गात काही महान व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी कल्पनेपलीकडचं काम करून जातात. अशा अनवट वाटेवरच्या व्यक्तिमत्त्वांमुळे समाज बदलतो, पुढे जातो, समाजाची प्रगती होते. या महान व्यक्तींच्या कार्यामागची प्रेरणा काय होती, त्यांचं आयुष्य कसं घडलं, येणाऱ्या संकटांचा आणि परिस्थितीचा त्यांनी कसा सामना केला, याचं यथार्थ वर्णन करणारी आणि प्रत्येकापुढेच एक आदर्श उभी करणारी पुस्तकरूपी मालिका म्हणजे भन्नाट माणसं! या मालिकेतली ‘गणित विश्वातील अढळ तारा : श्रीनिवास रामानुजन’ आणि ‘गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष : अब्राहम लिंकन’ या दोन अवलियांच्या चरित्राचा परिचय करून घेऊ  या.

गणितविश्वातील अढळ तारा :
श्रीनिवास रामानुजन

Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाचा जगप्रसिद्ध गणितज्ञ म्हणून नावारूपाला येईपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचं सचित्र वर्णन म्हणजे कीर्ती परचुरेलिखित ‘श्रीनिवास रामानुजन’ हे पुस्तक. गणिताची आवड, अभ्यासाची जिद्द, स्वत:च्या कामावर असणारा विश्वास, संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठीचा संघर्ष आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिलेल्या गणिताच्या अनोख्या प्रतिभेचं दर्शन या पुस्तकातून होतं.

रामानुजन यांचा जन्म मद्रास, म्हणजेच आताच्या चेन्नईतल्या इरोड या छोटय़ाशा गावात गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. अभ्यासाचं वेड असल्यामुळे ते शाळेत अनेकदा एकाकी पडायचे, पण त्यांची बुद्धी अत्यंत चौकस होती. ‘कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं’ या शिक्षकांच्या म्हणण्यावर ‘शून्याला शून्याने भागलं, तरी उत्तर एक येतं का?’ या रामानुजनच्या प्रश्नाने त्यांचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. शाळेत असताना गणिताचं वेड लागल्यानंतरच जणू त्यांच्या संशोधनाला सुरुवात झाली होती. अगदी कमी वयात त्यांनी गणितातली अनेक नवीन प्रमेयं मांडली, वेगवेगळे शोध लावले. मात्र, त्या काळात एकूणच माहितीच्या देवाणघेवाणीचा आवाका कमी असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराचसा काळ पूर्वीच लागलेले अनेक शोध लावण्यात गेला. सतत गणिताचा अभ्यास करण्याच्या नादात इतर विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होत गेलं. त्यामुळे पुढे परत परीक्षेला बसण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला. हातात पदवी नसल्यामुळे काही र्वष त्यांचा निश्चित असा कोणताच व्यवसाय नव्हता; पण त्यांनी त्यांचं गणितातलं स्वतंत्र संशोधन चालू ठेवलं. त्यांच्या संशोधनात रस घेणाऱ्या काही मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने रामानुजन यांनी केंब्रिजमधले गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्रे हेरॉल्ड हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. या पत्रात त्यांनी स्वत: शोधलेल्या शंभराहून अधिक प्रमेयांसंबंधी लिहिलं. त्यामुळे हार्डी प्रभावित झाले आणि त्यांनी रामानुजनना केंब्रिजला येण्याचं निमंत्रण दिलं.  समुद्र ओलांडून परदेशात जाणं, हे महापाप समजलं जायचं. त्यामुळे रामानुजन यांनी परदेशात जाणं नाकारलं, पण पुढे हार्डी यांचे सहकारी ई. एच. नेव्हिल यांच्या प्रयत्नांमुळे रामानुजन इंग्लंडला जायला तयार झाले आणि त्यांना १९१४मध्ये केंब्रिजमधल्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. हार्डी आणि जे. ई. लिटलवुड यांच्याशी सतत होणाऱ्या चर्चामुळे  रामानुजन यांच्या संशोधनाची गती आणखी वाढली. वेगवेगळ्या नियतकालिकांत त्यांचं संशोधन प्रसिद्ध व्हायला लागलं. शेवटी संशोधनाच्या आधारावर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवीसुद्धा मिळवली.  गणितात जोमाने काम करण्यासाठी त्यांना नवी ऊर्जा, नवी प्रेरणा इथे मिळाली, मात्र अडचणींनी इथेही त्यांची पाठ सोडली नाही. त्यांची कारकीर्द बहरत असतानाच आजारपणामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसली. १९१८मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य आणि ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली. प्रकृती सुधारल्यावर १९१९मध्ये ते भारतात परत आले. मद्रास विद्यापीठाने त्यांना दर वर्षी १५० पौंड याप्रमाणे पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती मंजूर केली; पण हळूहळू त्यांच्या आजाराने भीषण रूप घेतल्याने ते फार काळ जगले नाहीत, पण अक्षरश: शेवटच्या श्वासापर्यंत ते गणितातल्या संशोधनात मग्न होते.

गणितविश्वातील ‘अढळ तारा’ हे पुस्तकाचं शीर्षक रामानुजन यांच्यासाठी अगदी समर्पक आहे. त्यांचं कार्य, कामाप्रति त्यांची निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेला अथक संघर्ष, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना, त्यांना साथ देणाऱ्या व्यक्ती यांचं जणू काही गोष्टीरूप वर्णन करण्याचा प्रयत्न लेखिकेने केल्यामुळे रामानुजन हे व्यक्तिमत्त्व प्रत्येक वाचकाच्या मनात ठसा उमटवेल, यात शंका नाही.

‘अब्राहम लिंकन : गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष’

अब्राहम लिंकन यांचं नाव इतिहासात अजरामर आहे. गुलामगिरीच्या विळख्यातून अमेरिकी जनतेला मुक्त करणाऱ्या या अवलियाचा लढा जितका प्रखर, तितकाच प्रेरणादायीसुद्धा आहे. डॉ. जान्हवी बिदनूरलिखित ‘अब्राहम लिंकन : गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष’ या पुस्तकात अब्राहम लिंकन यांचा हा प्रवास अत्यंत मार्मिक शब्दांत मांडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेसुद्धा कृष्णवर्णीय आहेत. एके काळी नाकारला जाणारा हा वर्ग आज जगावर स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवतो आहे. ही काही एका रात्रीतून घडून आलेली गोष्ट नाही. त्यासाठी इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की, अठराव्या शतकात अमेरिका फाळणीच्या उंबरठय़ावर असताना झालेला लढा आणि त्याहूनही भयंकर प्रश्न म्हणजे, गुलामगिरीच्या विळख्यात अडकलेल्या अमेरिकेला बाहेर काढणं या जवळजवळ अशक्यप्राय गोष्टी लिंकन यांनी स्वत:च्या अथक परिश्रमाने शक्य करून दाखवल्या. या प्रश्नाच्या मुळाशी मुख्यत: गुलामगिरीची प्रथा आणि त्याआधी असलेला वसाहतवाद होता. प्रदीर्घ लढय़ानंतर वसाहतवादातून हा देशमुक्त झाला आणि या नव्या राष्ट्राचा विस्तार अटलांटिक ते मिझुरी असा पश्चिम-पूर्व आणि उत्तरेकडच्या सरोवरांपासून दक्षिणेकडे फ्लोरिडापर्यंत झाला; पण एवढं सगळं होऊनही इथे मध्यवर्ती सत्ता नव्हती. तसंच स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर वायव्येकडचा नवीन प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आला. ‘गुलामगिरी नसावी’ हा एक प्रमुख विचार या प्रदेशात होता. अब्राहम लिंकन यांचे वडील सारखे पश्चिमेकडे याच प्रदेशात सरकत होते. अब्राहम यांच्या मनात गुलामगिरीविरोधात रुजलेल्या तीव्र भावनेची पाळंमुळं याच पाश्र्वभूमीत असू शकतात.

या एकाच राष्ट्रात काही राज्यं गुलामगिरीचं समर्थन करणारी होती, तर काही राज्यं गुलामगिरीचा विरोध करणारी होती. या दुफळीने दारुण रूप धारण करू नये म्हणून अमेरिकेतल्या राज्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. म्हणूनच लिंकनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा काळ हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परीक्षेचा आणि त्याच वेळी त्यांच्या कर्तृत्वाला जगासमोर आणणारा काळ ठरला. या दुफळीमुळे गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या राज्यांनी युद्ध पुकारलं आणि राष्ट्राध्यक्षाला (अब्राहम लिंकन यांना) शह म्हणून स्वत:चा स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष निवडला; पण या युद्धाला लिंकन यांनी अतिशय चोख उत्तर दिलं. अब्राहम दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी गोऱ्या लोकांसोबतच काळ्या लोकांनाही मतदानाचा हक्क देऊ  करून वंशभेदावर मुळापासून घाव घातला. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच त्यांना ‘अमेरिकेची फाळणी टाळणारा महानायक’ म्हणून ओळखलं जातं.

मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार आणि दिशा मिळावी, हा उद्देश नजरेसमोर ठेवून  डायमंड पब्लिकेशन्सने तयार केलेली ही मालिका आणि त्यातली ही पुस्तकं नक्कीच प्रेरक ठरतील.

‘श्रीनिवास रामानुजन’ – कीर्ती परचुरे

पृष्ठे- १३०, मूल्य- १०० रुपये

‘अब्राहम लिंकन’- – जान्हवी बिदनूर

दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक- कनक बुक्स,

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे</p>

पृष्ठे- ८४, किंमत-८० रुपये  ल्ल