काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘मानवत-खून’ प्रकरणावर आधारलेली कथा तेंडुलकरांनी ‘एनएफडीसी’च्या स्पर्धेसाठी लिहिली होती. अमोल म्हणाला, ‘‘पटकथा घुसमटवणारी आणि म्हणूनच आव्हानात्मकसुद्धा आहे. आपण हा चित्रपट करू या.’’  निर्मितीसाठी ‘ज्ञ फिल्म्स’ नावाची कंपनी काढली, चित्रपटाचं ‘आक्रीत’ हे नावही पक्कं केलं आणि आम्ही पुढल्या कामाला लागलो. ‘आक्रीत’ चित्रपटाविषयीचा भाग १

समांतर चित्रपटांची चळवळ सुरू होऊन दशक लोटलं होतं, पण त्या चळवळीचा महत्त्वाचा भाग मानला जाईल असा चित्रपट बनवण्याचं, अमोलचं व माझं स्वप्न मात्र फक्त आणि फक्त स्वप्नच राहिलं होतं. अर्थात चिकाटी, जिद्द, वेडेपणा, मूर्खपणा अशा आमच्या अनेक ‘सदगुणां’पायी आम्ही ते स्वप्न अजिबात धूसर होऊ  दिलं नव्हतं. पण त्यावर ‘शेख मोहम्मदी’ असा शिक्का कायमचा बसू नये यासाठी हातपाय अधिक जोरात हलवण्याची वेळ आली होती.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

एव्हाना ‘निर्मात्यांच्या चित्रपटनाशाच्या विविध क्लृप्त्या’ या विषयावर प्रबंध लिहावा, इतकी माहिती आमच्या अक्कलखाती जमा झाली होती. तिच्या आधारे (नेहमीप्रमाणे!) खूप विचार व चर्चा करून आम्ही ठरवलं की प्रथम निर्माता मिळवण्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या पसंतीचा विषय निवडून, हक्काची पटकथा बनवणं अधिक शहाणपणाचं ठरेल. आणि, आमची जवळीक असलेल्या विजय तेंडुलकरांना आमच्या एका आवडत्या कथेवर ती लिहून देण्याची गळ घातली. त्यांनी लिहिलेली पटकथा वाचल्यानंतर, तिच्यात कथेतला उपहासात्मक विनोद व जिवंतपणा उतरला नाही, असं आम्हाला वाटलं, पण तेंडुलकरांविषयीच्या आदरामुळे त्यांना हे कसं सांगावं, ते कळेना. तेंडुलकरांचा मोठेपणा असा की ‘अहम्’चा प्रश्न उभा न करता, स्वत:च्या ज्येष्ठपणाचं आमच्यावर दडपण न आणता, पटकथा जमली नाही हे त्यांनी आपणहून स्वीकारलं व त्याऐवजी आधी लिहिलेली वेगळी पटकथा देऊ  केली.

काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘मानवत-खून’ प्रकरणाच्या बीजावर आधारलेली ही दुसरी पटकथा तेंडुलकरांनी ‘एनएफडीसी’च्या स्पर्धेसाठी लिहिली होती. तिला पुरस्कारही मिळाला होता. एकदा गप्पा मारता मारता त्यांनी मला सांगितलं होतं, ‘‘श्याम (बेनेगेल) व गोविंद (निहलानी) दोघांनाही पटकथा आवडली, पण अति गंभीर व घुसमटवणारी वाटली.’’ आम्ही ती लगेच मागवून वाचली. पटकथेतली मुख्य पात्रं होती, गावचा मग्रूर, बाहेरख्याली सरपंच मुगुटराव आणि त्याची पारधी रखेल रुही. पत्नीला झिडकारून रुहीला ‘ठेवणाऱ्या’ मुगुटरावाची नजर तरुण नर्सकडे वळल्यावर, तारुण्य ओसरलेली रुही, तिला मूलबाळ नसल्यामुळे भविष्याविषयी अत्यंत असुरक्षित होते.. मूल होण्याच्या आशेने, एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून लहान मुलींचे खून घडवते. हे कथासार घेऊन तेंडुलकरांनी, जातीजमातींच्या उच्च-नीच अशा वर्गवारीतून व अंधश्रद्धेतून निर्माण होणाऱ्या हिंसेची चिकित्सा केली होती. अमोल म्हणाला, ‘‘पटकथा घुसमटवणारी आणि म्हणूनच आव्हानात्मकसुद्धा आहे. आपण हा चित्रपट करू या.’’

पटकथा निश्चित होताच मित्रांबरोबरच्या चर्चेला उधाण आलं व तेंडुलकरही तिच्यात उत्साहाने सहभागी झाले. सर्वानुमते ठरलं की ‘सर्जनप्रक्रियेत अजिबात लुडबुड न करणारा, लोकांचे पैसे न बुडवणारा, अतिशय प्रेमाने चित्रपट तडीला नेणारा, ‘आदर्श’ निर्माता आपणहून चालत येणार नाही. तो शोधून सापडेपर्यंत म्हातारे होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही त्या भानगडीत न पडता स्वत:च निर्मिती करावी.’ हा ठराव पटण्याजोगाच असल्यामुळे मी वाद न घालता, सर्वाचं हवं-नको पाहात, गृहिणीपणा करत मान डोलावत होते. इतक्यात, ‘‘निर्माती चित्रा असावी’’ असं कोणीतरी सुचवलं व सर्वानी त्याला चक्क दुजोरा दिला. आणि खरं सांगते, आपल्यात ‘आदर्श’ निर्मात्यांचे गुण आहेत हे समजल्यावर जरी मी खूश झाले तरी अचानक इतकी मोठी जबाबदारी अंगावर पडल्याने हवालदिलही झाले. नावाआधी ‘निर्माती’ हा शब्द निव्वळ मिरवण्यापुरता जोडणं मला बिलकूल पटण्यासारखं नव्हतं. पण ‘आदर्श’ असण्यापलीकडे निर्मात्यांची नेमकी कामं कुठली, ती कशी करायची हे अजिबात ठाऊक नव्हतं. बाबा माजगांवकर, विलास वंझारी, हैदर अली इत्यादी चित्रपट क्षेत्रात वावरलेल्या मित्रांनी, ‘‘सगळी कामं समजावून देऊ, मदत करू’’ असा दिलासा दिल्यावर व विजय शिर्के या ‘अनिकेत’च्या नाटकांची निर्मिती-व्यवस्था पाहणाऱ्या आमच्या जिवलग मित्राने ‘‘चित्रीकरणाच्या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी घेतो,’’ असं म्हटल्यावरच माझ्या जिवात जीव आला! निर्मितीसाठी ‘ज्ञ फिल्म्स’ नावाची कंपनी काढली, चित्रपटाचं ‘आक्रीत’ हे नाव पक्कं केलं आणि आम्ही पुढल्या कामाला लागलो.

मुगुटरावसारख्या खलनायकाची भूमिका अमोलने तोवर केलेल्या गोड, विनोदी भूमिकांपेक्षा इतकी वेगळी होती की ती केल्यावाचून राहणं त्याला शक्यच नव्हतं. तेंडुलकरांच्या मनातली रुही, स्थूल व रूपरंगात देखणेपणाचा अंशही नसलेली पारधी बाई होती. त्या काळी स्मिता पाटील सोडल्यास बहुतेक चांगल्या मराठी नायिका गोऱ्यागोऱ्या व ब्राह्मणी दिसणाऱ्या असल्यामुळे चटकन कोणाचं नाव सुचेना. चर्चा चालू असताना अचानक तेंडुलकर म्हणाले, ‘‘अमोल, इतर कोणी कशाला? तू हिलाच घे. ही रुही उत्तम वठवेल.’’ ते माझ्याविषयी बोलत आहेत, हे क्षणभर मला कळलंच नाही. ते लक्षात आल्यावर तेंडुलकरांनी माझं नाव सुचवावं, याचा आनंद झाला त्याचबरोबर आश्चर्यही वाटलं. त्यांना माझ्याविषयी प्रचंड आस्था आहे, याची मला खात्री होती पण मी (‘लोभ नसावा..’ हे भाषांतरित नाटक सोडल्यास) त्यांच्या कुठल्याही नाटकात काम केलं नव्हतं, आणि इतरांच्या नाटकांतल्या माझ्या अभिनयाविषयी त्यांनी चांगलं-वाईट काहीही कधी म्हटल्याचं निदान मी ऐकलं नव्हतं! अमोलने त्यांची सूचना ताबडतोब स्वीकारली. आणि, ‘‘आता जर तेंडुलकर कौतुक करत आहेत, तर उगाच नको ते प्रश्न खोदून काढून स्वत:च्या पायावर धोंडा का पाडून घ्या?’’ असा सुज्ञ विचार करून मी रुहीचं (आणि, त्या भूमिकेसाठी आठएक किलो वजन वाढवण्याचं) आव्हान स्वीकारलं. प्रायोगिक नाटकातल्या कलाकारांशी असलेल्या जवळिकीमुळे इतर महत्त्वाच्या पात्रयोजना करणं कठीण नव्हतं. आमचा जिवलग मित्र

दिलीप कुलकर्णी व साहाय्यक विलास वंझारी हे रुहीच्या विश्वासातल्या पारध्यांच्या, रेखा सबनीस मुगुटरावांच्या पत्नीच्या व राणी सबनीस रुहीच्या बहिणीच्या भूमिकेत चपखल बसले.

चित्रपट माध्यमात तंत्रज्ञ हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात, याचं पक्कं भान मला होतं आणि, बाबा माजगांवकर सोडल्यास आमच्यापैकी कुणीही चित्रपटाचं पद्धतशीर शिक्षण घेतलं नाहीए, याचंही! मी अधिकृत निर्माती असल्याने, (‘बायकोची लुडबुड’ असा शिक्का बसल्याशिवाय) कुठल्याही बाबतीत चिंता व्यक्त करण्याचा, वाद घालण्याचा, सूचना करण्याचा हक्क मला होता. त्याचा फायदा घेऊन मी अमोलला म्हटलं, आपण चित्रीकरणासाठी के. के. महाजन व नेपथ्यासाठी बन्सी चंद्रगुप्त यांनाच घ्यायचं. दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम मानले गेले होते; समांतर चित्रपटांचा आधार होते; शिवाय आमच्या अतिशय चांगल्या ओळखीचे होते. तंत्रज्ञांच्या बाबतीत आमचं एकमत झालं आणि त्यांनी होकारही दिला. आता महत्त्वाचं काम राहिलं ते चित्रीकरणासाठी योग्य ठिकाणं शोधण्याचं! शिर्के, मी, अमोल व विलास बन्सीदांना घेऊन साताऱ्याजवळचं एखादं छोटं गाव शोधण्यासाठी निघालो. शिर्के म्हणाला, ‘‘प्रकाश कुलकर्णी नावाच्या माझ्या मित्राचं, खोपोलीहून थोडय़ा अंतरावर जांभूळपाडा गाव आहे. ते बघून मग पुढे जाऊ या.’’ वाटेत प्रकाशला उचलून आम्ही जांभूळपाडय़ाला गेलो आणि नदीकाठी वसलेलं ते चिमुकलं सुंदर गाव पाहून आम्हीच काय, बन्सीदादेखील थक्क झाले! वाडय़ाचं भलंमोठं प्रवेशद्वार; जुनं, लाकडी जिन्याचं एकमजली घर व त्याच्यामागे छोटीशी विहीर, अशी चित्रीकरणासाठी आवश्यक ठिकाणं तर गावात होतीच, पण चित्रपटात अत्यंत महत्त्वाचं असलेलं प्रचंड मोठं पिंपळाचं झाडदेखील होतं.. तेही चित्रीकरणात अडचण येणार नाही अशा मोकळ्या जागेत! प्रकाशमुळे गावकऱ्यांनी खूप प्रेमाने आपापल्या जागा देऊ  केल्या. बन्सीदा खूश होऊन म्हणाले, ‘‘रुहीच्या घरात थोडं जुनं फर्निचर मांडलं, पिंपळामागे कच्ची भिंत बांधून ते रुहीच्या आवारातच असल्यासारखं भासवलं की झालं! ते तुम्ही स्वत:च करू शकता. बाकी सगळ्या गोष्टी इथेच आहेत, त्यामुळे माझी आवश्यकताच नाही.’’ अथपासून इतिपर्यंत संपूर्ण चित्रीकरण होऊ  शकेल, अशी जागा मुंबईहून इतक्या जवळच्या अंतरावर मिळावी, हे आमच्या पथ्यावरच पडलं. त्या काळात, ‘एनएफडीसी’कडून चित्रपटासाठी कर्ज घेतलेल्या निर्मात्यांचे अनुभव बरे नव्हते. चित्रपट प्रदर्शित करण्याची कुठलीच सोय ‘एनएफडीसी’पाशी नसल्यामुळे तो डब्यात पडून राही व निर्माता कर्जबाजारी होई. त्यामुळे आपण स्वत:च पैसे उभे करून अत्यंत कमी खर्चात चित्रपट बनवायचा, असं आम्ही ठरवलं होतं. खर्च वाचवण्यासाठी सलग ४० दिवसांच्या चित्रीकरणाचा बेत आखला. मुंबईहून निघायला तीन-चार दिवस असताना निघण्याच्या तारखेची आठवण करण्यासाठी मी के के महाजन यांच्या घरी फोन लावल्यावर, ते कृष्णा शहांच्या चित्रीकरणासाठी परगावी गेले असून कधी परतणार हे माहीत नाही, असं सांगण्यात आलं.  घरच्यांकडून हॉटेलचा दूरध्वनी क्रमांक मिळवून ट्रंककॉल लावला, पण हॉटेलवर कुणीच भेटेना! अखेर केकेंनी कळवलं की शहांच्या चित्रीकरणात गोंधळ झाल्यामुळे ते कधी परतू शकतील सांगता येत नाही. हे ऐकल्यावर मला हार्टअटॅक येणंच बाकी होतं..

चित्रीकरणाच्या तारखा मागेपुढे करणं अजिबात परवडण्याजोगं नव्हतं! ए. के. बीरसारख्या अनेक ओळखीच्या, चांगल्या छायाचित्रकारांना अमोलने फोन लावले. चित्रपट करण्यात सर्वाना रस होता, पण शेवटच्या क्षणी सांगून ४० दिवसांसाठी कोण येणार? काय करावं हे कोणाला सुचेना. कठीण प्रसंगाला डोकं शांत ठेवून धैर्याने तोंड द्यावं, हे माहीत असूनही माझा धीर सुटत चालला होता..

 

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com