मुंबईविषयीच्या कविता मराठीत नवीन नाहीत. साठोत्तरी काळातील कवींनी मुंबईचे विश्व कवितांतून मांडले आहे. नंतरच्या काळातही मुंबई महानगर अनेकांच्या कवितांचा विषय ठरले, हेही आपण जाणतोच. अशा काव्यकुळाच्या परंपरेतील ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे..’ या शीर्षकाचा कवी बाळासाहेब लबडे यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. मुंबई शहराच्या सद्य:वास्तवाचे चित्रण करणाऱ्या या संग्रहातील कविता म्हणजे मुंबईवरील कवितांच्या परंपरेतील ‘आज’चा सशक्त आविष्कार म्हणावा लागेल. याआधी लबडे यांचा ‘महाद्वार’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यात आळंदीतील जीवनसंस्कृती टिपली गेली होती. भवतालात वावरण्यातून आलेले जीवनानुभव सूक्ष्मरीतीने त्या संग्रहातील कवितांत मांडले गेले आहेत. त्यांच्या कवितेचे हे वैशिष्टय़ ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे..’ या नव्या संग्रहातही दिसून येते. मुंबईचे अनेकांसाठी मायानगरी, स्वर्गनगरी असणे आणि त्याच वेळी या महानगरीतील बकालपण, घुसमट, शोषण असे जगण्याचे दुहेरी वास्तव या संग्रहातील कविता दाखवून देतात. मुख्य म्हणजे या दुहेरी वास्तवाचे चित्रण हे आजचे- समकालीन- आहे. एकूण ११४ कवितांचा हा संग्रह शीर्षकापासूनच कवीचे काहीएक काव्यसूत्र असल्याचे स्पष्ट करणारा आहे. मुंबईमधील संमिश्र संस्कृतीविषयीची जाण या शीर्षकातून व्यक्त झाली आहे. मुंबईच्या या अनवट संस्कृतीची सर्व अंगे संग्रहातील कवितांमधून टिपण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. मुंबईतील जगण्याचे बहुविधदर्शन या कविता घडवतात. त्यातून या महानगराचा सर्वच अर्थानी अक्राळविक्राळ असण्याचा अर्थ वाचकाला उमजत जातो. हे उमजणे अनेकांसाठी अंतर्मुख करणारे आणि त्याचबरोबर अस्वस्थ करणारे नक्कीच ठरेल. त्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा. ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे..’ - बाळासाहेब लबडे, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- १३४, मूल्य- १६० रुपये.