|| रामदास भटकळ

गुरू-शिष्य नात्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. प्रेमकथा, भक्तिभावाच्या आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा. गुरूची सर्व प्रकारची सेवा करायचा. आणि त्यातून गुरूची मर्जी राखली गेली तर त्याच्या कानी आणि गळी काही उतरायचे.

या गुरू-शिष्य परंपरेला इतर काही जण अपवाद असतीलही; परंतु पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने आपला परमशिष्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यास वाढवले. त्याला आपल्या पदराखाली घेऊन त्याचे मुलासारखे शिक्षणच नव्हे, तर पालनपोषणदेखील केले. त्यांना व्यावसायिकाची तालीम हवी म्हणून बडोद्याला उस्ताद फैयाज खाँ यांच्याकडे पाठवले. तिथे श्रीकृष्णाच्या कॉलेजशिक्षणाची व्यवस्था केली. आणि शिष्याच्या वयाच्या २८ व्या वर्षी त्याच्या हाती लखनौच्या मॅरिस कॉलेजचा कारभारही सोपवला.

याहून महत्त्वाचे म्हणजे शिष्याला कसे वाढवावे, हेही जणू त्यांनी आपल्या श्रीकृष्णाला शिकवले. त्यामुळे रातंजनकरांचे सगळे शिष्य त्यांना अजूनही का मानतात, हे सहजी समजण्यासारखे आहे. त्यांत पं. कृष्णराव गुंडोपंत गिडे यांचे विशेष स्थान आहे. कृष्णा हा बेळगावजवळील बलहोंगल या लहानशा खेडय़ात जन्मलेला. नऊ भावंडांपकी आठवा. वडील डॉक्टर आणि पुन्हा संगीतात डुंबलेले. त्यामुळे कृष्णाच्या बालपणापासून त्याच्या गायनकलेला उत्तेजन मिळाले. कुमार गंधर्वही बेळगावचेच. त्यामुळे त्यांची दोस्ती होतीच.

कृष्णाला चांगले गुरू मिळावेत म्हणून वडील डॉ. गुंडोपंत गिडे यांनी सतत प्रयत्न केले. कृष्णाचे मोठे भाऊ रामचंद्र हेही डॉक्टर होते. त्यांचा श्रीकृष्ण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्याशी मुंबईत घरोबा होता. अण्णासाहेब कॉलेजमुळे लखनौला वास्तव्याला होते. फक्त सुट्टीत ते मुंबईला यायचे. त्यामुळे त्यांनी या छोटय़ा मुलाला शिकवायचे नाकारले. १९३६ साली मात्र त्यांनी वेगळा विचार केला. मे महिन्याच्या सुट्टीत ते मुंबईला यायचे. कृष्णाच्या बेळगावच्या शाळेलाही तेव्हाच सुट्टी असे. त्यांनी डॉ. रामचंद्रांना आपल्या भावाला मुंबईत आणायला सांगितले. सुरुवातीला हा ११ वर्षांचा मुलगा बिचकला, पण मग रोज संध्याकाळी त्यांच्याकडे शिकवणीसाठी जाऊ लागला.

एक दिवस अण्णासाहेबांनी त्याला विचारले की, ‘रोज अशी ये-जा करण्यापेक्षा तू इथेच का राहत नाहीस?’ तेव्हा न बुजता कृष्णा तयार झाला. नवऱ्याचे नाव न घेण्याचा त्यावेळी रिवाज असल्यामुळे श्रीकृष्ण रातंजनकरांच्या पत्नी या कृष्णाला ‘छोटू’ म्हणू लागल्या. मग त्याला सगळेच जण ‘छोटू’ म्हणू लागले. असा तो रातंजनकरांचा ‘छोटू’ झाला. आणि पुढे तहहयात त्याच नावाने ओळखला गेला.

छोटू रातंजनकरांकडे रुळल्यामुळे तो आता लखनौलाही जाऊ शकेल असा विश्वास डॉक्टर भावाला वाटला. मुलाला दीर्घ प्रवासाआधी भेटायला म्हणून बेळगावहून डॉ. गुंडोपंतही आले होते. त्यांना बोरीबंदर स्टेशनवर ट्रेन सुटण्यापूर्वी अण्णासाहेब म्हणाले, ‘‘मी याला आपला मुलगा मानलेलं आहे. तुम्ही याची यत्किंचितही काळजी करू नका.’’

या छोटय़ा मुलाला कॉलेज म्हणजे काय, अण्णासाहेब त्याचे प्राचार्य आहेत म्हणजे नेमके काय करतात, याची कल्पना असणे शक्य नव्हते. काही वेळाने आपल्याला एकटेच बसावे लागते म्हणून छोटू रडू लागला. तेव्हा अण्णासाहेबांनी एका सेवकाला बोलावून छोटूला संस्था दाखव म्हणून सांगितले. उपप्राचार्य नातूसाहेब तिसऱ्या वर्गाचा क्लास घेत होते. तिथे हा मुलगा जाऊन बसला. याच वर्गात ‘नंदू’ या नावाने ओळखले जाणारे एस. सी. आर. भटही होते. अशा तऱ्हेने छोटूच्या संगीत शिक्षणाची नव्याने सुरुवात झाली.

अर्थात छोटूला शिकवणे ही अण्णासाहेब आपली जबाबदारी मानत होते. त्यांचे कॉलेजातले काम संपले की ते छोटूला शिकवू लागले. गायन शिकवत असताना छोटूचे शालेय शिक्षणही चालू ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे याची त्यांना जाणीव होती. पण अडचण अशी होती, की लखनौला शाळेत घालायचे तर हिंदी येणे आवश्यक होते. मग दोन महिने हिंदीची पूर्वतयारी आणि गाण्याचा रियाज अशी कसून तयारी करून घेतल्यावर छोटूला हिंदी शाळेत घालण्यात आले. तिथे तो सहावीत जाऊ शकला आणि पुढे दीड वर्षांने रीतसर संगीताच्या तिसऱ्या वर्गात दाखल झाला. १८ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन छोटूने एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला.

म्युझिक कॉलेजमधील शिक्षण चालूच होते. तिथे नंदभट हे विशारदच्या वर्गात असताना छोटूच्या वर्गाला शिकवीत होते. नंदभट हे उत्तम शिक्षक. शिवाय रियाजाबद्दल त्यांचा कटाक्ष. त्यांच्या शिस्तीमुळे छोटूचे पाठांतर पक्के झाले. पुढे ‘संगीताचा चालता-बोलता ज्ञानकोश’ अशी पं. गिडेंची ख्याती झाली त्याचे बरेचसे श्रेय या शिक्षणाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटू अण्णासाहेबांसोबतच राहायचा. तेव्हा शालान्त परीक्षा आणि संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तो अण्णासाहेबांचा सर्वच बाबतीत मदतनीस झाला होता. या नात्याने त्याला कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांना मुक्तद्वार असे. अण्णासाहेबांकडे येणाऱ्या सर्व पंडित-उस्तादांची भेटीगाठ होत असत. त्यामुळे विविध प्रकारची संगीतविषयक ज्ञानसाधना छोटूला सहज शक्य होत असे. पाहुणे कलाकार आले की त्यांना तंबोऱ्यावर साथ करणे हा त्याचा छंदच झाला होता. तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानात फक्त आठ रेडिओ स्टेशने होती. त्यात लखनौ रेडिओ स्टेशनला विशेष महत्त्व होते. सर्व थोर गायक तिथे हजेरी लावत. आणि बऱ्याच वेळा ते कॉलेजातच मुक्काम करीत. त्यामुळे छोटूच्या गाण्याला निरनिराळे पलू पडत होते.

उत्तम तालीम मिळाल्यामुळे गिडे अठराव्या वर्षांपासूनच लखनौ रेडिओ स्टेशनवर गाऊ लागले. १९३६ ते १९५१ अशी सलग सोळा वष्रे ते रातंजनकर कुटुंबातलेच एक झाले होते. सुट्टीतही ते मुंबईला यायचे ते बेळगावला आपल्या घरी जाण्यासाठी नव्हे; तर अण्णासाहेबांच्या घरीच ते राहायचे. मुंबईत डॉ. रामचंद्र आणि गणपतराव हे दोघे मोठे भाऊ स्थायिक झाले होते तरी छोटू त्यांच्याकडे उतरत नसे. तेच मग छोटूला भेटायला अण्णासाहेबांकडे येत असत. अण्णासाहेब आणि छोटू परस्परांशी इतके एकरूप झाले होते, की आपला सगळा व्यवहार गुरू या शिष्यामार्फतच करत असे. अण्णासाहेबांना बंदिशी सुचल्या की त्या लिहून काढायचे कामही छोटूच करायचा. काही वेळा स्वररचना शिष्याने केल्या तरीही त्या गुरूच्या कल्पनेशी तंतोतंत जुळायच्या.

अर्थात हा सहवास कधीतरी संपणारच होता. या ताटातुटीच्या वेळच्या दोन घटना हृद्य आहेत. लखनौ सोडण्यापूर्वी गिडे सगळा हिशेब पूर्ण करत बसले होते. अण्णासाहेबांनी ते पाहिल्यावर त्यांना म्हणाले, ‘‘आता यात वेळ काढू नकोस. घरी पोचल्यावर सगळा हिशेब कर. मी काही द्यायचे असतील तर कळव. तू द्यायचं निघत असतील तर काही काढू नकोस.’’ आपला हा पुत्रवत शिष्य दूर जाणार, ही भावना अण्णासाहेबांना क्लेश देत होती. त्यांना निरोप देण्यासाठी स्टेशनवर जाणेही त्यांना तापदायक वाटले. निघताना त्यांनी छोटूला एक पाकीट दिले. त्यात एक बंदिश होती. त्यासाठी त्यांनी ‘वियोगवराळी’ हा नवीन राग तयार केला होता. ही वियोगाची भावना इतकी प्रखर होती, की ही आशीर्वादपर बंदिश अण्णासाहेब किंवा गिडे कधीच मफलीत गाऊ शकले नाहीत. अखेरीस नंदभट यांनी गिडेंच्या षष्टय़ब्दीपूर्ती कार्यक्रमात ती पहिल्यांदा गायली.

अण्णासाहेबांनी आपल्या शिष्याला आणखी एक महत्त्वाची भेट दिली होती. त्यांच्या प्रेमळ गुरुबंधूंची! नंदभट हे अण्णासाहेबांचे शिष्य. एका अर्थाने तेही गिडेंना गुरुस्थानीच होते. फेब्रुवारी १९५२ मध्ये गिडे मुंबईत आले. ते काही काळ मोकळेच होते. त्यांना नंदभटांनी आपल्या काही शिकवण्या दिल्या. त्यानंतर भारतीय विद्याभवनच्या संगीत शिक्षापीठात गिडे शिकवू लागले. चिदानंद नगरकर हे प्राचार्य आणि नंदभट हे त्यांचे गुरुबंधूच. फादर फ्रॉक्स हे जर्मन संगीतज्ञ नगरकरांकडे काही निमित्ताने आले असता त्यांच्याबरोबर परदेशी जाण्याची संधी नगरकरांनी गिडेंना उपलब्ध करून दिली. त्यांच्यासोबतच्या कामाने आणि युरोप दौऱ्यादरम्यान गिडे यांचे संगीतज्ञान फुलत गेले.

रातंजनकरांचा शिष्यवर्ग एकमेकांना सांभाळून होता आणि महत्त्वाच्या बाबतींत अण्णासाहेबांचा सल्ला शिरसावंद्य मानत होता. श्री वल्लभ संगीतालयाचे स्वामी श्री. वल्लभदास हे उस्ताद फैय्याज खाँचे शिष्य.. म्हणजे रातंजनकरांचे गुरुबंधू. त्यांच्यामुळेच गिडे आणि भट दोघेही पुढे श्री वल्लभ संगीतालयात शिकवू लागले. दोघांचेही शिक्षण लखनौला झालेले.

त्यामुळे त्यांच्या सांगीतिक विचारांत साधम्र्य होते. ही एक यशस्वी जोडगोळी ठरली. डॉ. रामचंद्र हे कॅनडाला पुढील अभ्यासासाठी गेले असताना छोटूच्या लग्नाची जबाबदारीही नंदभट यांनी घेतली. गुरू रातंजनकरांच्या परवानगीने छोटूचे लग्न मीरा कोप्पीकर या मुलीशी ठरवले.

रातंजनकर लखनौच्या संस्थेतून निवृत्त झाल्यावर काही काळ खैरागढम् येथील इंदिरा संगीत विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. पुढे काही काळ ते मुंबईत श्री वल्लभ संगीतालयात मानद गुरू होते. तेव्हा त्यांच्यातील गुरू-शिष्य नाते पुन्हा एकदा उमलून आले. रातंजनकरांना बंदिश सुचली की ते एका पोस्टकार्डावर लिहून गिडेंना पाठवीत आणि पुढील सर्व संस्कार गिडे करीत. रातंजनकरांच्या बंदिशी बरीच वष्रे पॉप्युलर बुक डेपो प्रसिद्ध करत असे. त्यावेळी मुद्रितशोधनापासून सगळी उस्तवार गिडेच करत असत. जुन्या खिळे जुळवण्याच्या पद्धतीने बंदिशी छापणे किचकट आणि नवीन संगणक प्रणाली पुरेशी तयार झालेली नसल्याने पुढे गिडेंनी त्यांच्या जवळजवळ सातशे बंदिशी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून काढल्या आणि त्याचे ऑफसेट पद्धतीने मुद्रण केले. त्यासाठी त्यांनी आचार्य रातंजनकर फाऊंडेशनची स्थापना केली. गुरूने अपूर्ण ठेवलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते. गुरूने आणि परात्पर गुरू भातखंडे यांनी सांगितलेले संगीतशास्त्र आपल्या अनेक व्याख्यानांतून त्यांनी उलगडून दाखवले. रातंजनकरांनी जवळजवळ २५ राग नव्याने प्रचलित केले होते. त्या साऱ्या बंदिशी त्यांनी स्वत: गाऊन त्यांचे ध्वनिमुद्रण केले. अनेकांना आपले ज्ञान खुले करून दिले. गुरू-शिष्याची ही जोडी अनोखी ठरली.

‘घराणे’ हा शब्द प्रचलित झाला तेव्हा बहुतेक शिष्यवर्ग हा कुटुंबातलाच असायचा. बंदिशी या वारसा हक्काने किंवा हुंडा म्हणून दिल्या जायच्या. त्यात हळूहळू बदल होत गेला. भातखंडे-रातंजनकर-गिडे हे आपल्या जातिव्यवस्थेनुसारही वेगवेगळे; तरीही हा सांगीतिक संकर िहदुस्थानी संगीताच्या दृष्टीने सुखकर ठरला.

ramdasbhatkal@gmail.com