आपण आपल्या बागेत फुलांच्या झाडांसोबत भाजीपाला ही कसा पिकवू शकतो हे पाहणार आहोत. शहरात उपलब्ध जागेत बाग फुलवायची म्हणजे जागेची मोठी अडचण असते. कमीत कमी जागेचा अधिकाधिक उपयोग करून घेणं त्यासाठी बागेची मांडणी करणं, तसेच रोपांची कमी जागेत अधिकाधिक लागवड करणं याविषयीची कल्पकता आपणास स्वत: विकसित करावी लागते. ती सरावाने विकसित होत जाते.
कमी जागेचा वापर करताना कुंडय़ांमध्ये तीन पायरी पिकाची पद्धत अवलंबावी. जसे की एकाच कुंडीत मातीच्या खाली येतील अशी कुंदमुळे लागवड करावीत. उदाहरणार्थ रताळी, गाजर, मुळा, लाल मुळा, बिट इत्यादी. मूळवर्गीय भाज्यांची लागवड करावी. तर कुंडय़ाच्या वरच्या भागात वितभर वाढतील एवढय़ा पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, लेटय़ूस, सेलेरी, पार्सली याची लागवड करावी. तर कुंडीच्या मधोमध गुलाब, सदाफुली, झेंडू या फुलझाडांची किंवा फळभाज्याची म्हणजे मिरची, टोमॅटो, वांगी यांची लागवड करावी. जागेचा पुरेपूर वापरही होतो तसेच कुंडीतील पाण्याचे बाष्पीभवनही कमी होतं. लांब व रूंद आकाराचा मोठा पसरट ड्रम किंवा विटांचा वाफा असल्यास चार पायरी पिकपद्धती हे तंत्र वापरावे. त्यात कंदमुळं, भाजीपाला, फळवर्गीय झाडं किंवा फुल झाडं आणि वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. जागेचा अधिकाधिक वापर हेच खरे शहरी शेतीचे गुपीत आहे.
फळ झाडांची लागवड करताना कुंडी साधारणत: दीड ते दोन फूट खोल असावी आणि तेवढय़ाच व्यासाचा वरील पृष्ठभाग असावा. फळवर्गीय झाडांमध्ये आपण शेवगा, केळी, िलबू, कलमी अंजीर, बोर, अ‍ॅपल बोर, चेरी अशा झाडांची लागवड करू शकतो. ही झाडं वर्षभरात फळं देतात. तर कलमी आंबा, कलमी चिक्कू, सीताफळ, नारळ यास किमान तीन वर्षे वाट पाहावी लागते. तोपर्यंत त्यास वेळोवेळी छाटणी देणे गरजेचे असते. त्या दरम्यान आपण त्यातील मातीत पालेभाज्या लावून उत्पादन घेऊ शकतो.

sandeepkchavan79@gmail.com