. त्यांची हाताळणी कशी करायची हे दुसरी कुठचीही शक्ती किंवा व्यक्ती ठरवणार नसते. ते प्रत्येकाने स्वत: ठरवायचं असतं. त्यासाठी त्या गोष्टींच्या सगळ्या अंगांचा अभ्यास प्रत्येकाला स्वत:लाच करावा लागतो. तो अभ्यास करण्यासाठी जीवनभर स्पष्ट विचारांची साथ लागते. ‘जीवन’भर स्पष्ट विचारांची ‘साथ’ म्हणजे जीवनसाथ! स्पष्ट विचारांच्या साथीने आता ईश्वर, धर्म, जात आणि विवाह याबद्दल बोलू या. मन:शांती ही प्रत्येकाची सतत असणारी गरज आहे. ती मिळवण्यासाठी प्रत्येकाला स्वत:ला काय शक्य आणि काय अशक्य हे कळण्याची जरूर असते. जे शक्य ते करायला थेट सुरुवात करायची. त्याचबरोबर जे अशक्य ते विसरायला सुरुवात करायची. कारण लग्नानंतर जातीधर्मावरून तुमच्यात वाद होणं संसारच विस्कळीत करणारा ठरू शकेल. त्यासाठी लग्नापूर्वीच देवधर्म, कुळाचार, जाती, धर्माविषयीची एकमेकांची मते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या घरातल्या साधारणपणे बंधनमुक्त वातावरणामुळे देवाच्या अस्तित्वाबद्दल धर्म, जाती यांच्याबद्दल माझे विचार लवकर सुरू झाले. चौदाव्या वर्षांपर्यंत विचार बरेच स्पष्ट झाले. पंधराव्या वर्षी मी घरात जाहीर करून टाकलं की, देव, सण, उत्सव या कशात यापुढे मला धरू नये. अशा तऱ्हेने माझा सत्यशोधक विवेकनिष्ठ म्हणून प्रवास चक्क तेराव्या वर्षी चालू झाला. सत्यशोधक या शब्दात दडलेला अर्थ म्हणजे ‘पटेपर्यंत अमान्य आणि पटलं की बदलण्याची तयारी’ हे कळलं. माझ्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी ‘विक्षिप्त’ हा शिक्का पक्का झाला. सत्यशोधक विवेकनिष्ठ विचार म्हणजे नेमकं काय हे जरा सविस्तर सांगतो. विवेकनिष्ठतेचे निकष स्वस्थ समाजासाठी सात ‘स’ची शिफारस केलेली आहे. १. स्वार्थ - प्रत्येकाला स्वत:ची काळजी घ्यायलाच लागते. नाही तर समाजातले इतर ‘स’ शक्यच होणार नाहीत. २. सभ्यता - प्रत्येकाबरोबर सभ्य वागणूक. ३. समज - परिस्थितीचं आकलन म्हणजेच समज अत्यावश्यकच आहे. ४. समतोल - तो सतत साधत पुढे जावं लागतं. ५. संघटना - या सगळ्यासाठी माणसं जोडावीच लागतात. ६. स्पष्टपणा - स्वत:चे विचार प्रत्येकाने स्पष्टपणे मांडावेच लागतात. विचार न बोलता लपवला तर घोटाळे होतात. ७. समाधान - समाजात या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या तरच समाधानी समाज निर्माण होणं शक्य आहे. समाधान मिळवण्यासाठी याशिवाय दुसरा मार्गच असू शकत नाही. नुसतंच बोलण्यासाठी, बोलण्यापुरतं काहीच नसतं. सगळं असतं ते आचरणासाठी. थिअरी निराळी आणि प्रॅक्टिस निराळी ही कल्पना डोक्यातून काढून टाकायची आहे. ज्या काळात आम्ही भावंडं वडिलांना प्रश्न विचारायला लागलो तेव्हापासून वडील देवपूजा करताना कधी बघितले नाही. ते म्हणायचे, कुठच्या तरी अदृश्य शक्तीवर त्यांचा विश्वास आहे, पण मूर्तिपूजेवर नाही. देव मानणं आणि मूर्तिपूजा यातला फरक मला तेव्हा समजला. अमूर्त देव मानणाऱ्या माणसाला काहीच करायचं नसतं. याउलट मूर्तिपूजा मानणारी व्यक्ती रोज प्रत्यक्ष पूजा करताना दिसते. हा अभ्यास वैवाहिक आयुष्यालाच फक्त उपयोगी असं समजायचं कारण नाही. एखाद्या माणसाने लग्न करायचं नाही असं ठरवलं तरी आयुष्यासाठी तो उपयोगीच असतो. नुसतं बोलण्यासाठी, बोलण्यापुरतं काहीच नसतं. सगळं असतं ते प्रत्यक्ष करण्यासाठी असतं. हे अनेकांना जमत नाही. ईश्वर, पूजा, भक्ती ही वैयक्तिक गोष्ट आहे, सामाजिक नाही. लग्न करण्यापूर्वी त्याविषयी घरातल्यांचे, घरात येणाऱ्या नववधूचे विचार काय आहेत. घरात देवपूजेला, उपवासांना, सणसमारंभ, उत्सवांना किती महत्त्व आहे, किंवा नाही. करायचे की नाहीत? किती प्रमाणात या सगळ्यांचा विचार लग्नापूर्वीच महत्त्वाचा आहे. समंजस कुटुंबाचा तो पाया आहे. विचारांतील स्पष्टतेसाठी ते महत्त्वाचे आहे इंग्रजीतला ‘अॅग्नॉस्टिक’ हा शब्द अर्थपूर्ण आहे. त्याचा अर्थ ‘देव आहे का नाही हे मला माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही हे मला माहिती आहे.’ याविषयी अभ्यास केल्यावर समोरचा माणूस देव मानतो का नाही हे समजून घेण्यातला माझा रस संपला. तो माणूस सगळ्यांशी कायम सरळपणी, सज्जनपणी वागतो की नाही या एका गोष्टीत मला रस असतो. ते वागणुकीवरून कळतं. बोलण्याची गरज नसते. आता थोडं धर्माविषयी आणि विवाहानंतरच्या आयुष्याविषयी बोलू या. सत्यशोधकांच्या दृष्टीने हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू ही नुसती दुसऱ्याशी चांगलं वागण्याच्या ठरावीक प्रकारांची नावं आहेत. त्याचा सारांश एकच आहे. प्रत्यक्षात धर्माच्या वेडामुळे झालेल्या इतिहासातल्या कत्तली, युद्धं, अत्याचार बघितले की धर्म या मूळ कल्पनेच्या अंमलबजावणीतली घोडचूक लक्षात येते. धर्मभावनेचा सामूहिक उन्माद याचा प्रताप भारताने भरपूर भोगलेला आहे. याच पद्धतीने जात या विषयाची परिस्थिती जरा बघू या. मुलं-मुली सुरुवातीला संकोच करतात, पण नंतर मनातलं बोलतात. जोडीदार निवडताना त्यांना जात समजून घ्यायची असते. मानववंशशास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे मानवाच्या मूळ गुणधर्माप्रमाणे तीनच जाती. कॉकेशियन, मंगोलियन आणि निग्रॉइड. त्या तीन जातींचा उगम माहितीच नाही. भारतीयांच्यात तर हे तीनही रंग आणि प्रकार मिश्र प्रमाणात आढळतात. या अर्थाने संपूर्ण भारत देश मिश्र जातींचा म्हणजे म्युलाटोंचा आहे. हे एवढय़ासाठी अधोरेखित करून सांगण्याची आवश्यकता आहे, की जोडीदाराची निवड करताना मिश्र जातीच्या मुलींना खूप त्रास होतो. मुलग्यांना तेवढा त्रास होत नाही. ही सगळी माहिती अशासाठी की त्यामुळे निदान आपणच श्रेष्ठ, भारतीय संस्कृती सर्वात जुनी नि श्रेष्ठ, अमुक जात श्रेष्ठ नि तमुक खालची ही विधानं डोक्यातून जावीत. मुळात जात कशी ठरवणार? सध्याचे गुण महत्त्वाचे की पूर्वजांची जात महत्त्वाची? किती पिढय़ामागचे पूर्वज? याचं पटणारं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. त्याखेरीज वंश तपासण्याचा प्रयत्न फक्त पुरुषाचाच ही कल्पनादेखील चूक आहे. आनुवंशिकतेचे गुण आईकडूनही येतात. धर्मभावना बोथट करणं जरा तरी शक्य आहे, पण जातभावना त्या तुलनेत फार चिवट असते. ‘जात जाता जात नाही’, हेच दिसतं. मुळात कामाच्या प्रकारावरून जाती ठरल्या. लग्नापूर्वीच याविषयीची स्पष्टता असल्यास विचारातला भेदभाव नाहीसा करता येईल. जोडीदार शोधताना ‘अमुक वर्णनाचा’, तमुक स्वभावाची’ अशी इच्छा कोणी केली तर त्यात गैर नाही. पण ‘जात’ या विषयाबद्दल मनात आणलं तरी पुरेशी माहिती मिळूच शकत नाही. जी माहिती मिळू शकते तिला फारसा अर्थ नसतो. माझ्या आणि शोभाच्या सामाजिक कामामुळे आमचा जनसंपर्क खूप आहे. मला दिसतं त्याप्रमाणे समाजातले अनेक जण जातधर्माबद्दल दुराग्रही बनले आहेत. मी एका महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोचलो. तुम्ही तुम्हाला हवं ते करा. पण ‘मी - त्यात - नाही’. hianildada@gmail.com chaturang@expressindia.com