सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेतीनशे वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या किल्ल्याचे बांधणीकौशल्य आणि त्यामागची शिवाजीमहाराजांची दूरदृष्टी विशद करणारा लेख.

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या पंचविसाव्या अध्यायात एक ऋचा आहे. शुन:श्येपाने केलेलं ते वरुणाचं स्तवन आहे. त्यात म्हटलं आहे- ‘हे वरुणदेवा! तुला तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे मार्ग ठाऊक आहेत अन् तुला सागरात संचार करणाऱ्या नौकांचे मार्गही ज्ञात आहेत.’ अशी आवाहने उषेला केली आहेत. अग्नीला केली आहेत. वेदकाळात समुद्रप्रवास, त्यातून होणारा व्यापार, त्यासाठी असणारी नौकांची गरज अशा साऱ्यांचीच जाण तत्कालीन समाजाला होती, हे यातून अधोरेखित होतं. जलाची, जलसंपत्तीची ही ओढ पुढील काळात अजूनच दृढ झालेली आपल्याला दिसते. वेद हे अपौरुषेय, मौखिक पद्धतीने आपल्यापर्यंत आले असे मानण्याची परंपरा आहे. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासात प्रारंभिक लिखित साधनांचा मान बौद्धांकडे जातो. त्यांचे निकाय अन् जातकांमध्ये समुद्राचे, समुद्र पर्यटनांचे उल्लेख आहेत. सागर पर्यटनासाठी निघालेल्या पूर्ण नामक एका व्यापारीपुत्राची कथा असलेल्या शूर्पारक जातकामध्ये सोपाऱ्याचा उल्लेख सूपलक्षण समुद्रप्रदेश असा आलेला आहे.
या कालखंडात जगभरात अन्य संस्कृतीही नांदत होत्या. जलमार्गानी भटकत होत्या. एकमेकांशी संवाद साधून होत्या अन् प्रसंगी संघर्षही करीत होत्या. हिंदुस्थानचा पश्चिम किनारा अशा अनेक संघर्षांचा साक्षीदार आहे. संघर्ष म्हणजे आक्रमणाचा अन् संरक्षणाचा विषय. स्वत:च्या संरक्षणांसाठी उपाययोजना करायची बुद्धी गुहेच्या दाराशी शेकोटी पेटवून स्वत:चे संरक्षण करू पाहाणाऱ्या आदिमानवालाही होती. कालानुरूप ती प्रगल्भही होत गेली. मृत समुद्राच्या उत्तरेला असलेल्या पॅलेस्टाइनमधील जेरिको सिटीमध्ये आढळलेली नवाश्मयुगीन तटबंदी हे याचेच द्योतक आहे. उत्तरकाळात बांधल्या गेलेल्या जगभरातील दुर्गाचे हे जणू आद्यरूप आहे.
सनपूर्व ४थ्या शतकात होऊन गेलेल्या कौटिल्याने जनपदाच्या संरक्षणासाठी असणारं दुर्गाचं महत्त्व अतिशय उत्तम प्रकारे अधोरेखित केलंय. हाच धागा धरून या कालखंडानंतर राज्यशास्त्राला धरून जी जी लिखाणे झाली त्या सर्वच ग्रंथांमध्ये दुर्ग हा विषय प्रामुख्याने चíचला गेलेला आहे.
हिंदुस्थानातील दुर्गबांधणीची सुरुवात मोहेंजोदारो अन् हडप्पा या संस्कृतींपासून झाली. या संस्कृतीचा वारसा सांगणारी सारीच शहरे ही तटबंदीने युक्त होती. बौद्धांच्या अंगुत्तरनिकाय या ग्रंथात वर्णन केलेली सोळाही महाजनपदे बलाढय़ अशा दुर्गानी संरक्षिलेली होती. हा देदीप्यमान वारसा मधला सारा काळ ओलांडून, समृद्ध होऊन शिवछत्रपतींपर्यंत येऊन पोहोचलेला आपल्या दृष्टीस पडतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सातवाहन, वाकाटक, त्रकूटक, आभीर, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव, बहमनी, दख्खनचे सुलतान या साऱ्यांनीच आपापल्या बकुबाप्रमाणे त्यात भरच घातली अन् हा वारसा अधिकाधिक संपन्न केला.
दुर्ग, गड वा किल्ला हा शब्द उच्चारताक्षणी कुणाही महाराष्ट्रीयाच्या डोळ्यांसमोर शिवछत्रपती हे नाव उभे राहते अन् मागाहून त्यांचा इतिहास. शिवछत्रपती हे व्यक्तिमत्त्व म्हणजे जणू राखेतून उभा राहाणारा फिनिक्स पक्षी. शून्यातून त्यांनी नूतन राज्याचा डाव मांडला अन् अवघ्या पस्तीस वर्षांच्या कालखंडात साडेतीनशे दुर्गाचा दुर्गाधिपती म्हणून जगभरात नावलौकिक कमावला. गमतीची गोष्ट म्हणजे यांपकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच दुर्ग त्यांनी स्वत: नव्याने रचले. यांपकी काही गिरिदुर्ग होते तर काही जलदुर्ग होते. दुर्गबांधणीत शिवछत्रपतींना अनन्यसाधारण गती होती. त्यांच्या देखरेखीखाली झालेली बांधकामे पाहताना याची प्रचीती येते. जिंजीचा जुना दुर्ग त्यांनी पाडून त्याजागी स्वत:ला हवा तसा दुर्ग नव्याने रचला. हे बांधकाम पाहून मदुरेस असलेला तत्कालीन जेसुईट आंद्रे फ्रेअर म्हणतो- he constructed new ramparts around Jinji, dug ditches, erected towers, created basins and executed all these works with such perfection which European art would not have denied. म्हणजे जिंजीची त्यांनी केलेली पुनर्रचना इतकी अचूक होती की, ती या तंत्रामध्ये सरस असलेल्या पाश्चात्यांच्या तोडीस तोड ठरली. हीच सफाई अन् हेच तंत्र त्यांनी जलदुर्गाची रचना करतानाही तितक्याच प्रभावीपणे वापरलं.
शिवकालीन कागदपत्रे पाहिली तर दिसते की, स्वराज्याच्या दोन कोटी होन इतक्या महसुलापकी जवळजवळ दीड कोटी होन इतका महसूल एकटय़ा तळकोकणामधून मिळत होता. जो विभाग इतक्या मोठय़ा प्रमाणात महसुली उत्पन्न देतो, त्याची काळजी घ्यायलाच हवी. त्यामुळे साहजिकच एक धोरणी राज्यकर्ता म्हणून त्यांनी कोकणाची नाकेबंदी करायला सुरुवात केली. राजधानी राजगडावरून कोकणात रायगडावर आणण्यामागचं हे एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. मात्र त्याआधी खांदेरीपासून तेरेखोलपर्यंत जलदुर्गाची एक माळ पश्चिम किनाऱ्यावर उभी राहिली होती. अन् यातला कौस्तुभमणी शोभावा तसा मालवणच्या किनाऱ्यापासून मलभर अंतरावर त्यांनी सिंधुदुर्ग उभारला. यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. समुद्रावर थमान घालणाऱ्या परकीय सत्तांना कमालीची जरब बसली अन् भविष्यात होणाऱ्या मुघलांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सागरी राजधानीसकट बचावाची दुसरी फळी उभी राहिली. कामंदकीय नीतिसार म्हणतं- सापसारणि दुर्गाणि भुव सानूपजान्गला:, निवासाय प्रशसन्ते भूभुजां भूतिमिच्छताम्.. म्हणजे जो देश भूमार्ग व जलमार्ग या दोहोंनी जोडलेला आहे, जो संकटसमयी राजास आपल्या प्रदेशातील दुर्गामध्ये सामावून घेतो, तो देश विजिगीषू राजासाठी उत्तम मानावा! अर्थात यात गिरिदुर्ग व जलदुर्ग हे ओघानेच आले.
सिंधुदुर्गाचं महत्त्व यातच आहे. एका विजिगीषू राजानं भविष्याचा वेध घेऊन केलेली ती रचना आहे. हा एक अभिनव प्रयोग होता. नव्याने जलदुर्ग बांधण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नव्हता. भौगोलिक मापदंड पार वेगळे होते. संसाधनांची जुळवाजुळव करणे गिरिदुर्गाच्या तुलनेत अवघड होते. कारण हे बांधकाम ऐन समुद्रात मलभर दूर असलेल्या बेटावर करायचे होते. मात्र हे आव्हान शिवछत्रपतींनी अन् त्यांच्या शिल्पींनी यशस्वीपणे पेलले. सुरत पहिल्यांदा धुतली अन् मिळालेली एक कोटी होनांची रक्कम त्या राजानं सिंधुदुर्गाच्या उभारणीत ओतली. मालवणच्या किनाऱ्यावर मोरयाचा धोंडा नावाचे एक स्थळ आहे, तेथे शिवछत्रपतींच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन झाले. कुरटे बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर सिंधुदुर्ग हा अप्रतिम जलदुर्ग बांधण्याचे काम इ. स. १६६४ ते १६६७ असे सुमारे तीन वष्रे सुरू होते. जवळजवळ तीन हजार कामगार तीन वष्रे अहोरात्र खपत होते. ३२ बुरुज, अडीच किलोमीटर्स लांबीची, तीस फूट उंच अन् दहा बारा फूट रुंद अशी तटबंदी, दोन भक्कम बुरुजांच्या मुठीतलं तसंच भक्कम महाद्वार, पश्चिमेला राणीच्या वेळेपाशी असलेली एक चोरवाट वा दिंडी दरवाजा ही अशी बाह्य़ रचना. ऐतिहासिक नोंदी सांगतात की, सिंधुदुर्गाचा पाया शिवछत्रपतींनी शिसे ओतून रचला. मोकळ्या दर्यावरला हा दुर्ग. समुद्राच्या उधाणास तोंड देत रात्रंदिवस उभा असणार. मग ते झेलायला बांधकाम अन् त्याचा पायाही तसाच मजबूत हवा. ही रचना त्या दुर्गपतीच्या साक्षेपास धरूनच आहे. इतर कुण्या दुर्गाच्या बांधकामात शिसे वापरल्याच्या नोंदी शिवकाळात तरी नाहीत. मात्र बहमनींच्या काळात पन्हाळ्याचा तीन दरवाजाचा काही भाग शिसे वापरून रचलेला आहे.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सिंधुदुर्ग पाहताना जाणवते. ती म्हणजे- याच्या तटबंदीसाठी वापरलेला दगड. कोकण किनाऱ्यावर बसॉल्ट दुर्मीळ आहे. येथे मिळतो तो जांभा, लॅटेराइट हा दगड तटबंदीसाठी कुचकामी. म्हणून कोकण किनाऱ्यावरील बहुतेक साऱ्याच जलदुर्गासाठी लागणारा दगड चाळीस पन्नास मल दूर असलेल्या सह्य़ाद्रीमध्ये दगडांच्या खाणी काढून आणवला गेला अन् मग त्यांची तटबंदी उभी राहिली. सिंधुदुर्गाच्या बाबतीत मात्र, बेटावरली भली मोठी टेकडी फोडून अन् त्याचे चिरे घडवून ही तटबंदी उभी केली गेली. सिंधुदुर्गाची प्रचंड तटबंदी पाहिली की, ही टेकडी किती मोठी असेल याची कल्पना कुणीही करू शकतो. हा दगडही ग्रॅनाइटच्या जातकुळीतला असावा कारण तो अतिशय कठीण आहे. आजही बेटावर कित्येक ठिकाणी खडक उघडा पडलेला आहे अन् तो तटबंदीत वापरलेल्या दगडांसारखाच आहे. यामुळे मुख्यत: वेळ अन् पसा यांचा अपव्यय टळला.
जलदुर्गाच्या बाबतीत त्या दुर्गामध्ये असणाऱ्या गोडय़ा पाण्याचे स्रोत हे सामान्यजनांच्या कुतूहलाचा विषय असतो की, भर समुद्रात गोडं पाणी म्हणजे आश्चर्यच. मात्र याचे उत्तर अतिशय सोपे आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी दुसरे हिमयुग संपल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली. सखल भाग पाण्याखाली गेले. उंचवटे पाण्यावर राहिले. त्यांची बेटे झाली. मग दुर्ग बांधताना नेहमीच्या जमिनीवर शोधतात त्याच तंत्राने पाणाडय़ांनी या बेटांवरचे पाण्याचे ठाव शोधून काढले इतकेच! अशा तीन गोडय़ा पाण्याच्या विहिरी सिंधुदुर्गावर आहेत. नावे आहेत दूधबाव, दहीबाव अन् साखरबाव अन् शिवाय दोन तलाव आहेत.
इतर कुण्याही दुर्गावर नाही अशी स्वये शिवछत्रपतींची वीरासन घातलेली मूर्ती असलेले एक मंदिर या दुर्गावर आहे. या मूर्तीसमोर एक तलवारही ठेवलेली आहे. असे सांगितले जाते की, ही मूर्ती स्वत: छत्रपती राजाराम महाराजांनी बसवली. याखेरीज महादेव, भवानी, महापुरुष, मारुती, जरीमरी अशा खास कोकणी दैवतांची मंदिरेही आहेत.
या दुर्गाच्या सभोवताली पद्मदुर्ग, राजकोट अन् सर्जेकोट असे तीन दुर्ग किनाऱ्याला धरून रचलेले आहेत. हे सिंधुदुर्गाचे युद्धसखे आहेत. मालवण बंदरापासून सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणारा जलमार्ग संपूर्णतया खडकाळ आहे. बहुधा दुर्ग बांधताना शिवछत्रपतींनी तो तसाच राहू दिला असावा. दुर्गाचे मार्ग सुगम नसावे, असतील तर ते मोडून दुर्गम करावेत असे रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात सांगितलेले आहे, त्यानुसार ही वाट तशीच दुर्गम ठेवली असावी. जेणे करून अनभिज्ञ शत्रू सुरुवातीलाच नामोहरम व्हावा.
याशिवाय धरित्रीमोलाची दोन स्मृतिचिन्हे या दुर्गावर आहेत. महाद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडल्या तटाच्या माथ्यावर दोन छोटय़ा घुमटय़ांमध्ये उजवा हात अन् डावा पाय असे दोन ठसे चुन्यात उमटवलेले आहेत. परंपरेने ते शिवछत्रपतींचे मानले जातात. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही दुर्गाच्या भाळी हे असे भाग्य नसावे. एकदा तरी तिथे जावे, त्यावर माथा टेकावा अन् धन्य व्हावे.
असे म्हणतात की, सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी पोर्तुगीज इंजिनीयरांची मदत घेतली गेली. मात्र याला ऐतिहासिक आधार नाही आणि विचार करू जाता हे पटतही नाही. कारणे दोन- एक म्हणजे ज्या राजाच्या शिल्पशास्त्र्यांनी राजगड, रायगड अन् प्रतापगडासारखी अप्रतिम दुर्गलेणी निर्मिली, ते तंत्रज्ञ दुर्गनिर्मितीच्या शास्त्रातले दिग्गजच असायला हवेत. अशा कुशल तंत्रज्ञांना इतरांच्या टेकूंची गरज पडेल, ही शक्यताही काहीशी अंधूक वाटते. दुसरी गोष्ट अशी की, पोर्तुगीज-मराठय़ांच्या पत्रव्यवहारातसुद्धा तसे उल्लेख कुठेही नाहीत. मात्र, राजांच्या आरमाराची गलबते उभारायला कल्याणच्या खाडीत तीनशे पोर्तुगीज कामाला होते, असे उल्लेख तत्कालीन कागदपत्रांमधून सापडतात. तत्कालीन फ्रेंच प्रवासी बाथ्रेलेमी कॅरे शिवछत्रपतींबद्दल म्हणतो, “Ever destined to conquer a part of the world, he had studied with extreme care everything the duty of a general & that of a soldier, above all fortification, which he understood better than the ablest of the engineers and geography of which he had made a special study and which he had mastered..!!
माझ्या मते, शिवछत्रपतींचं केलेलं हे विश्लेषण खूप मोलाचं आहे. एकतर ते एका समकालीन परकीयाने केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ते वस्तुस्थितीला धरून आहे. पूर्वसुरींकडून वारसा म्हणून आलेले दुर्ग सांभाळून त्यावर राज्य उभं करणं हा एक भाग झाला. मात्र, नवीन जागा हुडकून, त्यांचे लष्करी महत्त्व ओळखून तेथे नूतन दुर्गाची निर्मिती करणं यासाठी विचक्षण बुद्धिमत्ता असलेला राज्यकर्ताच लागतो. अफजलस्वारीच्या वेळी कोऱ्याकरकरीत प्रतापगडाने ते सिद्ध करून दाखवले. येथे सिंधुदुर्गाच्या संदर्भात एक गोष्ट ध्यानी घ्यायला हवी की, ज्या साडेतीनशे-चारशे दुर्गाचा सत्ताकेंद्रे म्हणून वापर करीत शिवछत्रपतींनी नूतन राज्याची निर्मिती केली, त्या दुर्गाची मांडणी त्रिस्तरीय होती. वर घाटावरले अन् सह्य़ाद्रीच्या ऐन कण्यावरले दुर्ग- त्यांचे नायकत्व राजगडाकडे. कोकणातील सह्य़ाद्रीतले दुर्ग- त्यांचे नायकत्व रायगडाकडे. अन् सिंधुसागर अन् त्याच्या तोंडाशी असलेली व्यापारी बंदरे अन् लष्करी ठाणी सांभाळणारी जलदुर्गाची रांग- त्यांचा नायक सिंधुदुर्ग.. अशी ही त्रिस्तरीय रचना होती.
दुर्गाची रचना दगडधोंडय़ांनीच होत असते. तोच चुना, तेच तट, तेच बुरुज, तेच वास्तुशास्त्र. कधी असलाच तर वास्तुमधील काही किरकोळ फरक. मात्र, ज्या कारणासाठी त्या दुर्गाची रचना- त्यामागचा विचार निरतिशय मोलाचा असतो. त्या- त्या दुर्गाचं वेगळेपण तो दुर्ग रचताना विचारात घेतलेल्या राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीत असते. सिंधुदुर्ग हा शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या डावातला इरेचा मोहरा होता. सारे आधार सुटल्यावर अखेरचा आसरा म्हणून त्या लोकविलक्षण राजाने विचारपूर्वक केलेली ही योजना होती. समुद्रावर सत्ता गाजविण्याच्या पूर्वनियोजित योजनेची ती जणू सांगता होती. ती शिवलंकेची निर्मिती होती!
डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर- discover.horizon@gmail.com

illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…