महाराष्ट्रात मागच्या दशकभरात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा मोठाच चिंतेचा विषय आहे. या आत्महत्यांना स्वदेशीय शेती-धोरणांची जशी पाश्र्वभूमी आहे, तशीच आंतरराष्ट्रीय अर्थ-वित्तसंस्थांच्या धोरणांचेही परिमाण आहे. एका बाजूला हे सारे घडत असतानाच दुसरीकडे हवामान- बदलाने शेतीव्यवसायावरच अरिष्ट आले आहे. लोकानुनयी सरकारी योजनांचा आश्रय घ्यावा, तर तिथेही भ्रष्ट राजकारणाचा सामना करावा लागतो. अशा या अभावग्रस्त परिस्थितीत आधीच्या गावगाडय़ातील गावपण नाहीसे होऊ लागले आहे. शेतीप्रधान व्यवस्थेची समृद्धी पाहिलेल्या शेतकऱ्यासाठी आताची ही स्थिती भोवंडून टाकणारी आहे. सध्याच्या शेतकी जीवनाचे हे वास्तव सुभाष किन्होळकर यांच्या ‘झळ’ या कादंबरीत रेखाटले गेले आहे. गॅट करार, शहरीकरण, नोकरी-उद्योगांकडे लोकांचा वाढता कल अशा संक्रमणकाळात ज्यांनी भूमीशी नाते तोडले नाही आणि शेतीव्यवसाय आपलासा केला, त्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या भोगाची सहवेदना ‘झळ’ वाचकापर्यंत पोहोचवते. विश्वनाथ खरात हा असाच भूमीशी नाते राखून असणारा तरुण. शेतीवर उदरनिर्वाह करणारा. एकीकडे शेतीतून येणारी अभावग्रस्तता आणि दुसरीकडे गाव सोडू न शकण्याची अपरिहार्यता अशा पेचात तो अडकला आहे. तो या पेचात कसा अडकतो (किंवा अडकवला जातो)आणि पुढे आत्महत्येचा पर्याय का स्वीकारतो, याचे चित्रण ‘झळ’मधून येते. बुलढाणा जिल्ह्य़ातील ग्रामीण बोलीभाषेत लिहिलेल्या या कादंबरीतून शब्दबद्ध झालेले गावगाडय़ातील व्यवहार आणि शेतकरी जीवन अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळेच ही कादंबरी केवळ विश्वनाथ खरातविषयीची न राहता ती आजच्या काळातील कृषीप्रधान व्यवस्थेचे प्रातिनिधिक चित्रण ठरते. ‘झळ’- सुभाष किन्होळकर, साक्षात प्रकाशन, पृष्ठे- ३९४, मूल्य- ४९० रुपये