भारतीय योगशैलीने आता सबंध विश्व व्यापले आहे. योगदिनाच्या निमित्ताने त्याचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर होत आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतील ‘सेलिब्रेटीं’च्या योगातील सहभागामुळे त्याला प्रचंड वलयही प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांनी योगशिक्षणाच्या प्रसारासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले त्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांना योगाला आज प्राप्त झालेले हे ‘वलय’ पाहता यायला हवे होते. ते माझे वडील असले तरी योगशिक्षणात ते माझे गुरूही होते. म्हणूनच माझ्या सर्वागीण घडणीत त्यांचे योगदान माझ्याकरता अनमोल आहे.

योगाचार्य बी. के. एस. तथा बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराज अय्यंगार यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकातील बेल्लूर येथे (जिल्हा- कोलार) झाला. हा पहिल्या महायुद्धाचा काळ. तशात देशभर इंफ्ल्यूएन्झाची भयानक साथ आलेली. वडिलांना बालपणी त्याची लागण झाली. त्याकाळी हा रोग महाभयंकर समजला जाई. तशात त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. माझे वडील हे अय्यंगार कुटुंबातील नववे अपत्य होते. त्यांचे कुटुंब एकंदर ११ मुलांचे होते. माझे आजोबा शालेय शिक्षक होते. त्यावरून घरातील आर्थिक परिस्थिती काय असेल याची सहज कल्पना यावी. त्यात भरीस भर म्हणजे माझ्या वडिलांना क्षयाची बाधा झाली. त्याकाळी हे दोन्ही आजार राक्षसीच होते. त्यावर तेव्हा औषधोपचार जणू नसल्यातच जमा होते. घरची परिस्थिती आणि साथीचे आजारपण यामुळे त्यावेळी १३-१४ वर्षांचे असलेले माझे वडील अशक्तपणा, कुपोषण, औषधोपचारांचा अभाव यामुळे निराशेच्या खोल गर्तेत गेले नसते तरच नवल. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे थोरले मेव्हणे एकदा त्यांच्या घरी आले. त्यांनी या अशक्त, रोगग्रस्त मुलाला पाहिले आणि ते म्हणाले, ‘अरे सुंद्रा (माझ्या वडिलांचे नाव ‘सुंदरराज’ होते.), तू माझ्याबरोबर म्हैसूरला चल.’’ त्यांचे नावही कृष्णम्माचारी होते. ते योगोपचार करीत आणि योग शिकवीत. माझ्या वडिलांना आपल्या घरी नेण्यामागे त्यांचा हेतू हा होता, की याला घेऊन जाऊन थोडेफार जुजबी उपचार करावे आणि त्याच्याकडून मुख्यत: घरगडी म्हणून कामे करवून घ्यावीत. वडील त्यांच्यासोबत म्हैसूरला गेले आणि थोरल्या बहिणीकडे राहू लागले. कर्मधर्मसंयोगाने हा कालावधी केवळ सहा-आठ महिन्यांचाच होता. नंतर मेव्हण्यांनी वडिलांना धारवाडच्या दौऱ्यावर नेले. त्याकाळचे पुण्याचे सिव्हिल सर्जन व्ही. बी. गोखले हे कृष्णम्माचारींच्या धारवाडच्या या योगवर्गासाठी आले होते. गोखल्यांनी कृष्णम्माचारींकडे एका योगशिक्षकाची मागणी केली. माझ्या वडिलांना तेव्हा जुजबी इंग्रजी येत असल्याने त्यांना कृष्णम्माचारींनी गोखल्यांच्या विनंतीनुसार पुण्यास पाठविले.

D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Gopi Thotakura First Indian space tourist
गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

१९३८ चा तो काळ. त्याकाळीसुद्धा पुण्यातले घरभाडे वडिलांना परवडणारे नव्हते. पुणे कॅम्प परिसरात एका भुताने पछाडलेल्या घरात भाडेकरू मिळत नसल्याने ते त्यांना किरकोळ भाडय़ाने मिळाले. लग्नाआधी अनेक वेळा पूर्ण दिवस त्यांना कॉफी व पाण्यावर काढावा लागे. १९४२ साली जेव्हा त्यांनी संसार थाटला तेव्हा तर मेहनतीला मर्यादाच उरली नाही. पण तरीही त्यांनी योगविद्येचा सराव सोडला नाही. शरीराला वेदना व थकवा जाणवत असे. अशा वेळी आम्हा मुलांकडून ते हात, पाय, कंबर दाबून घेत असत. १९५१ ते १९६६ सालापर्यंत योगविद्या शिकविण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणच्या दौऱ्यांमध्ये जेवणाचे अतिशय हाल होत असत. त्या महिना-दोन महिन्यात त्यांचे वजन १५ ते २० पौंड कमी झालेलं असायचं.

पुण्यात योगविद्या शिकवायची म्हटल्यावर वडिलांनी स्वत:चीच शागिर्दी पत्करली. स्वयंयोगशिक्षण, त्यासंबंधीचे स्वतंत्र प्रयोग आणि शिकविणे सुरू झाले. योगाद्वारे त्यांनी स्वत:च स्वत:वर उपचार करून रोगांना पिटाळून लावले.

त्यांच्यामागचे दुर्भिक्ष्य संपले ते १९४३-४४ सालानंतर. तोपर्यंत त्यांनी पुण्यात स्थिरस्थावर होत आपल्या योगविद्येच्या आधारे इथे जम बसवला होता. एव्हाना आर्थिक विवंचनाही काहीशी कमी झाली होती. वयाच्या पस्तिशीनंतर तर आर्थिक संपन्नताही आली. योगासने-प्राणायामाने त्यांना केवळ स्वास्थ्य आणि आरोग्यच प्राप्त झाले नाही, तर दहा माणसांचे बळ, सामथ्र्य आणि उत्साह त्यांच्यात संचारला. त्यानंतरची ६० वर्षे त्यांनी इतके प्रचंड कार्य केले की सामान्य माणूस तीन-चार जन्मांतही तितके कार्य करू शकणार नाही. या वाटचालीत जगभरात जवळजवळ १२५ ते १५० अय्यंगार योग संस्था सुरू झाल्या. हा सगळा विश्वव्यापी पसारा त्यांनी लीलया सांभाळला. सुमारे दहा लाख जणांना त्यांनी योगदीक्षा दिली. परोक्ष-अपरोक्ष ६०-७० लाख विद्यार्थी घडवले. जागतिक स्तरावर योगशिक्षणाचे संपूर्णपणे एकहाती व्यवस्थापन करून त्यांनी चमत्कारच घडवला. ५५-५६ व्या वर्षी त्यांच्या शारीरिक क्षमतेबद्दल युरोपातील डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त करून त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्याही केल्या. त्यांची फुफ्फुसक्षमता १८-२० वर्षांच्या अ‍ॅथलीटला लाजवील अशी होती. पूर्वायुष्यात त्यांना फुफ्फुसांचा क्षय झाला होता हे आपल्याला अविश्वसनीय वाटत असल्याचे या डॉक्टरांनी कबूल केले. त्यांच्या बाबतीत दुसरी अविश्वसनीय वाटावी अशी गोष्ट म्हणजे मृत्यूसमयीखेरीज ते कधीही हॉस्पिटलची पायरी चढले नाहीत. अनेकांना वाटे की त्यांना ही शरीरसंपदा, स्वास्थ्य, आरोग्य आणि सामथ्र्य योगासने आणि प्राणायामाने प्राप्त झाले होते. मात्र, याबाबतीत ते म्हणत असत की, ‘योगासने-प्राणायामाचे स्वास्थ्य व आरोग्य हे अवांतर फळ असते. योगसाधना ही आरोग्यासाठी नसते, तर त्यातून जीवनामृत मिळते. जे ज्ञान-विज्ञानस्वरूप आणि आत्मानंदस्वरूप असते. या सगळ्या गोष्टींचे फलित म्हणजे स्वास्थ्य, आरोग्य, बल व सामथ्र्य होय. या बा रंगाला भुलून जायचे नसते. योगाचे प्रधान फळ म्हणजे आध्यात्मिक बल होय!’

परवा १४ डिसेंबर रोजी योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यांच्या जगभर सर्वत्र विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने अनेकानेक उपक्रम योजिले आहेत. पुण्यात माझे वडील व गुरू बी. के. एस. अय्यंगार यांनी १९७५ साली माझ्या आईच्या नावे ‘रमामणी अय्यंगार स्मरणार्थ योग संस्था’ स्थापन केली. जगभरच्या अय्यंगार योग संस्थांचे हे मूळ केंद्र होय. या संस्थेला या वर्षीचा भारतातील सर्वोच्च योग संस्था म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष. आणि हा बहुमान अय्यंगार योग संस्थेला दिला गेला. हा एक प्रकारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या अथक कार्याचाच सन्मान म्हणता येईल.

या शताब्दी वर्षांत संस्थेतर्फे काही उपक्रम आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. अय्यंगार गुरुजींनी त्रिमुखाने योग मांडला होता. एक म्हणजे योगाचा जागतिक पातळीवर प्रचार-प्रसार करणे. आणि त्यासाठी त्यांनी योगाचे व्यवहार्य अंग विकसित केले. योगाचे लोकाभिमुख आणि लोकोपयोगी अंग विकसित करून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार्य योग शिकविला. रोगोपचार, आरोग्य आणि स्वास्थ्य लोकांपर्यंत पोहोचविणे हा हेतू त्यामागे होता. हे काम व्यापक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी योगाच्या प्रचार-प्रसारार्थ अनेक विद्यार्थी जगभर घडवले. त्यातून योगविद्या जगभर झपाटय़ाने पसरली. त्यांचा प्रथम ग्रंथ ‘योगदीपिका’!  हा ग्रंथ याकामी मोलाचा दुवा ठरला. गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत योग देशभर सर्वदूर पोहोचवणे हा मुख्य प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

गुरुजींनी दुसरी वाहिनी हाताळली ती अशी.. त्यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेवर अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या पुस्तकांतील छायाचित्रांतून याची प्रचीती येते. त्यांनी योगासने कलेच्या अंगाने पेश केली. त्यांची योग-प्रात्यक्षिके म्हणजे एक अत्युच्च कलाविष्कार असे. त्यांना ‘योगातील मायकेलअ‍ॅन्जेलो’ अशी ख्याती युरोपात प्राप्त झाली होती. एखादा कवी काव्य करतो किंवा गायक बंदिशी बसवतो व पेश करतो तसे ते आसन संचलन करून लोकांना एका अनोख्या कलाविष्काराचा आनंद देत असत. त्यांच्या अप्रतिम योग-कलाविष्काराच्या अनेक ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. त्या लोकांपुढे पुनश्च मांडण्याचा आमचा संकल्प आहे; ज्यायोगे त्यांचे योगविद्येतील कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे.

तिसरी वाहिनी म्हणजे ते स्वत: जी योगसाधना करत ती एक तत्त्वसाधना होती. ती निरपेक्ष, निर्हेतुक असे. योग-तत्त्वज्ञान जगणे आणि श्वासणे हा त्यामागे उद्देश असे. पतन्जल योगसूत्रांच्या कोंदणात त्यांची ही साधना बसविलेली होती. ते म्हणत, ‘आपण स्वत:मध्ये काय करतो ते जाणा. स्वत:लाच प्रश्नोत्तरे करा. हे शिकवता येत नाही, पण शिकता येते. हा दिव्य अनुभव दाखवता वा पाहता येत नाही. त्याचा केवळ बोधच होऊ  शकतो.’ ते म्हणत, ‘मी जेव्हा योगसाधना शिकवतो तेव्हा वैज्ञानिक असतो. जेव्हा ती पेश करतो तेव्हा कलाकार असतो. पण स्वत: जेव्हा ही साधना करतो तेव्हा तिचा मी एक निरपेक्ष उपासक असतो, पूजक असतो, अनुष्ठाता असतो. ते अनुष्ठान असते.’

अशा प्रकारे त्यांची योगप्रणाली त्रिमुखी होती. त्यांचे जगभरातील विद्यार्थी हा त्रिमुखी योग गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत पुनश्च जगापुढे मांडणार आहेत. योगाचा प्रचार-प्रसार सर्वत्र करणे हा एक प्रकल्प आहेच. गुरुजींच्या योग-प्रात्यक्षिकांच्या अनेक ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. त्या जागोजागी विविध माध्यमांतून प्रदर्शनार्थ मांडण्याची योजना आहे. गावोगावी शाळा-महाविद्यालयांतून योगवर्ग आयोजित करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. वृत्तपत्रे-नियतकालिकांतून लोकोपयोगी लेख लिहिणे, व्यवहार्य योग आणि मूळचा सैद्धांतिक योग यांचा प्रचार करणे हेही एक उद्दिष्ट आम्ही आमच्यासमोर ठेवले आहे. गुरुजींच्या संघर्षपूर्ण जीवनावर प्रकाश टाकून ते शब्दांकित करण्याचाही प्रयत्न असेल.

अय्यंगार गुरुजींचा प्रभाव संपूर्ण समाजावर होता. बालक-किशोरांपासून सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांतील लोक, आस्तिक-नास्तिक, बुद्धिवादी-भाववादी अशा सगळ्यांना भावेल, रुचेल, पचेल अशा प्रकारे ते योगविद्या हाताळत. ते अष्टपैलू योग मार्गदर्शक होते आणि त्यातील प्रत्येक पैलूमध्ये ते एकमेवाद्वितीय होते. त्यांचे विद्यार्थी त्यांना ‘हार्ड टास्क मास्टर’ म्हणून ओळखत. पण ते तेवढेच आणि तसेच नव्हते. येहुदी मेनुहिनसारख्या कलाकाराला ते अत्यंत हळुवारपणे शिकवीत. कारण त्याचे वादनाचे कार्यक्रम वर्षांला सुमारे २२५-२५० च्या दरम्यान होत असत. जे. कृष्णमूर्तीसारख्या प्रकांड तत्त्ववेत्त्याला त्यांनी ३०-४० वर्षे शिकवले. त्यांची ही एक आगळीच पेशकारी होती. जे. कृष्णमूर्ती हे ज्ञान व तर्कभास्कर होते. त्यांना गुरुजींनी काय व कसे शिकवले असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. बेल्जियमच्या राजमातेने वयाच्या ८५ व्या वर्षी शीर्षांसन शिकण्याचा हट्ट धरला. तोही त्यांनी कसा पुरा केला असेल, हा विचार कुणालाही अचंबित करील. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील १६-१७ वर्षांची मुले ते जख्ख वृद्ध माणसे गुरुजींनी लीलया हाताळली. रोगजर्जर व्यक्ती ते जागतिक स्तरावरील खेळाडू यांना त्यांनी प्रभावित केले. हिंदकेसरी खंचनाळे ते ज्ञानकेसरी जे. कृष्णमूर्ती यांनाही त्यांनी प्रभावित केले. सर्वावर प्रभाव पाडेल अशी त्यांची योगविद्या, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि पेशकारी होती. अशा या योगविभूतीची जन्मशताब्दी जागतिक स्तरावर साजरी होत आहे, हाही एक अनवट योग आहे.

lokrang@expressindia.com