मानव आणि वन्यजीव संघर्षांचा मुद्दा अलीकडच्या काळात तीव्र झाला आहे. यामागचे उघड कारण म्हणजे मानवाचे जंगलावरील अतिक्रमण. शहरीकरणाच्या रेटय़ात जंगल व त्यातल्या जीवसृष्टीशी असलेले आपले आदिम नाते संपते की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. पर्यावरण की विकास, अशा पेचात सबंध जगच अडकले आहे. आणि प्रत्येक समाज, देश आपापल्या परीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरीही जंगलांचे आक्रसणे हे वास्तव उरतेच आणि कुठल्याही संवेदनशील मनास ते नक्कीच अस्वस्थ करणार. रमेश सावंत यांची ‘जंगलगाथा’ ही दीर्घकविता त्या अस्वस्थतेला शब्दांकित करते. या दीर्घकवितेची पाठराखण करताना कवी अजय कांडर यांनी म्हटले आहे की, ‘कवितेच्या निमित्ताने माणूस आणि निसर्ग यांचे बदलत गेलेले नाते चिंतनाच्या पातळीवर प्रथमच मराठी कवितेत दीर्घ स्वरूपात व्यक्त होत आहे, हे या कवितेचे अनोखेपण आहे.’

सावंत यांनी दीर्घकवितेच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, ‘एखाद्या रंजक पुस्तकासारखी, पानोपानी उलगडत जातात, जंगलात दडलेली रहस्ये, यासाठी का होईना, वाचलं पाहिजे मनापासून, जंगलगाथेचं अवर्णनीय पुस्तक’ आणि जंगलगाथेच्या या पुस्तकाची पाने उलटत जाऊ तसे माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याचे अनेक कंगोरे आपल्यासमोर उलगडत जातात. या नात्याला पडलेले तडे व्यक्त करताना कवी म्हणतो, ‘छळू लागलीय जंगलाला, दगडधोंडय़ांची राकट भाषा, पळू लागल्यात आभाळात, भरकटलेल्या क्षितिजरेषा.’ निसर्गाविषयीच्या ममत्वाची जाणीवच आताशा हरवू लागल्याचे कवी सूचित करतोच; परंतु शेवटी ‘कितीही तोडा, कसंही झोडा, पुन्हा रुजून येतंच, एक नवं हिरवंगार जंगल, निर्घृणपणे कापलेल्या चिवट खोडांतून’ असा आशावादही व्यक्त होतो. त्या आशावादासाठी तरी ही कविता वाचायलाच हवी!

‘जंगलगाथा’- रमेश सावंत,

संवेदना प्रकाशन,

पृष्ठे – ८८, मूल्य – १२५ रुपये.