यशस्वी झालेल्या कोणत्याही बबलूला कधी कधी यशाचीही भीती वाटू शकते. कारण एकदा चांगले यश मिळाले की लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढतातच पण स्वत: त्याच्यासुद्धा स्वत:कडून अपेक्षा वाढतात. याचा ताण जास्त वाढला की पुन्हा परीक्षा आणि त्यात मिळणाऱ्या गुणांची धास्ती वाटू शकते. शाळा, महाविद्यालयांमधला अभ्यास, परीक्षा आणि त्यातले यशापयश याने अवघं आयुष्य व्यापलेल्या बबलू या कुणाच्याही घरात आढळणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘दशा’ याचा विचार या दुसऱ्या लेखात करतो आहोत. यशस्वी झालेल्या कोणत्याही बबलूला कधी कधी यशाचीही भीती वाटू शकते. कारण एकदा चांगले यश मिळाले की लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढतातच पण स्वत: त्याच्यासुद्धा स्वत:कडून अपेक्षा वाढतात. याचा ताण जास्त वाढला की पुन्हा परीक्षा आणि त्यात मिळणाऱ्या गुणांची धास्ती वाटू शकते.

या बबलूला अभ्यासाचा कंटाळा नसतो. अभ्यास आवडतोही. शाळेत साधारणत: त्याला चांगले गुण मिळत असल्याने ‘हुशार’ समजले जाते. पण दहावी, बारावी यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे आझे, म्हणजे परीक्षेत त्याने किती गुण मिळवावेत याच्याबद्दलच्या लोकांच्या आणि स्वत:च्या अपेक्षांचे ओझे त्याला गुदमरून टाकते. पेपर कसे जातील. गुण किती मिळतील याची भीती आणि आपल्या पुढच्या करिअरची काळजी त्याच्या मनात मोठी धास्ती निर्माण करते. या धास्तीपोटी तो आणखी अभ्यास करू पाहतो पण मनाची एकाग्रता होत नाही. आपला अभ्यासच होत नाही असं वाटू लागतं. मग परीक्षेच्या आधी काही रात्री झोप लागत नाही. अपुरी झोप मनाची एकाग्रता, शांतपणा आणि स्मरणशक्ती या साऱ्यावर परिणाम करते. आत्मविश्वास डळमळीत होतो. परिणामी निकाल लागेपर्यंत हा बबलू भयंकर तणावाखाली असतो.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : भरकटलेल्या युद्धांचा पोरखेळ ..

आणखी एक बबलू असतो, ज्याला अभ्यास करायचाच कंटाळा असतो. त्याला गणित, विज्ञान, भाषांचे व्याकरण हे मुळात कच्चे राहिल्याने, नीट न समजल्याने प्रत्येक इयत्तेत वाढत जाणाऱ्या अभ्यासाचे काय करायचे हे कळत नसते. मग वेगवेगळे क्लासेस, टय़ुशन्स यांचे टाइमटेबल त्याला गरगरवीत ठेवते. हा बबलू ठोंब्या नसतो. पण सुरुवातीच्या कोणत्या तरी इयत्तेत त्याचे काही विषय मुळातून न कळल्याने नावडते झालेले असतात. कधी शिक्षक नीट शिकवणारे नसतात. कधी अति शिस्तीचे शिक्षक असतात, कधी हा बबलू मस्ती करतो -अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो किंवा दंगेखोर ग्रुपमध्ये असल्याने तो शिक्षकांच्या मनात ‘वाईट विद्यार्थी’ या शिक्क्याखाली राहतो. मग हा बबलू त्यातल्या त्यात मार्ग काढतो तो घोकंपट्टीचा प्रश्न आणि उत्तर सगळेच पाठ करायचे. असे अनेक बबलू आहेत, जे गणितंही पाठ करतात. आता पेपरामध्ये तेच प्रश्न आले तर बबलू उत्तरं लिहू शकतो. पण प्रश्न जरा फिरवून विचारला तर त्याचा क्लीन बोल्ड होतो. ‘तू कुणाचा मुलगा, असा प्रश्न ‘तुझं नाव काय?’ या प्रश्नाऐवजी आला की बबलू भयंकर घाबरतो. त्याला उत्तर येत नाही. त्याने केलेल्या पाठांतरात हे असलं काही नव्हतं. मग त्याचा आत्मविश्वास कमी होतो. धास्ती वाढते. त्याचा स्मरणावर परिणाम होतो. पाठ केलेल्यातलं एखादं वाक्य विसरलं की पुढचं काहीच आठवेनासं होतं. परिणामी पेपर नीट लिहिता येत नाही. ‘घोका आणि परीक्षेत ओका’ या पद्धतीने केलेला अभ्यास एखाद्या परीक्षेत यश देतो. पण सर्व परीक्षेत खात्रीने यश देत नाही. गुणांसाठीच पाठांतर केल्याने परीक्षा झाल्यावर बबलूची पाटी कोरी होते. मग अशा एखाद्या बबलूला पदवी परीक्षेनंतर नोकरीसाठी मुलाखत देताना त्याच्या विषयातल्या अगदी साध्या-सोप्या प्रश्नांचे उत्तरही देता येत नाही. कारण विषयाचे न समजून घेता केलेलं पाठांतर परीक्षेनंतर विस्मरणात जाते.

आणखी एक बबलू असतो, ज्याला शाळा, कॉलेज, अभ्यास, परीक्षा या साऱ्याचा भयंकर राग येतो. प्रचंड वैताग येतो. आपल्याला अभ्यास करायला सांगतात याचा त्याला आपल्यावर केवढा अन्याय होतोय असंच वाटतं. आपण आपलं दोस्तांबरोबर इकडे तिकडे भटकावं, मस्ती करावी, हॉटेलमध्ये चमचमीत खावं, ब्रॅण्डेड कपडे घालावे, नवा मोबाइल, नवे बूट, नवा गॉगल, नवी बाईक घेऊन मनाप्रमाणे हिंडावं, फिरावं, खावं, भटकावं, असं या बबलूला प्रकर्षांने नुसतं वाटत नाही तर त्याला तो त्याचा हक्कच वाटतो. बहुधा या बबलूचे त्याच्या आई-वडिलांनी, आजी, आजोबांनी नको एवढे लाड केलेले असतात. त्यामुळे स्वत:च्या अभ्यासाची कुठलीच जबाबदारी न घेता हा बबलू वयात येताना / आल्यावर मोठमोठय़ा मागण्या करू लागतो. खर्चासाठी पैसे मिळालेच पाहिजेत, अशी त्याची समजूत असते. घरून ते न मिळाल्यास लांडीलबाडी करून ते त्याला मिळवता येतात, हे त्याला त्याचे काही मित्र दाखवून देतात. हा बबलू मग वाईट संगतीत भरकटतो. अनेकदा त्याच्या घरच्या लोकांना याची माहिती मिळते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.

मग या मुलांनी काय करायचं? त्यांच्या आई-वडिलांनी काय करायचं? शिक्षकांनी काय करायचं? आपल्या घरातल्या मुलाला (यात मुलीही अंतर्भूत आहेत) आई-वडील आणि शिक्षक लहानपणीच शिकवू शकतात – मनावर बिंबवू शकतात की शिकणं सोपं असतं. शिकणं आवश्यक असतं. शिकण्याने अनेक गोष्टींची माहिती मिळते. ज्ञान मिळतं – जे आपण आपल्या रोजच्या जगण्यात थेट वापरू शकतो. आपण शिकताना काय शिकतो आहोत त्याबद्दल सावध राहायचे कारण नकळत बेसावधपणे आपण आपल्याला घातक, नुकसान करणारेही काही शिकू शकतो. कॉपी करणं, शाळेत-महाविद्यालयामध्ये न जाता इकडेतिकडे भटकणं, व्यसनं करणं, अभ्यास न करणं हेही कुठे तरी शिकूनच येत असतं. प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी ओळखून, स्वीकारून त्यानुसार वागणं अपेक्षित आहे. घरातले-समाजातले सगळे तसे वागतात. कुणी तसे नाही वागले तर समस्या तयार होतात.

शिकण्याने आपण मन-बुद्धी तल्लख करतो. आपण आपल्या क्षमता वाढवत नेतो. चांगल्या सुंदर जगण्यासाठी लायक बनतो. आपलं जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी शिकणं, अभ्यास करणं, तो उजळणी करून लक्षात ठेवणं, समजून घेतल्याने त्याबद्दल कुणालाही अगदी परीक्षेतही व्यवस्थित बरोबर सांगता येणं हे सारखंच एकमेकांशी निगडित आहे आणि आपल्या मनाला-बुद्धीला झेपणारं आहे. या जगात काही फुकट मिळत नाही. जगायचं तरी श्वास घ्यावा लागतो. पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागतं. श्रम – मेहनत करावी लागते आणि ते न्याय्य आहे! सहज आहे! आपल्या वयानुसार, क्षमतेनुसार जे ‘विहित’ ठरवलेलं कर्म-कार्य-काम असेल ते सर्वानीच करायला हवं. यानुसार विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवणं माहिती मिळवणं हे त्यांचं काम आहे. इयत्तेच्या कोर्सच्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला किती कळलं आहे हे त्याला कळावं म्हणून परीक्षा असते. येत असलं, समजलं असलं तर परीक्षेत उत्तर लिहिता येतात, प्रयोग करता येतात. त्यात घाबरण्यासारखं, ताण घेण्यासारखं काही नसतं. आणि सर्वच्या सर्व गुण मिळवण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण गुणांवर लक्ष केंद्रित न करता फक्त स्वत:च्या शिकण्या- समजण्यावर आणि व्यवस्थित अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करावं. मग कोणतीही परीक्षा असो उत्तरं लिहिता येतात आणि मग त्या मागोमाग यश येतंच! प्रत्येक घरातल्या बबलूला हे प्रेमाने समजावलं, त्याने हे आत्मसात केलं तर त्याला परीक्षेची भीती वाटणार नाही. जीव वगैरे देण्याचा विचार मनातसुद्धा येणार नाही!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in