हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला रोहित वेमुला हा एक बुद्धिमान विद्यार्थी होता. त्याच्या जात-धर्मासह त्याच्या विचारसरणीची तसेच त्याच्या राजकीय बांधिलकीची आतापर्यंत खूप चर्चा झाली आहे. परंतु इतका उच्च बुद्धय़ांक असलेला रोहित या निर्णयाप्रत नेमका का आला, याचे विश्लेषण करताना आणखी व्यापक दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी आपल्या भवतालाकडे आज डोळसपणे बघायची वेळ आली आहे. आणि मग रोहित वेमुला आपल्याला हवा की नको, याचा निर्णय घ्यायला हवा.

रोहित वेमुलाने आत्महत्या करून आता दोन आठवडय़ांचा कालावधी लोटला आहे. एव्हाना रोहित कुठल्या गावचा, जातीचा, धर्माचा, राजकीय पंथाचा होता, ही सर्व माहिती बाहेर येऊन त्या माहितीचे राजकीय चरकामध्ये टाकून चोथा होईपर्यंत चर्वणही झालेले आहे. मरण्यापूर्वी रोहितने लिहून ठेवलेले पत्रही बरेच ‘शेअर’ झाले आहे. हे पत्र लिहिण्यामागच्या त्याच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्नही काहींनी केला आहे. या सर्व ऊहापोहाच्या पलीकडे जाऊन विचार करताना रोहित हा पीएच. डी.चा विद्यार्थी होता- म्हणजेच नेहमीच्या लघुदृष्टिदोषात्मक वादापलीकडे जाऊन विचार करू शकणारा होता, हे महत्त्वाचे सत्य बऱ्याच विश्लेषणांचा अजूनही भाग बनलेले नाही. कुठल्या जाती-धर्माच्या वर्गात प्रतवारी करण्याअगोदर रोहित देशातल्या बऱ्याच मोठय़ा जनसंख्येपेक्षा जरा जास्त बुद्ध्यांक असणारा होता, हे वैश्विक सत्य येथे दुर्लक्षित करून चालणार नाही. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी जास्त बुद्ध्यांक असलेल्या व्यक्तीने वाचल्यास त्याला रोहितचे म्हणणे नेमक्या स्वरूपात समजावून घेण्यात अडचण येणार नाही. रोहित हा हैदराबाद युनिव्हर्सटिीत पीएच. डी. करीत होता. आणि मानांकित युनिव्हर्सिटीत सर्वोच्च पदवीपर्यंतची शैक्षणिक पात्रता मिळवणे आजही तितकेसे सोपे नाही. ती केवळ राखीव जागा वा कृपांक गुणपद्धतीने मिळवता येत नाही, तर त्यासाठी ‘गुणवत्ता’ हा महत्त्वाचा निकष असतो.
गुणवत्ता आणि बुद्धीच्या जोरावर सर्वोच्च शिक्षण घेतलेले पदवीधर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करतात? तर- हे लोक व्यवस्थेच्या मूलभूत सांगाडय़ाचे महत्त्वाचे घटक असतात. त्यातले काही मध्यवर्ती बँकांच्या व्यवस्थापनात असू शकतात, काही अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प बनविण्यात मदत करतात. काही संस्थात्मक पातळीवर महत्त्वाची पदे सांभाळतात, तर काही शिक्षणव्यवस्थेची रचना सांभाळतात. देश एक वेळ राज्यकर्त्यांविना चालवता येईल, पण बुद्धिवंतांवाचून त्याचे पानही हलणे शक्य नसते. रोहित हा या प्रजासत्ताक राष्ट्राच्या मूलभूत चौकटीच्या बौद्धिक संपदेचा वारस होता. ‘तो युनिव्हर्सटिीत शिकायला गेला होता, तर मग त्याने तेथे राजकीय घडामोडींमध्ये भाग न घेता फक्त शिक्षणावर लक्ष द्यायला हवे होते..’ अशी काही मते समोर आली आहेत. मुळात रोहित शिक्षणाच्या ज्या उच्च टप्प्यावर उभा होता, तिथे राजकीय विचारांशिवाय जगणे तर काय, जाणेही अशक्य असते. कुठल्याही लोकशाही देशातल्या विद्यापीठांतली विद्यार्थी चळवळ ही त्या देशाच्या प्रजासत्ताक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची महत्त्वाची शाखा असते. आजवरच्या जगाच्या इतिहासावर नजर टाकल्यास लोकशाहीला पोषक असे प्रारंभिक विचार आणि महत्त्वाचे नेते हे विद्यार्थी चळवळींतूनच पुढे आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याखेरीज, रोहित हा डाव्या चळवळीचा भाग होता, ही माहितीही वेगवेगळ्या अंगाने पाहिली जात आहे. गेली काही वष्रे पुरोगामी राजकारण आणि डाव्या चळवळींसंदर्भात मूलभूत व्याख्यांमध्ये भाषिक गोंधळ आणि घडवून आणलेली व्याकरणाची शाब्दिक कसरत पाहता रोहितच्या राजकीय भूमिकेचे व्यवस्थित अवलोकन करताना आपण कुठे कमी पडलो आहोत, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
सर्वप्रथम रोहित हा आंबेडकरी विचारांचा होता- या तथ्याकडे वळू या. आंबेडकरवाद ही एक राजकीय विचारसरणी आहे. आंबेडकरी विचारांचे पाईक असणे, ही व्यक्तिगत भूमिका आहे. आंबेडकरवाद आणि आंबेडकरी विचार या दोन व्याख्यांच्या पलीकडे आंबेडकर हे एक मूल्य आहे. या देशाच्या सांविधानिक पायाभरणीच्या मुळाशी ते मूल्य आहे. आणि ते मूल्य सद्य:स्थितीत कुठल्याही राजकीय पक्षाला वा व्यक्तीला नाकारता येत नाही. रोहित ज्या संघटनांमध्ये कार्यरत होता, त्या संघटनांमधून त्याने आंबेडकरी विचार उचललेला नसून, पीएच. डी.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांला निर्वाणीचा विषय असलेल्या ‘आंबेडकर’ या मूल्यांमधून त्याचे प्राथमिक विचार आलेले आहेत. पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांला जसा आंबेडकर हा विषय टाळता येणे शक्य नाही, तसेच आइन्स्टाईनचा सिद्धान्त वा गांधींचे तत्त्वज्ञानही नाकारता येत नाही. बहुतांशी पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आकलनाचा तो भाग असतो. रोहित अगोदर डाव्या विचारांचा होता, या माहितीसंदर्भातही अशीच मोठी गल्लत माध्यमांत अनेक ठिकाणी दिसून आली. मुळात ‘राजकीय वर्णपट’ (ढ’्र३्रूं’ रस्र्ीू३१४े) ही संज्ञा जगाला लोकशाही देणाऱ्या फ्रान्समध्ये सर्वात पहिल्यांदा वापरण्यात आली. राजकीय विचारसरणीच्या संकुचिततेतून उदारमतवादाकडे जाताना असलेल्या मोजपट्टीला ‘राजकीय वर्णपट’ म्हणतात. यात मध्यम डावे (लिबरल), डावे (कम्युनिस्ट, समाजवादी, पर्यावरणवादी), कडवे डावे (नक्षलवादी) अशी वर्गवारी केली जाते. उजवीकडे हीच वर्गवारी मध्यम उजवे (भाजप), उजवे (विश्व िहदू परिषद), कडवे उजवे (बजरंग दल) अशी केली जाते. जागतिक राजकारणातल्या महत्त्वाच्या देशांमध्ये हा वर्णपट मान्य केल्यानंतर तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, धार्मिक आस्था, मानसशास्त्र अशा कितीतरी ज्ञानशाखांचा अभ्यास करणे शक्य होते.
भारतीय राजकारणात राजकीय वर्णपटांचे तपशील हे गुंतागुंतीचे असल्याने ते सरळ ग्राह्य़ धरले जात नाहीत. समाजवादी म्हणजे सीमारेषेवर बसलेले, डावे म्हणजे सगळे एकजात ब्राह्मण कम्युनिस्ट, आणि असे कम्युनिस्ट ब्राह्मण नसल्याने आंबेडकरवादी हे अनिर्णीत- अशी रचना शक्यतो ग्राह्य़ धरली जाते. दुर्दैवाने पर्यावरणाचे प्रश्न, संपत्तीतले विभवांतर, आरोग्याच्या समस्या या मग भारतीय वर्णपटलावर व्यवस्थित मांडता येत नाहीत आणि अनेक महत्त्वाच्या समस्यांसंदर्भात राजकीय पक्षांकडे कुठलीही निश्चित भूमिका असणे बंधनकारक राहत नाही. जगभरात चाललेल्या एकूण राजकीय घडामोडी पाहता देहदंडाच्या शिक्षेला विरोध असणे, समलैंगिकांसाठी समान अधिकार, पर्यावरण संरक्षण, महिलांचे अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार हे जागतिक डाव्या विचारसरणीचे अविभाज्य घटक आहेत. पण आपल्याकडे सौम्य डावे वा डावे असलेल्यांनी या प्रश्नांविषयी निश्चित अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. रोहित वेमुलाचे डावे असणे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट वा रिपब्लिकन पार्टी, आंबेडकरवादी असण्यापलीकडे या जागतिक डाव्या विचारसरणीतून आलेले होते. सरकारवर टीका करण्यासाठी टपून असलेल्या पक्षांसाठी रोहित वेमुलाचा मृत्यू हा दलिताचा, गतकाळातील मार्क्सवाद्याचा आणि एका ओबीसीचा मृत्यू होता. त्यामुळे या मृत्यूचा राजकीय भांडवलासाठी सद्य:स्थितीतल्या राजकारण्यांना उपयोग झाला. यापलीकडे रोहितच्या प्रागतिक भूमिकांचे नेमके आकलन करण्यासाठी वेळ, बुद्धी वा गरज तथाकथित पुरोगाम्यांनाही नव्हती. इतिहासाकडे नजर टाकताना वीर भगतसिंग यांना फाशी दिली तेव्हा ती होती, असे म्हणणेही धाडसाचे ठरावे. भगतसिंगांना वाचवणे आपल्या हातात नव्हते, असे गांधींचे म्हणणे होते. तर गांधींना भगतसिंग यांची फाशी रोखण्यास अपयश आले, असे कम्युनिस्टांचे म्हणणे पडले. आपण फक्त बोलत राहिलो; पण आपल्यातल्या कुणालाही भगतसिंगांना वाचवता आले नाही, हे नेहरूंचे वाक्य अरण्यरुदन ठरून काळाच्या इतिहासात जमा झाले.
भगतसिंग यांना फाशी झाल्यानंतर सरकारला न घाबरता एकूण एक भारतीय वृत्तपत्रांनी त्यासंबंधीचा रोष व्यक्त करणाऱ्या बातम्या मात्र ठळक मथळ्यात छापल्या. रोहितच्या मृत्यूनंतर अशी परखड भूमिका माध्यमांतल्या प्रत्येकाने घेतली नाही. बोटांवर मोजता येतील इतके पत्रकार वगळता या प्रसंगाचे तटस्थ विश्लेषण करण्याची गरजही बहुतांश माध्यमांना वाटली नाही. त्यामुळे रोहितचा मृत्यू हा दोन राजकीय विचारधारांमधला चच्रेचा आखाडा बनला; ज्याने काही ठिकाणी आततायीपणाची पातळी ओलांडली. सरकारवर आगपाखड करून घेण्याची संधी डावे साधत असताना उजवीकडच्यांना मात्र रोहितने राजकीय समर्थनार्थ उभ्या केलेल्या मुद्दय़ांचा पुरोगाम्यांविरुद्ध वापर करण्याची सुवर्णसंधी चालून आली. यात तो दलितच नव्हता, भांडखोर होता, याकुब-समर्थक होता, दहशतवाद्यांविषयी त्याला आस्था होती, अशी थेट चिखलफेक त्यांना मृत रोहितच्या चारित्र्यावर करता आली. यात वर्णपटावरची उजवी बाजू पूर्णत: एकाच परिवाराच्या ताब्यात असल्याने तिथे वैचारिक विरोधाभास असण्याचे काही कारणच नव्हते. आपल्या विचारांच्या समर्थनार्थ चालणाऱ्या एकूण एक प्रचार-संस्था या चिखलफेकीच्या कामात हिरीरीने उतरल्या. रोहित ज्या प्रागतिक विचारांचे समर्थन करीत होता, त्या मुद्दय़ांना आणखीन एकदा हरताळ फासण्याची आयती संधीच या प्रकरणातून त्यांना मिळाली.
पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिकलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना घरात येणाऱ्या विजेच्या कनेक्शनमध्ये किती व्होल्ट्स वीज असते, हे सांगता येत नाही, एखाद्या माहितीची गरज असल्यास इंटरनेटवरून आयत्या वेळी शोधता येत असल्याने कित्येक विद्यार्थी अगदी सोप्या गोष्टीही जाणून घेत नाहीत, लक्षात ठेवत नाहीत, इंजिनीअर झालेला विद्यार्थी सातवीतल्या विद्यार्थ्यांला अपेक्षित असलेले इंग्रजी संभाषणही करू शकत नाही- इतपत भारतीय शिक्षणव्यवस्था कोसळली आहे. उच्च शिक्षण घेऊनही मूलभूत ज्ञानाचा अभाव आणि नवीन न शिकण्याची मानसिकता यामुळे कोटय़वधी युवक बेरोजगार आहेत. या दाहक परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या शिक्षणातून उन्नती साधण्याचा मार्ग हा आता पीएच. डी.सारख्या उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली तरच साधला जाऊ शकतो. एखादा माणूस कुठल्या जातीचा वा धर्माचा आहे, हेही तपासण्याअगोदर तो आपल्या विचारांच्या सोयीचा की गरसोयीचा, हे तपासण्याची एक व्यापक यंत्रणा या देशात कार्यरत आहे. ही यंत्रणा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जातनिहाय यादी बनवते, आपल्या कार्यकर्त्यांकडून त्यांची व्यक्तिगत माहिती मिळवून मग ते आपल्या विरोधी विचारांचे असल्यास त्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून मन वळवण्याचे प्रयत्न करते, ते शक्य न झाल्यास त्यांना आमिषे दाखवते, आणि तरीही त्या विरोधकाने विरोध करणे न सोडल्यास मग त्याचे नतिक खच्चीकरण करून, तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याचा विरोध मोडून काढते. यात दरवेळी विरोधकाचा जीवच घ्यावा लागतो असे नाही; तो नापास होऊ शकतो, निष्कासित होऊ शकतो, त्याला ब्लॅकमेल केले जाऊ शकते, त्याच्या लिखाणावर अश्लील व िहसात्मक अभिप्राय दिले जाऊ शकतात, अथवा तो शारीरिकदृष्टय़ा अपंगही होऊ शकतो. हे केवळ शिक्षण क्षेत्रातच सुरू आहे असेही नाही. सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये, मोठय़ा उद्योगधंद्यांमध्ये, निवासी इमारतींत आणि अशा अनेक ठिकाणी हे घडते आहे. आरक्षणाचा काहीएक लाभ न घेता उद्योगात उतरलेल्या अनेकांना निरनिराळ्या सरकारी चौकश्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार आणि प्रशासनात सर्वदूर पसरलेल्या समर्थकांमार्फत बुद्धिवाद्यांचा रीतसर छळ करून त्यांचा विरोध मोडून काढण्याचे काम अविरत सुरू आहे. बुद्धिवादी केवळ आपल्याला अनुकूल असे बोलत नाहीत, आपल्या विचारांचा विरोध करतात म्हणून त्यांचा आवाज दाबून टाकणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानता येणार नाही. कुठलाही समाज घडविण्यासाठी प्राथमिक गरज असते ती बुद्धिवंतांची! आपल्याला रोहित वेमुला हवा आहे की नाही, हे आता ठरवले पाहिजे.
राहुल बनसोडे – rahulbaba@gmail.com

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप