सीमारेषेवर कार्यरत आपल्या कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या सनिकांचे मनोबल कायम मजबूत राहणे अत्यंत आवश्यक असते. ते टिकून राहण्यासाठी काही वेळा मदत करतात ती सीमारेषेवरील काही श्रद्धास्थानं तर काही प्रेरणास्थानं. भारत-पाक सीमारेषेवरील ‘बाबा चाम्लीयाल’ यांचा दर्गा असो, भारत-चीन सीमारेषेवरील ‘नथू-ला-पास’ येथील ‘बाबाजी का मंदिर’ असो, अरुणाचल प्रदेशातील ‘जसवंतगढ’ स्मृतिस्थल असो वा जैसलमेरजवळील तनोटराय मातेश्वरी मंदिर; या ठिकाणांनी येथील समíपत भावनेने काम करणाऱ्या जवानांना बळ दिलं, विश्वास दिला. ‘इतनी शक्ती हमें देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना’ अशी प्रेरणा देणाऱ्या या स्थळांविषयी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने.. ‘भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’ पहिलीला शाळेत जायला लागल्यापासून अगदी आजपर्यंत ही प्रतिज्ञा म्हणताना माझ्या मनात आपल्या देशाबद्दल अपार निष्ठेचा भाव आपोआप निर्माण होतो. भारत देश म्हणजे नेमका कोठून कुठपर्यंत आणि कसा पसरला आहे हे प्रत्यक्ष समजायला खरे तर पस्तिशी यावी लागली. पण तरीही प्रतिज्ञा म्हणताना मात्र देशभक्ती मनात ठासून भरलेली असायची. भारत देशाच्या तिन्ही बाजूस समुद्र असून उत्तरेस हिमालय आहे आणि त्यामुळे भारताला नसíगक सुरक्षिततेचा वारसा लाभला आहे, असेही भूगोलात शिकलो. पण प्रत्यक्ष सीमारेषा आणि सीमासुरक्षा म्हणजे काय हे कळायला बराच वेळ लागला. पण लहानपणापासूनच राष्ट्रगीत म्हणताना आणि प्रतिज्ञा म्हणताना माझा देश महान आहे हे अगदी मनातून वाटायचे. माझा देश आणि माझ्या देशाचे रक्षण करणारे जवान या दोन्हीवर माझी अपार निष्ठा होती. मनात त्यांच्याबद्दल असीम आदर असल्याचे मला कळायचे, हे मला आठवते. पुस्तकात वाचून निर्माण झालेली ही श्रद्धा प्रत्यक्षदर्शी त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आहे हे मला कळले ते भारतदर्शनासाठी भटकंती करताना. आम्ही साधारण १०-१२ वर्षांपूर्वी अमृतसरला गेलो होतो. भारत आणि पाकिस्तान ज्या ठिकाणी रस्त्याने एकमेकांना जोडले गेले आहे ती ‘वाघा बॉर्डर’ अटारी येथे आहे. वाघा बॉर्डरचे वैशिष्टय़ असे आहे की, येथे रोज सायंकाळी ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत होतो. या प्रसंगी सर्वात आधी भारत-पाकिस्तान सीमेवर असलेले फाटक उघडले जाते. दोन्ही देशांचे सनिक एकमेकांना हस्तांदोलन करून मत्रीने राहण्याची ग्वाही देतात. दोन्ही देशांचा ध्वज उतरविला जातो व अत्यंत आदराने ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदया च्यावेळी पुन्हा ध्वजारोहण होते. आम्ही अटारीला गेलो तेव्हा तेथील तापमान ४८ डिग्री होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, जयिहद’ अशा घोषणांनी देशभक्तीने भारावलेल्या त्या वातावरणात आम्ही स्वत:चे भान विसरून गेलो. त्यामुळेच आपण पाण्याने नव्हे, तर घामाने आंघोळलो आहोत हे आम्हाला कळलेच नाही. तेथे अनुभवले ते भारताबद्दलचे प्रेम आणि जवानांची देशनिष्ठा! त्यानंतर ५-६ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ‘सुंदरबन’ला गेलो होतो. तेव्हा गंगेच्या खोऱ्यातून आम्ही बोटीने बंगालच्या उपसागरात जात होतो. पलीकडे बांगलादेशचे जवान व अलीकडे भारतीय जवान बोटीतून भारतीय सीमारेषेवर तनात होते. महिनोन्महिने बोटीवर वास्तव्य करून आपले जवान तेथे गस्त घालतात व देशरक्षण करतात. तिथे मला कळले, माझा भारत देश म्हणजे काय आणि माझी मातृभूमी या सीमारेषांनी कशी बांधली गेलेली आहे ते. पुनश्च एकदा देश आणि देशाचे जवान यांच्यासाठी माझा ऊर अभिमानाने भरून आला. सीमारेषेवर कार्यरत आपल्या कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या या सनिकांचे मनोबल कायम मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपण विचलित झालो की मंदिरात जातो, दर्गा किंवा इतर धार्मिक स्थळे अगर निसर्गरम्य ठिकाणी जातो. मन आपोआप स्थिरावते. अशीच काही ठिकाणे आम्ही पाहिली व ऐकली आहेत. ही ठिकाणे सनिकांचे मनोबल टिकविण्यासाठीची प्रेरणास्थानं आहेत. आपल्या देशातली ही ठिकाणे सैनिकांचीही श्रद्धास्थानं ठरत आहेत. जम्मूपासून ४० कि.मी. अंतरावर सांबा जिल्ह्यत रामगढ भागात ‘बाबा चाम्लीयाल’ यांचा दर्गा आहे. हा दर्गा सीमारेषेपासून जवळ आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सेनेचे हे श्रद्धास्थान आहे. ‘बाबा चाम्लीयाल’ यांची कथा ३५० वर्षांपूर्वीची आहे. या दग्र्याबद्दल भारतीय व पाकिस्तानी दोन्ही सनिकांमध्ये अशी श्रद्धा आहे की बाबा दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करतात. दरवर्षी जूनच्या चौथ्या गुरुवारी येथे मेळा भरतो. त्यावेळी गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचे सन्य अधिकारी सन्मानाने ‘अमन की चादर’ दग्र्याला अर्पण करतात. त्यावेळी त्यांना सीमारेषेवर ‘पवित्र शरबत’ (साखर पाणी) व ‘शक्कर’ (पवित्र माती) देऊन स्वागत केले जाते. मग ते दग्र्यात येऊन चादर चढवतात. सनिकांमध्ये विश्वास निर्माण करतात. सलोखा वाढण्यासाठी मदत करतात. गेल्या वर्षी आम्ही सिक्कीमला गेलो होतो तेव्हा पूर्व सिक्कीममधील भारत-चीन सीमारेषा येथील सन्यतळ ‘नथू-ला-पास’ येथे जाऊन आलो. परत येताना आवर्जून थांबावे असे ठिकाण म्हणजे ‘बाबाजी का मंदिर’. बाबा हरभजन यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४१ला झाला. दहावी उतीर्ण होताच साधारण १९५६ ते ५७ मध्ये ते सनिक म्हणून सन्यदलात सामील झाले. १९६६मध्ये ते पंजाब रेजिमेंटचा भाग बनले. ४ ऑक्टोबर १९६८ रोजी नथूला पासजवळ घोडय़ांचा काफिला घेऊन जात असताना घसरून दरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाबा हरभजन एका सनिकाच्या स्वप्नात आले व त्यांनी स्वत:ची समाधी बनविण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना संतांचे स्थान दिले आहे. बाबा हरभजन यांना ‘नथुलाचा हिरो’ असेही मानले जाते. साहजिकच ते दरीत कोसळले, तेथे जवळच त्यांची समाधी बनवण्यात आली. १९८२ मध्ये येथे येणाऱ्या लोकांची व सनिकांची श्रद्धा बघून एक मंदिर बनवले आहे. आजही या मंदिरात रोज त्यांच्या गणवेषाची निगा राखली जाते व रोज त्यांच्या बुटांना पॉलिश करण्यात येते. येथील सीमा भागात तनात असलेल्या सनिकांची श्रद्धा आहे की अशा दुर्गम आणि कठीण भागात बाबा आपले रक्षण करतात. सीमा सुरक्षा दलच या मंदिराचे व्यवस्थापन पाहते. बाबा हरभजन यांना मरणोपरांत ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. अरुणाचल प्रदेश येथील चीन सीमा रेषेवर असेच एक स्मृतिस्थल आहे- ‘जसवंतगढ’. जसवंत सिंह रावत व त्यांचे दोन साथीदार या सनिकांनी १९६२ मध्ये झालेल्या चिनी आक्रमणाच्या वेळी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते रात्री ११.४० पर्यंत ३०० चिनी सनिकांना मारले. चीन सीमेवर ‘एमएमजी’ या संख्येने जास्त व दूपर्यंत गोळीबार करण्याची क्षमता असलेल्या शस्त्रास्त्रांसहित चिनी सन्य आले होते. जसवंत सिंह यांच्याकडे कमी क्षमतेची शस्त्रास्त्रे असूनसुद्धा त्यांनी चिनी सनिकांच्या नाकी नऊ आणले. चीनच्या सनिकांना वाटले एक मोठी सन्य तुकडीच आपल्याशी लढते आहे. परंतु नंतर चिनी सन्यांनी त्यांना शोधले व फासावर लटकवले. इतकं करूनसुद्धा चीनला अरुणाचल प्रदेश काही जिंकला आला नाही. नौरंग येथील युद्धाच्या नावाने हे युद्ध ओळखले जाते. आजही पूर्व सीमेचा रक्षणकर्ता ‘बाबा जसवंत सिंह’ यांची अमरगाथा येथे सांगितली जाते. जसवंत गढ येथील त्यांचे स्मृतिस्थल भारतीय सनिकांची फक्त शान आहे असे नाही तर सतत सीमारक्षणासाठी समíपत राहण्याची भावना जागृत ठेवण्याचे कामदेखील करते. जसवंत सिंह रावत यांनादेखील मरणोपरांत ‘महावीर चक्र’ देऊन गौरवित करण्यात आले आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वीच जैसलमेरला गेलो होतो. जातानाच भारत-पाक सीमेजवळील तनोट माता मंदिराला जायचे ठरवले होते. सीमा सुरक्षा दलाने येथे एक चौकी बांधली आहे आणि या मंदिराचे व्यवस्थापनदेखील सीमा सुरक्षा दल पाहते. जैसलमेरपासून १२० किमी दूर वाळवंटात स्थित असलेले मूळ तनोटराय मातेश्वरी मंदिर ११०० ते १२०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते. मामडिया घराण्यात इसवी सन ८०८ मध्ये माता आवडदेवीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर घडलेल्या अनेक चमत्कारी घटनांमुळे राजा तनुराय भाटी यांनी इसवी सन ८४७ मध्ये तनोट गडचा पाया भरला. इसवी सन ८८८मध्ये माता तनोटच्या कृपेने तनोट राज्य स्थापन झाले. कालांतराने हे राज्य जैसलमेरला हलविण्यात आले. परंतु माता तनोटरायचे मंदिर त्या ठिकाणीच होते. असं मानलं जातं की १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात या परिसरात पाकिस्तानने ३००० बॉम्ब टाकले. यापकी ४५० बॉम्ब तर मंदिराच्याच परिसरात पडले होते. परंतु यापकी एकही बॉम्ब फुटला नाही आणि मंदिराला थोडासुद्धा धक्का पोहोचला नाही. तनोट मातेमुळेच भारतीय सनिकांचे रक्षण झाले अशी इथे तनात असलेल्या सन्यदलात भावना निर्माण झाली व या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिरात न फुटलेले बॉम्ब लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. मंदिरातील वातावरण शांत, प्रसन्न व प्रेरक आहे. मंदिरासमोरील मंडपाच्या भिंतीवर मनोबल वाढविणारे तसेच जीवनमूल्य सांगणारे सुविचार लिहिलेले आहेत. सर्वच मनाला भावणारे! आपोआपच माणूस सभामंडपात ५ मिनिटे बसल्याशिवाय बाहेर येत नाही. मंदिरासमोर एकाच छताखाली पीर बाबांचा दर्गा आहे. समोर सन्यदलाने उभारलेला ‘विजयस्तंभ’ ‘झंडा उंचा रहे हमारा’ या विजयी विश्व गीताची आठवण करून देतो. मंदिरात येणारे पर्यटक व सनिक सर्वानाच हा विश्वास वाटतो की यापूर्वी जसे या मातेने १९६५ च्या युद्धात व लोंगेवाला येथील १९७१ मध्येदेखील आपल्या भूमीचे रक्षण केले तसेच यापुढेही करेल. ही अपार श्रद्धा आपल्या मनाला उभारी देते. सन्यदलालाही सतत प्रेरणा देते. अत्यंत धीरगंभीर, पण प्रसन्न मनाने आम्ही तेथून बाहेर पडलो. परतीच्या प्रवासात मनात विचार चालला होता. देशरक्षणाचे इतके महत्त्वाचे कर्तव्य पार पाडताना मनोबल वाढविण्याचे व मनाची स्थिरता जपण्याचे केवढे मोठे कार्य ही श्रद्धा स्थाने करीत आहेत. श्रद्धा असेल तर कृतीत बळ येते, बळकट व मन:पूर्वक केलेल्या कामात यश निश्चित असते. त्यामुळेच ही श्रद्धास्थाने अतूट आहेत. आज आपण आपापल्या घरी आनंदी आहोत व सुखी आहोत. कारण अशा या श्रद्धास्थानातून सनिकांचे मनोबल वाढते. तिथे येणारे पर्यटक व त्यांचा उत्साह पाहून सुरक्षा दलातील जवानांनाही प्ररेणा मिळते. येथे पर्यटकाचा जात-पात, श्रीमंत-गरीब या पलीकडे जाऊन फक्त एकच धर्म असतो, तो म्हणजे ‘भारतीय’. जवानांची समíपत भावनेने काम करण्याची वृत्ती पाहून आपले कर तेथे आपोआप जुळतात. परत येताना आपण आपोआपच समíपत भावनेने काम करण्याची प्रेरणा घेऊन येतो व स्वतला कामात झोकून देतो आणि मनात एकच प्रार्थना असते- ‘इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना’. डॉ. शुभदा राठी-लोहिया shubhada.lohiya@gmail.com